मला गेले काही दिवस खोकला झाला होता त्यामुळे छातीतील कफ माझ्या श्वासोच्छवासामध्ये अडथळा निर्माण करून माझ्या चालीत गतिरोधक आणत होता. त्यात आज हायकिंग पोल पण विसरला होता, त्यामुळे जास्तीचे प्रयत्न करावे लागत होते. काल रात्री नीट झोप झाली नसल्याने थोडे वर जाताच माझा वेग मंदावला. पोटातला नाश्ता आणि जठरातले आम्ल पित्त यांचे द्वंद्व सुरु झाले. थोड्यावेळ मी या युद्धाला पोटात कोंडण्याची पराकाष्ठा केली पण शेवटी त्यांनी उलटीचा रूपात सह्याद्रीच्या कुरुक्षेत्रावर धाव घेतली. आता मात्र मी थोडा ब्रेक घायचं ठरवलं. मागे वळून पहिले तर जांभूर्डे डॅम चे विलोभनीय दृश्य दिसत होते. वरून धबधब्याचे पाणी खाली येत होते. थोडे थोंडावर गार पाणी मारले, चूळ भरली. सगळे कपडे घामाने भिजून गेले होते आणि वेलकम तो गोवा सिंघम च्या तोऱ्यात सिद्धगड आम्हाला वेलकम करत होता. सुशील माझ्यासाठी थांबला होता, त्यांनी मला चघळायला एक गोळी दिली, जरा बरे वाटले पण नंतर पुढे गेल्यावर लक्षात आले कि मी वरती येताना ज्या एकी दोन ठिकाणी थांबलो तिथे कुठे तरी चष्मा विसरून आलोय. आता पुन्हा माघारी जाणे शक्य नव्हते. रॉकपॅच आला होता, जमेल का? म्हणून मला सुशील नि विचारले तेंव्हा कुठे लांबचे बघायचंय, तेवढे दिसतंय म्हणत मी वर चढलो. आता पोट रिकामे झाल्यामुळे मला थोडे हलके वाटत होते आणि राहुल सुशील पण माझ्या टप्प्यात आल्यामुळे हायसे पण वाटत होते. आज मी वेळ लावतोय हे पाहून कधी नव्हे ते सुशील देखील दिसेल त्या फुलांचे फोटो काढत होता. नेहमीप्रमाणे गावातून कोणी श्वान तुमच्या बरोबर ट्रेक ला आला नाही तर ट्रेक पूर्ण कसा होणार. या ट्रेक लासुद्धा एक श्वान युगुल आमच्याबरोबर बोरवाडी पासून येत होते. माझ्या ढासळलेल्या तब्येतीने जरा उभारी घेतल्यावर माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. घाटवाटांवरती कातळात कोरलेल्या प्रशस्त पायऱ्या किंवा इवल्याश्या पावट्या जरी नजरेस पडल्या तरी एक वेगळाच आनंद होतो. आपण कुठल्या ढोरवाटेने जाऊन भरकटत नाहीये तर योग्य वाटेवर आहोत याची एक शाश्वती मिळते. एका मोठ्या कातळकड्यावरून धबधब्याचे पाणी झिरपत होते तर बाजूलाच अशा पायऱ्या पाहताच मला हुरूप आला. आता फार फार तर २०/३० मीटर ची उंची आणि छातीवर येणार चढ संपेल आणि आपण सिद्धगड माचीवर पोहोचलोच आता. पण घोर तपश्चर्या केल्याशिवाय कोणालाही कुठलीच सिद्धी प्राप्त होत नाही त्यामुळे सिद्धगड आमची परीक्षा घेत होता. क्षणार्धात माझा भ्रमनिरास झाला वरती गेल्यावर कळाले की वाट वळून अजून वर चढत होती. सुख एवढेच कि कारवीच्या फुलांचा इथे सडा पडलेला होता आणि फार चढाई नव्हती पण ट्रॅव्हर्स मोठा आणि निसरडा होता.


थोडे वर गेल्यावर सिद्धगड बालेकिल्ला दिसायला लागला. वरच्या पठारावर दोन बैलांची झुंज चालू होती आणि २-४ गावातली पोरे त्याचा आस्वाद घेत होती. आम्हीही क्षणभर त्यांच्यात सामील झालो. दुपारचे १२ वाजत आले होते आणि तो दुर्गपुरुष अजूनही धुक्याची चादर पांघरून चिरनिद्रेत पहुडलेला वाटला. आमच्या येण्याचे त्याला काही एक सोयरसुतक नव्हते. तसेच सिद्धगड माची वरच्या गावातल्या लोकांना सुद्धा. गावात इन मीन ४/५ घरे, १३-१५ माणसे, ७/८ कुत्री आणि १५-२० कोंबड्या एवढीच काय ती गावाची सजीवसंख्या. त्या किर्रर्र जंगलामध्ये परत एखाद्या हिंस्त्र पशूने हल्ला केला तर अजून एक दोन कमी व्हायची भीती. त्यामुळे आधी वर्दी न देता आगंतुकासारखे अवतारल्यामुळे आमच्या स्वागतास तिथे फारसे कोणी उत्सुक दिसले नाही शेवटी आम्हीच एका घरात जाऊन जेवणाची काही सोय होतीये का याची चौकशी केली. घरातील कोकाटे काका खाली मुरबाड ला जाणार होते पण आम्ही फसवणार नाही, नक्की २ वाजे पर्यंत जेवायला येतो वरती जाऊन असे आश्वासन आमच्या कडून घेतल्यावर काकांनी आपल्या कारभारणीला स्वयंपाक करायची अनुमती दिली.
