Monday, March 11, 2019

राजगड ते तोरणा


या वर्षाची सुरुवात मोठ्या मोठ्या ट्रेक्स ने झाली. चंद्रगड ते आर्थरसीट, नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड, चोरवणे मार्गे  नागेश्वर गुहा. प्रत्येक ट्रेक हा नवीन आव्हान आणि शारीरिक क्षमतेची  परीक्षा पाहणारा होता. तरीसुद्धा एक ट्रेक करायची इच्छा बऱ्याच वर्षांपासून मनात रेंगाळत होती पण काही केल्या योग येत नव्हता. तो म्हणजे राजगड ते तोरणा. स्वराज्याच्या जुन्या राजधानीपासून स्वराज्याचे तोरण जिथे बांधले गेले तिथे. म्हणजे सर्वोच्च शिखरापासून पुन्हा पायथ्या पर्यंत. ते म्हणतात  ना अगदी Back to Basic तसे.

        सुशील ची आणि माझी ओळख चंद्रगडच्या ट्रेक ला झाली. चवड्यावर अलगद, पण झपाझप घाटवाटेवरून, डोंगरदऱ्यातून चालायची त्याची पद्धत फारच वेगळी वाटली. त्याची हलकीफुलकी शरीरयष्टी, चालताना असलेला कमालीचा वेग आणि तितक्याच तोडीचा स्टॅमिना आश्चर्यचकित करणारा होता. २०० वेळा सिंहगड सर केल्यामुळे लवचिकता आणि चपळाई त्याने अंगिकारली आहे.  आपल्याला नेहमीच संतूरची जाहिरात करणारी ललना दिसते जी आई असते पण वाटत नाही. अशी काही जाहिरात आम्हा बापुड्या पुरुषांची केली तर सुशील त्या भूमिकेत चपखल बसेल

          सुशीलने आणि मी, मध्ये चावंड, शिवनेरी आणि कुकडेश्वर असा ट्रेक प्लॅन केला होता. नियोजन सगळे त्याचेच. सगळ्या गोष्टी आटपून संध्याकाळी चहा च्या वेळात आम्ही घरी सुद्धा पोहोचलो होतो. सर्व गोष्टी जुळून येत असतील तर काही तरी मोठे प्लॅन केले पाहिजे असे मनात असतानाच राजगड ते तोरणाची मोहीम ठरली. Whatsapp वर ग्रुप तयार झाला. विजय गव्हाणे,अवधूत अत्रे, शिवेंद्र, निलेंद्र, हर्षद, तृणाल  देशमुख, राजन असे सगळे पट्टीचे ट्रेकर्स जमले. विनय देशमुख कडून काही टिप्स मिळाल्या.  सुशील कडून वेळापत्रक आणि प्रोजेक्ट प्लॅन तयार झाला. उन्हाळा वाढत असल्यामुळे फार उशीर करून जमणार नव्हते. मार्च २०१९ दिवस ठरला

        दोन अजस्त्र किल्ले चढून अंदाजे मधली २० किमी ची  घाटवाट करून जावे  लागणार होते. नसरापूर वेल्हे रस्त्यावर किमी अंतरावर दिसणाऱ्या या दोन्ही किल्ल्यांचे मराठांच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. सगळ्यांनी एका मार्गाने जाऊन जमणार नव्हते कारण ट्रेक संपल्यावर तिथून पुढे घरी येण्यासाठी बस च्या भरवशा वर विसंबून राहता येणार नव्हते. कदाचित उशीर झाला असता तर पंचाईत झाली असती. आम्ही दोन ग्रुप करायचे ठरवले. एक ग्रुप राजगड ते तोरणा करणार होता आणि दुसरा ग्रुप तोरणा ते राजगड करणार होता. प्रत्येक ग्रुप आपापली गाडी गडाच्या पायथ्या पाशी लावणार होता आणि दुसरा ग्रुप ट्रेक संपवून ती गाडी घेऊन घरी येणार होता. ऑफलाईन गुगल मॅप डाउनलोड करून घेतले होते. सगळी जय्यद तयारी झाली होती.