सकाळी उलटी झाल्यामुळे माझ्या पोटात आता कावळे ओरडू लागले होते म्हणून मी एक सफरचंद बॅगेतून काढून खात खात च गावात प्रवेश केला होता. सहसा गावातील लहान मुले आमच्या सारखे शहरी भटके बघताच गोळी, चॉकलेट, बिस्कीट मागतात पण इथे कोंबडीने माझ्या हातातील सफरचंदावर उडी घेतली. तिने चोच मारलेला शेवटचा तुकडा तिलाच बहाल केला. जेवणाची सोय लागली होती त्यामुळे आम्ही फार वेळ ना दवडता सिद्धगडाच्या बालेकिल्ल्याकडे कूच केले.
सुरुवातीला वाट मळलेली वाटली पण सर्वत्र कारवीचे रान माजले होते थोडे वर जातो तेच आम्ही वाट भरकटलो ऑल ट्रेल वरचा मार्ग सोडून आम्ही रानात घुसलो होतो . सुदैवाने लगेच लक्षात आले आणि पुन्हा शोध सुरु झाला मुख्य वाटेला कुठून लागता येईल त्याचा. पाण्याच्या वाटेने, दगड धोंड्यातून पुन्हा खाली उतरलो. शेवाळ्यावरून घसरायची भीती असल्यामुळे उठत बसत आम्ही जपून खाली उतरत होतो. श्वान युगुल आमच्या पायांमध्ये घुटमळत होते त्यांच्या मुळे त्या चिंचोळ्या रस्त्यात दगडांवरून उठाबशा करणे फार जिकिरीचे होत होते. पण त्या मुक्या प्राण्यांवर डाफरून पण काही उपयोग नव्हता. आम्हाला सोबत करायची हा निर्धार त्यांनी खाली बोरवाडी पासून च केला होता त्यामुळे त्या घनदाट जंगलात त्यांचाच आम्हाला मानसिक'आधार होता. ह्या सगळ्यात खूप वेळा गेला होता. सकाळपेक्षा आता मला थोडे बरे वाटत होते त्यामुळे मी राहुल आणि सुशील च्या वेगासोबत मिळते जुळते घेऊन चालत होतो. आता ऊन जाणवू लागले होते, बऱ्यापैकी उंचीवर आम्ही आलो होतो. शेजारी असलेल्या अजस्त्र दमदम्या डोंगराच्या उंचीला आम्ही आलो होतो. मागे वळून समोर पहिले तर आता गोरखगड आणि त्याच्या मागे असणारा मच्छिन्द्रगड सुद्धा आता खुजे वाटू लागले होते. एक दोन रॉक पॅचेस चढल्यावर सिद्धगडाच्या गुहेत आम्ही पोहोचलो. राहुल आधीच पोहोचून तिथे आमची वाट बघत होता कारण इथून फोटो तर काढलाच पाहिजे. जेमतेम १०* १५ ची गुहा, बंदिस्त खोली सारखी आणि स्वच्छ, मुक्काम करण्यास योग्य पण इथे येई पर्यंत तुम्ही तग धरला पाहिजे. समोरचा कॅनव्हास डोळ्यात आणि कॅमेऱ्यामध्ये साठवत आम्ही पुढे चालते झालो. थोडे अजून वरती गेल्यावर अजून एक गुहा लागली. हि गुहा तशी बंदिस्त नव्हती पण गुहेच्या भिंतीवर रेखाटलेले विठ्ठलाचे सुंदर चित्र लांबूनच नजरेस पडले. त्यात वरून येणार धबधब्याच्या पाण्याचा ओहोळ त्या नैसर्गिक देव्हाऱ्याचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. कडेला दिसणाऱ्या पायऱ्या जणू वैकुंठाची वाट भासू लागल्या होत्या कारण जितके वर जावे तितके गडमाथा वरून आम्हाला वाकुल्या दाखवत होता.
 |
| सिद्धगड गुहा |
 |
| वैकुंठाच्या पायऱ्या आणि विठुराया |
चंद्रभागेतिरी वाळवंटात विठुरायाच्या मंदिराचा कळस दिसला तरी भक्ताची तृषा शांत होते आणि त्याला भगवंताचे दर्शन झाल्याचं समाधान मिळते काहीशी तशीच अवस्था आता आमची झाली होती. कळस दिसला नाही तरी पांडुरंगाचे दर्शन झाले होते आता उगाचच शारीरिक मर्यादांची परीक्षा घेण्यात काय अर्थ आहे. पण हत्ती गेला आणि शेपूट राहिले असतांना अर्ध्या रस्त्यातून हार मानून माघारी फिरणे त्या देवालाही मान्य झाले नसते. पण उरलेले शेपूट हे मारुतीचे होते आणि त्यासाठी मोठी बलोपासना करावी लागणार होती. बरोबर ती मुकी श्वाने सुद्धा आमच्या बरोबर उपाशी पोटी मेहनत घेत होती. आम्ही कासवाच्या गतीने आता हळूहळू पुढे सरकत होतो. अचानक डावीकडच्या जंगलातून वानरांचे आवाज येऊ लागले कदाचित एवढ्या वरती त्यांनी कोणी येईल अशी अपेक्षा केली नव्हती.