        शुक्रवारी ऑफिस मधले काम लवकर आटपून निघावे म्हणले तर रस्त्याला प्रचंड ट्रॅफिक लागले आणि अडीच तासांचा प्रवास करून मी कसाबसा घरी पोहोचलो. पटापट बॅग भरायला घेतली आणि लवकर जेवून झोपलोजाग येईल का नाही या भीतीने झोप आलीच नाही. शेवटी वाजता उठलो आणि आवरायला घेतले वाजता आम्ही सगळे धायरी फाट्याला भेटणार होतो. गाडीच्या जास्तीच्या चाव्या exchange करणार होतो. जर ट्रेक च्या वाटेवर दोन्ही ग्रुप ची चुकामुक झालीच तर बॅकअप keys दोन्ही ग्रुप कडे असाव्यात. मोबाइलला range मिळेलच याची खात्री नव्हती तेंव्हा दोन्ही ग्रुप चे Co-ordination हे एक मोठे आव्हानच होते. दुर्दैवाने मला ऑफिस मधून यायला उशीर झाल्यामुळे गाडीची जास्तीची किल्ली शोधायला वेळ मिळाला नाही. त्यात सकाळी पाषाण वरून यायला अवधूत ला थोडा उशीर झाला. शेवटी सुशील एक ग्रुप घेऊन पुढे मार्गस्थ झाला

         अवधूत येताच आम्ही सुद्धा निघालो. अर्धातास उशीर झाला होता.  या आधी गुंजवणे मार्गे राजगड बऱ्याच वेळा केला होता, पण पाली दरवाजाचा मार्ग माहित नव्हता. मार्गासनी चिरमोडी गावातून गुंजवणे फाट्याला वळता आम्ही सरळ पुढे गेलो. तांबडे फुटले होते. सूर्याच्या किरणांनी अंधार भेदून सगळीकडे लख्ख प्रकाश पसरवला होता. गुंजवणी नदीवरच्या  पुलावरून जाताना संथ वाहणाऱ्या पाण्यावर सकाळची किरणे चमकत होती. नानाप्रकारचे पक्षी कुंजन करत होते. सकाळची शांतता आणि दूरवर मंदिरात चालणाऱ्या भजन किर्तनाचे सूर मनाला स्थिरता देता होते. सकाळपासून चाललेली धावपळ आम्ही क्षणार्धात विसरलो आणि निसर्गाशी समरस झालो. रात्रभर भजन किर्तन करून वाजेघरला मॉर्निंग वॉक करत घरी निघालेले एक आजोबा भेटले. त्यांना आम्ही लिफ्ट दिली आणि त्यांनी आम्हाला रस्ता सांगितला. टाळ मृदूंगाचा आवाज त्या पंचक्रोशीतील वातावरण मंगलमय करत होता. खाटपे वाडी मध्ये एका शाळेच्या आवारात असलेला आऊसाहेबांचा आणि