वरूनच राहुलचा आवाज आला. काहीतरी गडबड आहे रे. हि कुत्री पुढे जात नाहीये. घाबरलेली दिसतीये. काय करायचे ? जायचे का पुढे ? का जाऊ या मागे ? तसे पण कंटाळा आलाय, संपतच नाहीये. त्या मादी कुत्रीची भेदरलेली नजर कोणत्यातरी संकटाचा सुगावा तर देत नाही ना ? जरा अजून भोवतालचा कानोसा घेतला तर मधमाश्यांचा आवाज आल्यासारखे वाटले पण वरती म्हणावे इतकी कारवी नव्हती नुसते गवत होते त्यामुळे समजेना नक्की काय गडबड आहे. दोन मिनिट आम्ही तिघे आणि २ कुत्री सगळेच थांबलो. शेवटी सुशीलने लीड घेतले आणि थोडे पुढे जाऊन बघायचे ठरवले. मग लक्षात आले कातळावर शेवाळे होते आणि पाणी वाहत असल्यामुळे कुत्री घाबरत होती. घसरले कि खाली दरीत त्यामुळे चार पायांचा पसारा आवरणे त्यांना कठीण होते पण आम्हाला जमले आणि मग इमानदारीत कुत्र्यांना पण जमले. दोन तीन वळणे घेत त्या कातळावरची वाट सुशील ला सापडली. त्याची री ओढत आम्ही सुद्धा जवळपास वरती पोहोचलोच होतो.


आज राहुल चे shoes selection चुकले होते. रनिंगचे shoes ज्याला अजिबात ग्रीप नव्हती ते घालून तो आला होता त्यात आज खूपच निसरडे पॅचेस होते. अखेरीस राहुल आणि सुशील दोन कुत्र्यांना घेऊन माथ्यावर पोहोचले. मी मात्र सुरुवाती पासूनच विकेट वाचवत हळूहळू खेळत होतो. आता मात्र माझ्या पायाला cramp यायला लागले होते त्यामुळे मी थांबून थोडेशी electrolyte पावडर खाल्ली. पाणी प्यायलो आणि एकादमात माथ्यावर धापा टाकत पोहोचलो. जात जाता एक पाण्याचे टाके दिसले पण ते स्वच्छ नव्हते. वरती पोहोचल्यावर महादेवाचे आणि नंदीचे दर्शन घेऊन मी लोटांगण घातले. वरून काय दिसते हे बघण्याचे सुद्धा मला सामर्थ्य उरले नव्हते २ मिनिट तसाच पडून राहिलो पण गडमाथ्यावर सुद्धा वारा नव्हता. सर्वदूर धुके आणि उन्हाचा खेळ चालू होता. भीमाशंकर, पदरगड ची बाजू अधून मधून दृष्टीस पडत होती पण म्हणावी तशी visibility नव्हती. त्यामुळे फार वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. घड्याळातली वेळ बघून माघारी फिरणेच इष्ट होते. दुसऱ्या टोकापर्यंत गेलो असतो तर गडावरील टाकी शोधता आली असती पण वरती भयंकर रान माजले होते आणि त्यात अजून वेळ गेला असता जे कि परवडणारे नव्हते. २ वाजले होते, एव्हाना आम्ही खाली माचीवर पोहोचून जेवायला बसणे अपेक्षित होते पण असो. फार वेळ न दवडता आम्ही परतीचा मार्ग धरला.