शिवरायांचा पुतळा जणू आम्हाला आशीर्वादच देत होता. त्यांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. पाली गावात पोहोचल्यावर गाडी लावली आणि सुमारे : ३० ला आम्ही ट्रेक सुरु केला. पुढची वाट कठीण असल्यामुळे राजगड चढण्यासाठी सोपा मार्ग निवडला होता. सुमारे एक तास १५ मिनिटात आम्ही वर पोहाचलो. दरवेळेस पद्मावती माची, बालेकिल्ला, सुवेळा माची, हत्तीचे नेढे पहिले होते पण हि बाजू माझ्यासाठी नवीन होती. गडावर बरेच पुनर्बांधणीचं काम झालेले दिसले. जुने बुरुज, तटबंदी, पाली दरवाजा अजूनही सुस्थितीत आहेत.थोडे Photo Session केल्यावर आम्ही वेळ ना दवडता संजीवनी माची कडे कूच केले. वाटेत कातळावर लागलेली मधमाशांची पोळी दिसली. जणू आजही ती स्वराज्याच्या रक्षणासाठी तत्पर असावीत. तिथे जास्त वेळ ना घालवता आम्ही निमूटपणे पुढे  सरकलो आणि संजीवनी माचीवर पोहोचलो. तिथे उंचीवर असलेल्या एकमेव झाडाखाली आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. जवळ असलेली चिक्की , राजगिरा वडी, बिस्कीट असे किरकोळ खाऊन आम्ही लगेच चालायला सुरुवात केली. सळसळणाऱ्या नागिणीप्रमाणे भासणारी संजीवनी माची हि खरोखरच मराठ्यांच्या स्थापत्यकलेचा एक अद्भुत अविष्कार. बुरुजांना अनुक्रमे नंबर दिले आहेत. माचीवरून प्रत्येक बुरुजावर खाली उतरण्यासाठी अरुंद किंवा खुफिया वाटावे असे जिने काढले आहेत. आणीबाणीच्या वेळी गडावर पाणी कमी पडू नये म्हणून माचीच्या मधोमध टाकी (Water cisterns) बांधलेली आहेत. (आपण यालाच आजकाल Rainwater  harvesting म्हणतो). माचीच्या मुख्य तटबंदीला लागून आत अजून एक तटबंदी बांधलेली आहे आणि या दोन्ही संरक्षक भिंतींमध्ये जवळपास १० ते १५ फूट खोल जागा सोडली आहे. याच नेमका उद्देश काय असावा हा इतिहासकारांच्या अभ्यासाचा भागव्याघ्रमुख नावाच्या बुरुजावरून आम्ही आपापले DP  साठी लागणारे छायाचित्र टिपले आणि तोरण्याची वाट धरली

            आमच्या आधी ट्रेक सुरु करणाऱ्या दुसऱ्या ग्रुप ची काहीच खबरबात नव्हती. आम्ही संजीवनी माची उतरून खाली आलो तेवढ्यात देवजाणे पण कशी काय मोबाइल ला range आली आणि मला सुशील चा फोन आलाझुंजार माची, मेंगाई देवी मंदिर, रडतोंडी बुरुज, कोकण दरवाजा हे सर्व करून त्यांनी तोरणा उतरायला घेतला होता. त्यांची तोरण्याची बुधला माची उतरून झाली होती. जवळपास दोन्ही ग्रुप चा वेग सारखाच होता

           वाजले होते १०: २६ आणि आता मात्र ऊन जाणवू लागले होते. अजून सूर्य माथ्यावर यायच्या आत आम्हाला जास्तीत जास्त अंतर कापायचे होते. थोडीशी पोटात भर गेल्यामुळे आणि सुरुवातीला बऱ्यापैकी झाडी असल्यामुळे आम्ही वेग कायम ठेवू शकलो. थोडेसे सपाट अंतर चालल्यावर चढाई करताना जीवावर येत होते पण थोडे उंचावर गेले कि गार वाऱ्याची झुळूक येई आणि सारा थकवा निघून जाई. ऊन वाऱ्याच्या या खेळामध्ये मजा येत होती. घार, गरुड असे उंचीवर उडणारे पक्षी जणू वरूनच आमची टेहळणी करत होते कारण आम्ही त्यांच्या इलाख्यामध्ये प्रवेश करत होतो. पण आजूबाजूला उडणारे नानाविध प्रकारचे बुलबुल, खंड्यावेडा राघु, त्यासारखे अनेक छोटे पक्षी त्यांच्या आवाजाने आमचे आदरातिथ्य करत होते. काळ्या जांभळ्या रंगाचे पंख घेऊन गुणगुण करणाऱ्या भुंग्यांना मात्र आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. ते आपले त्यांच्या सकाळच्या कामात व्यस्त होते. मजल दरमजल करत आम्ही भुतोंडे खिंडीत उतरलो जिथे आम्हाला डांबरी रस्ता लागला आम्ही वेल्ह्याच्या वेशीपाशी पोहोचलो. काही स्थानिक लोकांकडून रस्ता बरोबर असल्याची खात्री करून आम्ही पुन्हा प्रवास सुरु केला. क्षणभर विश्रांती हि पुढील मैल भर अंतर कापण्यासाठी लागणारी ऊर्जा आम्हाला देत होती. वाटेत एक मंदिरासारखे दिसणारे घर लागले. पण तिथे कोणीच नव्हते त्यामुळे थंडगार पाणी मिळायच्या आमच्या आशा धुळीस मिळाल्या. पण सुदैवाने झाडी भरपूर घनदाट होतीत्या शीतल छायेत आम्ही बरेच अंतर कापून काढले. वाटेत काही म्हसोबासारखे शेंदूर लावलेले दगड दिसले. कडेला साडीसारखे कापड असल्यामुळे देवी होती का म्हसोबा हे सांगणे जरा अवघडच आहे. बाजूला असलेल्या चुलींवरून कदाचीत प्रसाद सुद्धा तिथेच शिजवला जात असेल. नक्की कोणत्या देवाची आणि कसल्या प्रकारची पूजा होत असेल तिथे याचा काही अंदाज बांधता येईनापण विश्रांतीसाठी आम्ही मात्र ती जागा निवडली होती. तिथून थोडेच पुढे गेल्यावर एक गावकरी कुटुंब भेटले त्यांनी आम्हाला तोरण्याकडे जायचा मार्ग सांगितला. वाटेत पाण्याचे एक टाके होते पण त्यातील पाणी पूर्णपणे आटले होते

        इतक्यात आम्हाला सुशील आणि इतरांचा आवाज ऐकू येऊ लागला. आवाज दिल्यावर आणि आवाजांचा कानोसा घेत गेल्यावर शेवटी आम्हा दोन्ही ग्रुप ची गाठभेट झाली. गाडीच्या चाव्या एकमेकांना देऊन आणि एकदोन छयाचित्रे काढून आम्ही आपापल्या पुढच्या गडांकडे मार्गस्थ झालो. दुपारचं रणरणतं ऊन आता भाजून काढत होते. सकाळसारखा वेग कायम ठेवणे आता जड जात होते. एक दीड तासावर बुधला माची दिसत होती. तोरणा आता आवाक्यात आला होता पण सकाळपासून चालून चालून पाय थकले होते. वाटेत लागणारी झाडी संपली होती. बोडके डोंगर आणि वाळलेली गवते या व्यतिरिक दूरदूर पर्यंत काहीच दिसत नव्हतं. सकाळसारख्या अधूनमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झुळुका सुद्धा आता येत नव्हत्या. कोणीतरी अग्नीने मंतरलेले बाण आम्हाला मारतंय असे वाटत होते. उन्हाच्या झळांमुळं भोवळ आल्यासारखे होत होते पण सावलीसाठी एकही झाड तिथं नव्हतेआजचा सकाळचा नाश्ता पण यथातथाच होता आणि आता मात्र भुकेने पोटात कावळे ओरडायला लागले होते. पोटात काहीही नसल्यामुळे ऍसिडिटी झाली होती