जवळपास ३:३० वाजायच्या सुमारास आम्ही माचीवर आलो हातपाय तोंड धुवून जेवायला बसलो. घरच्या अन्नपूर्णे ने आमच्या साठी चविष्ट वांगेबटाटा भाजी, डाळ भात असा बेत केला होता त्या वर मनसोक्त तुटून पडलो. जेवताना मावशींकडे चौकशी केली. त्यांची मुले मुरबाड ला शिक्षणासाठी होती आणि हे दाम्पत्य येऊन जाऊन असायचे. पावसाळ्यात गडावर कोणीच राहत नाही पण सध्या भात लावलेला आहे पण पावसामुळे त्याची कापणी लांबणीवर पडली होती. जाखमाता मंदिरांची वाट मळलेली आहे पण लांबची आहे त्यामुळे तुम्हाला उशीर होईल आणि वळसा पडेल अशी पूर्वसूचना त्यांनी आम्हाला दिली पण वाट मळलेली असेल तर उशीर होई ना का काय फरक पडतो. अंधाराच्या आत रानातून डांबरी रस्त्यावर लागलो कि काम झाले मग पुण्यात पोहोचायला किती का वाजेना. अशा प्रकारे पुन्हा सगळे गणित मांडून आणि आमच्या गृहितकावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या शूज च्या नाड्या आवळल्या. बोरवाडीतून आमच्या बरोबर आलेल्या श्वान युगुलांपैकी मादीने त्या भागातील सर्व नर कुत्र्यांना नादी लावले आहे त्यामुळे पुन्हा याल तेंव्हा तिला वरती आणू नका असा सल्ला आम्हाला गावातून मिळाला
 |
| महादरवाजा |
 |
| उलट प्रदक्षिणा |
इतक्यात गावातील २ जण गावात दाखल झाले. बोरवाडीतून आले का ? असे विचारून खात्री करून त्यातील एकाने माझा चष्मा मला दिल्यावर आम्हाला सगळ्यांनाच नवल वाटले जाताना गाडी चालवावी'लागणार नाही या कल्पनेने राहुल सुखावला तर अपेक्षा नसताना चष्मा परत मिळाल्यामुळे मला पण उर्वरित ट्रेक साठी हुरूप आला. ४ वाजले होते आणि आता वेळेचे नियोजन अत्यंत महत्वाचे ठरणार होते कारण पाऊस, अंधार, जंगल वाट या सगळ्याचा विचार करता आमच्या हातात २ तास होते. पण आमच्या अभ्यासानुसार आता फक्त जाखमाता मंदिरापर्यंत थोडा चढ, मग ट्रॅव्हर्स आणि मग सगळं उतार. ढगांची गर्दी जमू लागली होती. झपाझप पावले टाकत आम्ही जाखमाता मंदिराची वाट धरली वाटेत अजून एक फाटा फुटला होता व तिथे 'दगडी गोळे' अशी पाटी लावली होती. कदाचित तोफेचे गोळे असावेत पण आता ते बघण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे तिकडे न जाता पायाखालची वाट धरून आम्ही एका प्रशस्त मंदिराच्या प्रांगणात पोहोचलो. हे जाखमाता मंदिर नसून नारमाता मंदिर होते. चहुबाजूने घनदाट जंगल आणि मध्यभागी असलेल्या त्या मंदिराच्या परिसरात अनेक वीरगळी इतिहासाची साक्ष देत उभ्या होत्या. नुकताच दसरा होईन गेला होता, मंदिराच्या परिसरातील इतर देव देवता आणि एक भली मोठी तोफ झेंडूच्या फुलांनी पुजलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. झेंडू च्या माळा सुकून गेल्या होत्या पण तिथल्या शूर मावळ्यांनी गाजवलेले शौर्य अजूनही ताजेतवाने होते. नार मातेला नमस्कार करून आम्ही डाव्या बाजूने खाली जाणारी वाट पकडली. वाट अगदी मळलेली अगदी गावातल्या लोकांनी सांगितली तशी. आम्ही निश्चिन्त झालो. वाटेत महादरवाजा लागला आणि आता खात्री पटली पण माझ्या मनात वेगळीच शंका घोळत होती. आपण बोरवाडी मार्गे चढून जखमातेच्या मार्गाने पुन्हा बोरवाडी ला उतरणार होतो तर परीक्रमा करायच्या हिशोबाने आपण सिद्धगडाच्या मागच्या बाजूस जाणे अपेक्षित आहे पण आपण डाव्या बाजूने भीमाशंकर कडे जात आहोत. मध्ये अजून एक उचले गाव ची वाट लागली, आपण ती घेतली नाही म्हणजे आपण बरोबर आहोत असे मला राहुल सुशील कडून समजावण्यात आले. थोड्यावेळ त्याच वाटेने पुढे गेल्यावर लक्षात आले वाट बरोबर आहे पण हे ती वाट नव्हे जी आपल्याला हवी आहे. एव्हाना खिंड लागायला हवी होती. मग पुन्हा ट्यूब पेटली आणि आम्ही मागे फिरलो.