         विजय आणि अवधूत उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी पटापट पुढे निसटले. आणि मागे राहिलेल्या मला एकट्याने ते थोडे राहिलेलं अंतर कापणे एक मोठे दिव्य दिसू लागले. हत्ती गेला होता पण शेपटासाठी माझं घोडं पेंड खात होतं.  सुदैवाने माझ्याकडे पुरेसे पाणी होते, पण सतत पाणी पिऊन सुद्धा काही उपयोग होत नव्हता कारण पोटात अन्न नव्हते. उष्माघातामुळे मला सतत उलटी झाल्यासारखे होतं होते. पायाला cramp येत होते. संपूर्ण रस्त्यात कुठेच पाण्याची सोया नसल्यामुळे लोकांना पाणी कमी पडते. पण मी मात्र सढळ मुखाने पित्तयुक्त पाण्याच्या उलट्या करत चाललो होतो. Dehydration होऊ नये म्हणून परत पाणी प्यायचो. परत पाणी ओकायचो. थोड्यावेळाने बघतो तर विजय आणि अवधूत माझ्या नजरेच्या टप्प्यात दिसेना मग मात्र मला सगळं अवघड दिसू लागले. एक क्षण थांबलो. गेल्या दोन वर्षात केलेले सगळे अवघड ट्रेक आठवले आणि एक निश्चय मनाशी घट्ट केला कि काहीही झाले तरी अर्ध्यात सोडता येणार नाही. आपल्याला हळूहळू का होईना पण चालत राहिले पाहिजे. शिवरायांच्या पुतळ्याला केलेला नमस्कार आशीर्वाद रुपी धावून आला कि काय देव जाणे पण कसेतरी करून मी अवसान गोळा केलं आणि बुधला माचीच्या बुरुजापर्यंत पोहोचलो. वरून एका माणसाने मला आवाज दिला आणि बुरुजाच्या इथे सावलीला यायला सांगितले. पण उन्हाने तापलेला कातळ चढुन जाणे फार फार जिकिरीचे होत होते. कसातरी जीव एकवटला आणि  सरतेशेवटी मी वरती पोहोचलो. तिथे विजय आणि अवधूत बसले होते, त्यांना पाहून मला जरा हायसे वाटले. लिंबू सरबत पिऊन थोडी विश्रांती घेतल्यावर मला जरा तरतरी आली

           पण पुन्हा तेच झाले बुधला माचीवरून रडतोंडी बुरुजाकडे जाताना पुन्हा मी मागे पडलो आणि थोडीशी वाट भटकलो एका कातळावर विनाकारण चढलो आणि एका माकडाच्या टोळीने माझे गुरकावुन माझं स्वागत केलेखाली पहिले तर रेलींग लावलेली पायवाट होती पण माकडांच्या घेरावामुळे मला खाली उतरणे कठीण झाले होते. थोडे धारिष्ट्य करून मी एक दगड हातात घेतला आणि तो भिरकवण्याची  action करून त्यातल्या मोठ्या माकडाला घाबरवलं. तसे तो सगळा त्याचा कुटुंबकबिला घेऊन पुढे सरकला. आणि त्यानंतर लोक गुरे हाकतात तसे मी माकडे हाकत हाकत बरेच अंतर कापलेकसातरी करत मी रडतोंडी बुरुजावर पोहोचलो आणि पायरीवर स्वतःला झोकून देऊन लोटांगण घातले. रडकुंडीला आलेल्या मी त्या बुरुजाचे नाव सार्थ केले होते.  बुरुजाच्या उंचीमुळे तिथे सावली होती आणि थंड वारा देखील येत होता. थोडाआराम झाल्यावर मेंगाई देवीच्या मंदिरापाशी असलेल्या आजींकडून आम्ही ताक, सरबत प्यायलो. Acidity झालेल्या पोटाला थोडी काकडी खाऊ घातली. घामामुळे चेहऱ्यावर जमलेल्या मिठाचा थर गार पाण्याने तोंड धुतल्यावर निघून गेला आणि आम्ही ताजेतवाने झालो. वाजले होते दुपारचे . २०. माझा आत्मविश्वास वाढलेला पाहून आम्ही गडउतार झाल्यावरच जेवायचे ठरवले. दोन Rock Patch आणि सगळा उतार मी झपाझप उतरलो. कॉंक्रिट चा रस्ता लागल्यावर मला जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करता येणार नाही

               खडतर प्रवास करून, संकटांवर मात करून नंतर मिळणार यश क्षणभर  जरी असले तरी त्यातून मिळणारा आनंद हा दीर्घकाळ टिकणारा असतो. सुशील ची गाडी घेऊन आम्ही निघालोखाली गावात गेल्यावर आम्ही मनोसोक्त जेवलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. सुशील चा message आला होता. शिवेंद्र चा बूट फाटल्यामुळे थोडा उशीर होत आहे. तरीसुद्धा एक अर्ध्यातासाच्या अंतराने शिवापूरच्या टोलनाक्यावर आम्ही सगळे भेटलो, एकमेकांची विचारपूस केली आणि  पुन्हा गाड्यांची अदलाबदली करून ट्रेक ची सांगता केली         




 



---वैभव
फक्त नावात





29 comments:

  1. ह्या वर्षीच्या पहिल्याच trek ला पहिल्यांदा आपली भेट झाली.. नंतर काही treks सोबतही केले, पण तुझी ही बाजू इथे पहिल्यांदा बघितली.. अप्रतिम लिहितोस तू वैभव.. keep it up..!! 👍

    .. सुशील

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुशिल... तुझ्या काटेकोर आणि अचूक नियोजनामुळे सर्व शक्य झालं...

      Delete
  2. ट्रेक करताना त्यातले बारकवे खुप मस्त टिपले आहेस! कही वर्षाणि परत वाचून आठवणी ताजी करु 😊

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for creating memories. Your fitness is amazing and your are the pacer for us to maintain the momemtum

      Delete
  3. Bhashecha vaibhav barach ahe ..chan lihalayes saglya details sakat...keep it up..

    ReplyDelete
    Replies
    1. btw me ya @gauri mam cha student ahe 🤣
      she have taught me chemistry

      Delete
    2. Nice....Gauri and me are colleagues since cognizant..now we both are in TCS

      Delete
  4. मस्तच रे वैभव. मी मात्र यावर्षी सगळे ट्रेकस मिस केले आहेत. पण त्याची कसूर वरील सगळे लेख वाचला भरून निघते आणि वाईट वाटते की आपण पण हे सर्व मिस करत आहोत पण लगेच दुसऱ्या क्षणाला तिथे जायची प्लॅनिंग डोक्यात चालू होते. तुझे डिटेल पॉईंट्स नेहमीप्रमाणेच मला नेक्स्ट ट्रेक साठी उपयोगी पडतील."वैभव" फक्त नावातच नाही तर तुझ्या अनुभवात आणि लिखणा सुद्धा आहे हे लक्षात ठेव. मी स्वतःला खूप लकी समजतो की तुझ्या सारखा मित्र मला मिळाला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank u Satyen for your appreciation...though your not on the trek...your motivation is always there with us...will definitely plan something soon...

      Delete
  5. अप्रतिम वैभव. मस्त शब्दांकन. मिच ट्रेक केल्यासारखे वाटले.

    ReplyDelete
  6. खडतर अनुभव लिहून काढणे हा सुध्दा एक वाचणाऱ्याला उर्जा देणारे टॉनिक बनु शकते.

    ReplyDelete
  7. खूप छान लिहिले आहे वैभव!! तुझ्यात एक सिद्धहस्त लेखक दडलेला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मनिष...तू यायला हवं होतं

      Delete
  8. khupach mast.
    nakkich ha trek kayam lakshat rahil.

    ReplyDelete
  9. Apratim. Agadi thararak anubhav. Tuzhe lihalele vachun ase watate ki pratyek kshan dolyasamorach aahe. Khupach chan

    ReplyDelete
  10. Vaibhav mitra. Tu khara treker ahes !!Mi tujhya barobar Salher pasun ahe pun tujhyashivay mala trek karnyat kharach maja vatat nahi.. keep it up mitra!!
    Ye dosti hum nahi chodenge hur trek me sath rahenge !
    From Avadhoot Atre.

    ReplyDelete
  11. मस्तच वर्णन केले आहेस ...वैभव

    ReplyDelete
  12. छान लिहिले आहेस...

    ReplyDelete