जवळ जवळ एक दिड किमी अंतर मागे येऊन आम्ही पुन्हा नार माते च्या मंदिराजवळ आलो आणि वरती जाणारी वाट शोध लागलो कारण त्या मार्गे खिंड लागणार होती. लगेचच योग्य वाट सापडली आणि आम्ही काही अवधीतच खिंडीत पोहोचलो. खिंडीतून पदरगड पर्यंतचा नजारा दिसत होता. पण अजूनही जाखमाता मंदिर दिसले नव्हते त्यामुळे रस्ता बरोबर आहे याची खात्री कोणी दयावी. आधी एकदा तोंड पोळले होते त्यामुळे ताक सुद्धा फुंकून प्यावे ह्या उक्तीनुसार इकडे तिकडे बघत बघत आम्ही खिंड उतरायला घेतली आणि काय सुदैव. जाखमाता मंदिर सुद्धा सापडले. हे अगदीच छोटे मंदिर होते पण वाटेवरची ठळक खूण होते. या सगळ्या गदारोळात वेळ थांबणारा नव्हता. वाजले होते ५ आणि हळूहळू अवकाशातून थेंब पडायला सुरुवात झाली होती. पाठीमागे गाडामागुन ढगांचा गडगडाट होत होता. सतत वेगवेगळी गृहीतके मांडून निसर्गाला आव्हान देणाऱ्या माणसांविरुद्ध जणू रणवाद्ये वाजायला सुरुवात झाली होती. तसा पाऊस सुरु झाला नव्हता पण वातावरण निर्मिती पूर्ण झाली होती. पुन्हा एकदा जाखमाता मंदिराच्या इथून डावीकडील वाट पकडून बरच पुढे गेल्यावर लक्षात आले वाट खाली उतरणारी पाहिजे. नशिबाने मोबाइलला नेटवर्क होते, सुशील, राहुल ने पुन्हा एकदा ट्रेल चेक केली, काही व्हिडीओ पाहायचा प्रयत्न केला आणि पुन्हा थोडे मागे जावे लागणार हे लक्षात आले. पण इथे खूप मोठा हेलपाटा पडला नाही. सुशील ला रानात घुसलेली एक वाट सापडली. मी आणि राहुल साशंक होतो पण त्या वाटेने चालू लागल्यावर आमची खात्री पटली कि आम्ही बरोबर वाट पकडली आहे. आता वेळ दवडणे नाही सुसाट वेगाने दगड गोट्यातून जितक्या लवकर ह्या रानातल्या वाटे तुन जंगल संपवून डांबरी रस्त्यावर लागता येईल ते बघायचे. मावशींनी सांगितलेली हीच ती ठळक आणि मळलेली वाट. आमच्या वाटेच्या समांतर पाण्याची वाट होती तिथून पाणी खळखळा वाहत होते आणि आमचा आनंद ओसंडून वहात होता. या वेळेस नकाशावर पूर्ण ट्रेल आमच्याकडे नव्हती पण आम्ही वाट शोधली होती. एक वेगळीच अचिएव्हमेन्ट. हा आनंद साजरा करायच्या आधीच याला गालबोट लागले, जवळपास अर्धातास आम्ही त्या वाटेने खाली उतरलो आणि अचानक एके ठिकाणी थबकलो वाटेत दरड कोसळलेली होती आणि वाट बंद झाली होती. पुन्हा नवीन आव्हान आणि नवीन गणिते मांडायची वेळ आली. वेळ पुढे सरकत होता आणि आम्हालाही त्वरित निर्णय घेऊन पुढे सरकणे भाग होते. कुठूनच मार्ग दिसेना. एकावर एक रचलेले दगड, रिबीन किंवा चिंध्या, कापलेल्या फांद्या काही काही दिसेना. या मार्गाने कोणी जा ये केली असती तर काही तरी खुणा सापडल्या असत्या पण आज नियतीने आम्हाला चुहूकडून घेरले होते. शेवटी शेजारी वाहणाऱ्या पाण्याच्या मार्गातून जेवढे शक्य होईल तेवढे खाली जाऊ, पुढे काही तरी मार्ग दिसेल या आशेवर आम्ही पाण्याच्या वाटेने अर्थात नाळेच्या वाटेने खाली उतरणे चालू ठेवले.
 |
| जाखमाता मंदिर |
 |
| नारमाता मंदिर |
आता मात्र आमचा सगळा कारभार रामभरोसे चालू होता. सुपेनाळ च्या ट्रेक मध्ये सुद्धा असाच अनुभव आला होता पण आज दुसरा इलाज नव्हता, पाण्याला वाट नसते आणि ते कुठूनहि खाली गुरुत्वाकर्षणाने येऊ शकते पण त्याच्या वाटेवर आपण विसंबून राहू शकत नाही. पुढे कुठल्यातरी कड्यावरून पाणी खाली उडी मारू शकते, पण आपण नाही. राहुलने त्याची भीती प्रांजळपणे मांडली कि ह्याच वाटेने परत वरती जायची वेळ आली तर वाट लागेल. "शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला लागली आग". अगदी झालेही तसेच. पुढचे वाटेतील दगड प्रचंड शेवाळलेले होते आणि पुन्हा नाळेच्या वाटेतून रानात जाणारी कुठली वाट हि दिसेना. एव्हाना आम्ही बरेच खाली आलो होतो. जवळपास २०० मीटर तरी खाली उतरलो होतो.
तरीसुद्धा आमच्यातले survival instinct अजून शाबूत होते. चहूबाजूला कुठून बाहेर पडायचा मार्ग दिसतोय का याचा नव्याने शोध सुरु झाला. शेवटी कारवी मोडून शेजारच्या डोंगरावर चढून काही मार्ग दिसतोय का याचा प्रयत्न झाला पण सर्व व्यर्थ. संधिप्रकशाची जागा हळूहळू काळोख व्यापत चालला होता त्यामुळे शेवटचा एकाच मार्ग दिसत होता. आता अतिहुशारी न करता आणि जास्त डोके न लावता पुन्हा आलो त्या वाटेने वरती जाणे आणि माचीवर पोहोचून पुढचा निर्णय घेणे. सर्वात प्रथम त्या जंगलामधून बाहेर पडणे महत्वाचे होते. वाट उतरायची ह्या हिशोबाने सर्वांकडे पाणी थोडेच होते. राहुल आणि सुशीलच्या मोबाइल चे चार्जिंग जेमतेम उरले होते आणि धो धो पावसाला सुरुवात झाली होती. आलो तेवढे अंतर आता धोधो पावसात पुन्हा वर चढणे आणि ज्या ठिकाणी रानातून पाण्याच्या नाळेत शिरलो त्या ठिकाणी पोहोचून पुन्हा रानातल्या वाटेने वरती जाखमाता, खिंड, नार माता मंदिर या मार्गे सिद्धगड माची वर पोहोचणे. दिवसभराच्या धावपळीनंतर आमची स्वतःचीच बॅटरी संपायला आली असताना, तुटपुंज्या मोबाइल च्या बॅटरी च्या आधारे आम्हाला उलटा खडतर प्रवास करायचा होता. तिघांचीही डोकी सुन्न झाली होती पण कसे तरी धैर्य एकवटून आम्ही नाळेच्या वाटेतून वर चढायला सुरुवात केली. मला का कोण जाणे दूधसागरच्या घटनेची आठवण यायला लागली. (दुधसागर) डोंगरमाथ्यावर ढगांची आदळआपट सुरु झाली होती. नाळेच्या वाटेतून येणाऱ्या पाण्याचा वेग वाढत होता आणि आम्ही बाहुबली सारखे प्रवाहाच्या उलट दिशेने वरती चढत होतो.
आता मानसिक संतुलन कितीही स्थिर ठेवले तरी नुसत्या मानसिक बळावर लक्ष्य गाठणे शक्य नव्हते. शारीरिक कष्ट सोसायची परिसीमा कधीच ओलांडली होती, पायात पुन्हा सकाळ सारखे cramp यायला लागले. इतके वेळ चष्म्याच्या कडांनी ओघळणारे घामाचे खारट क्षार डोळ्यात जाऊन डोळे झोंबत होते. ते सताड उघडे ठेवले तरी समोर दिसत होते फेसाळणारे पाणी आणि आजूबाजूच्या जंगलात पसरलेला काळाकुट्ट काळोख.
मनातल्या अनामिक भीतीमुळे वेग मंदावला आणि आम्हा तिघांची ताटातूट झाली. तिघेही तीन दिशेला जंगलात पांगलो. सुरुवातीला मला सुशीलचा आवाज येत होता पण नंतर पावसाच्या आवाजाला भेदून त्याला उत्तर देणे मला शक्य होत नव्हते. राहुल मधेच कुठे गायब झाला काही कळायला मार्ग नव्हता. कदाचित रानातून ज्या ठिकाणी नाळेच्या वाटेत शिरलो ती जागा त्याला सापडली असेल आणि तो वर पोहोचला असेल अशी माझी समजूत मी करून घेतली.
पण आता या जंगलात आपण ऐन पावसात पुरते फसलो आहोत या भीतीने माझी पूरती गाळण उडाली आणि लक्षात आले आता खारट पाणी डोळ्यात जात नाहीये कारण चष्मा नाळेच्या वाटेत पाण्यात कुठे तरी वाहून गेला होता. पावसाच्या पाण्याने मी नखशिखांत भिजलो होतो. चालून गरम झालेल्या अंगावर धोधो पावसाने मारा केला होता त्यामुळे आता अंगात थंडी भरत होती. हातातल्या घड्याळावर रक्तदाब बघितला तर तो १६० च्या वर गेला होता. डोकं बधिर झाले, काय करावे सुचेना. ओरडून हाका मारून पण काही फायदा नव्हता.
शेवटी मी एक क्षण थांबलो, नाळेतून रानात शिरण्याच्या विचार मी सोडून दिला. हळूहळू ह्याच मार्गाने वर जाऊ कुठे तरी सपाटी लागेल तेंव्हा तिथून माचीचा मार्ग शोधू असा विचार माझ्या डोक्यात आला पण मधेच कुठे चढता नसते आले किंवा धोधो वाहणाऱ्या पाण्यात कुठे पडझड झाली असती तर केव्हढ्यात पडेल. पण चान्स घेण्याशिवाय पर्याय नव्हता. सुदैवाने मी हेडटॉर्च आणला होता तो डोक्याला लावला थोडीशी ORS पावडर खाली. घड्याळ्यावर नॅव्हिगेट बॅक चा पर्याय कुठे सापडतो का याचा शोध घेतला पण ओल्या झालेल्या हातांमुळे ते जमत नव्हते त्यामुळे त्याचाही नाद सोडून दिला. हळूहळू मी पाण्याच्या वाटेतील दगडधोंड्यांच्या आधारे पाण्याला भेदत वरती चढू लागलो. बऱ्यापैकी वर चढल्यावर विचार केला याला अंत नाही त्यामुळे कुठे तरी रानात घुसलो तरच लवकर वरती पोहोचेन अन्यथा पाऊस वाढला तर या नाळेच्या वाटेने जाणे अवघड होईल. शेवटी मी कुठे तरी उजवीकडे रानात शिरलो माझा टॉर्च बहुधा राहुल किंवा सुशील ला दिसला आणि त्यांनी मला आवाज दिला "अजून उजवीकडे ये, वाट दिसेल" त्यांचा आवाज ऐकून मी सुटकेचा निश्वास टाकला. वाट तिथेच होती आणि मग सुरु झाली आमची तिघांची एकत्रित उलट यात्रा. आता कितीही उशीर झाला तरी एकत्रच राहायचे ठरले. त्यांच्या मोबाइलला ची बॅटरी मरायला आलेली. सुदैवाने मी माझा मोबाइल flight mode वर टाकला होता आणि हेड टॉर्च माझ्या कडे होता त्यामुळे पुन्हा एकदा चुकलेल्या गणिताचा गुंता सुटेल अशी आशा पल्लवित झाली.
कसे तरी करत जाखमाता मंदिरापाशी आलो. माझे पाय बोलू लागले होते आणि एक एक पाऊल टाकणे सुद्धा मला आता जिकिरीचे होत होते. पण राहुल सुशील मला प्रोत्साहन देत होते. आता फक्त खिंड राहिलीये रे. ती चढून वर गेलो कि माची वर.
पण आज नियती ने आम्हाला नापास करायचेच ठरवलेच होते त्यामुळे पुन्हा एकदा जाखमाता मंदिरापासून खिंडीत वर चढणारी वाट सापडेना. एक ५ मिनिट चकवा लागल्यासारखे झाले. त्यात हेडटॉर्च च्या प्रकाशात मला झाडावर काही सरडे किंव्हा सापसुरळी तत्सम काही जीव सरकताना दिसले. त्यामुळे जास्त वेळ एकाजागी थांबताना सुद्धा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या भीतीने जीव घाबराघुबरा होत होता. इतक्यात मला मस्त कोरलेल्या पायऱ्या दिसल्या आणि आमची शोधयात्रा संपली वाट सापडली आणि आम्ही खिंडीत पोहोचलो. झपझप उलट्या बाजूला उतरून आम्ही सिद्धगड माची गावात प्रवेश केला वाजले होते ७/७:१५.
जाखमाता मंदिराजवळ कुठेतरी राहुलच्या डाव्या भुवई जवळ जखम झाली होती कुठली फांदी लागली का घसरून पडला ते त्यालाच ठाऊक. तिथले रक्त साखळलेले होते आणि सूज हि आली होती. हे दुखणे कमी त्यात परत हा पावसातील उलटा प्रवास. असा सगळा पराक्रम आणि त्याच्या खुणा मिरवत आम्ही गावात प्रवेश केला होता. आता गावात सर्व हकीकत सांगितली तर वन खात्याकडे प्रकरण जाऊन बोंबाबोंब होते शकते त्यामुळे तिघांनी एकाच वाक्यावर ठाम राहायचे ठरले. गावात कोणी विचारले तर सांगू "जाखमाता मंदिराच्या इथे पाऊस सुरु झाला, वाट पहिली पण पाऊस थांबेना म्हणून आम्ही परत आलो. "
पुन्हा एकदा दुपारी जेवलेल्या कोकाटे काकांच्या घरी दरवाजा ठोठावला. एवढ्या उशिरा अंधारात आणि तेही बाहेरच्या धोधो पावसात आम्हाला पाहून ते चपापले. त्यांना अंदाज आला पण त्यांनी अजून उपदेशाचे डोस द्यायच्या आधीच आम्ही त्यांना आमचा प्लॅन सांगितला. जे व्हायचे ते झाले होते आम्ही पावसात अडकलो आणि जाखमातेच्या रस्त्याने बोरवाडी पर्यंत जाऊ नाही शकलो. त्यांना आम्ही विनंती केली कि आजची रात्र आमची राहायची सोय करा मग उद्या सकाळी आम्ही उठून जातो. जर कोणी वाटाड्या असेल तर पुन्हा जाखमातेच्या रस्त्याने जाऊ आणि त्याच्याकडे तुमचे आणि त्याचे दोघांचेही पैसे देऊ कारण आमच्याकडे आत्ता पैसे हि नव्हते आणि त्यांच्याकडे google pay वगैरे सारखे पर्याय नव्हते. आणि असते तरी आमच्या मोबाइलच्या बॅटऱ्या शेवटच्या घटका मोजत होत्या.
काका आधी तयार होईनात. थोडे पुढे जाऊन एक मंदिर आहे तिकडे रहा असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला पण ओल्या कच्च कपड्यामध्ये उघड्यावर पूर्ण रात्र काढणे शक्य नव्हते. परत सिद्धगड माची हा सुद्धा भीमाशंकर अभयारण्याचा भाग त्यामुळे रात्रभर हिंस्त्र पशूंची भीती होतीच. आम्ही त्यांना चहा मिळेल का आणि असेल तर तेवढा द्या मग आम्ही बघतो असे बोलल्यावर त्यांना आमची दया आली असावी. त्यांनी चहाची व्यवस्था केली आणि गावात एक रिकामे घर आहे तिथे तुमची सोया करतो असे आश्वासन दिले. सुशील आणि काका पावसात जाऊन ते घर बघून आले. आज इथेच राहून उद्या सकाळी घरी येतोय असे लागलीच घरच्यांना कळवून टाकले कारण मोबाइल कधी विझले असते याचा नेम नव्हता आणि गावात वीज सुद्धा नव्हती त्यामुळे तो पुन्हा चार्ज करायचा प्रश्नच नव्हता.
तिथे आमची अगदी फाईव्ह स्टार सोया झाली होती. मस्त दगडी जोत्यावर कळकाच्या काठयांनी शेणा मातीने शाकारलेले आणि सारवलेलं कौलारू घर होते. घरात कपडे वाळत घालायला दोऱ्या होत्या. एक प्रशस्त लाकडी दिवाण होता. चूल होत. आम्ही आत जाऊन थोडंफार झाडून घेतले आणि स्थिरस्थावर झालो. काकांनी आम्हाला सतरंजी, चटई, अंग पुसायला टॉवेल सुद्धा दिले होते. सर्व प्रथम आम्ही ओले कपडे वाळत घातले आणि दिवसभर घडलेल्या चुकांची उजळणी करायला बसलो. काकांनी आम्हाला बदलायला कपडे सुद्धा दिले होते. ते बदलल्यावर आणि घरात चूल पेटल्यावर जरा घर उबदार वाटू लागले. एखाद्या मठाधिपती सिद्ध पुरुषाने वस्त्रांमध्ये न अडकता दिगंबर रहावे त्या प्रमाणे कोणतीही लाज ना बाळगता आम्ही शर्ट आणि टॉवेल या अनोख्या सोवळ्यात त्या घरामध्ये स्थिरस्थावर झालो.
सुशीलला भरलेली थंडी पण पळून गेली आणि राहुलचे त्याच्या सुजलेल्या डोळ्याकडे पण लक्ष गेले. वीज नसल्यामुळं मोबाइल आणि हेडटॉर्चच्या प्रकाशात राहुलने भुवईवरची खपली काढली आणि त्यातील रक्त दाबून काढून सूज उतरवण्याचा रानटी प्रयत्न केला. कारण घरी आई आणि स्वानंदी त्याच्या सुजलेल्या डोळ्याकडे कानाडोळा करू शकणार नव्हत्या आणि तो त्यांच्या नजरेला नजर देऊ शकणार नव्हता त्यामुळे घरी पोहोचायच्या आत त्याचा बंदोबस्त त्याला करायचा होता.
येताना कुठल्या कुठल्या दगडगोट्यांवर हातपाय आपटले होते, कुठे झाडांच्या फांद्यांनी खरचटले होते ते आता जाणवू लागले होते. पावसाचा जोर काही कमी होईना. शेवटी काका पिठलं भात घेऊन आले आणि त्या देवमाणसाने दिलेल्या त्या प्रसादाचे भक्षण करताच आमच्या जीवात जीव आला. दिवसभर पावसात भिजल्यामुळे नाक चोंदले होते. चुलीजवळ पेटती लाकडे फुंकून कानाला बसलेले दडे आणि नाक मोकळे करायचा प्रयत्न केला पण फार यश आले नाही. शेवटी काकांनी दिलेल्या ब्लँकेट्स मध्ये शिरताच मी माझ्या चोंदलेल्या नाकाने वरचा निषाद लावला आणि झटकन तारसप्तकात शिरलो. पुढे त्याच गजराने राहुल सुशील मला सकाळी उठलेले दिसले. समोरच्या घरातल्या काकांनी कार्यालयात असावे तसे मोठे पातेले बाहेर आणले होते आणि मोठ्या चुलीवर त्यांनी पाणी तापायला ठेवले होते. पाऊस थांबला होता. अंधारातच प्रातःर्विधी उरकून घ्यावा असा विचार डोक्यात आला पण निसर्गाने आमची एवढी क्रूर चेष्टा केली होती कि आमचे शरीर आता निसर्गाच्या हाकेला सुद्धा ओ द्यायला तयार नव्हते त्यामुळे अजून त्यावर बळजबरी करून त्याची हेळसांड करण्याचा प्रयत्न सोडून दिला. परत एवढ्या तेव्हड्या कारणासाठी पुन्हा ओले शूज घालायचा कंटाळा तो वेगळाच. तरी पण मी जाऊन समोरच्या काकांना राहुल चा मोबाइलला चार्जिंग ला लावायची विनंती करून आलो त्यांनी तो लावला देखील पण विशेष काही चार्ज झाला नाही.

कोकाटे काकांना सकाळी वाटाड्या बद्दल विचारणा करताच कळाले कि तो शेतावर गेला आहे त्यामुळे तो येईपर्यंत वेळ घालवण्यात अर्थ नव्हता त्यामुळे आम्ही काकांच्या मुलाच्या नंबर वर google pay करून त्यांचे आभार मानले आणि रजा घेतली. परतीच्या प्रवासात आमची वाट सोडून गेलेले श्वान युगुल पुन्हा आमच्या पायांमध्ये घुटमळू लागले. रात्रभर कुठे गायब झाले होते देव जाणे. त्यांना सुखरूप पाहून बरे वाटले. आम्ही आलो त्या मार्गानेच पुन्हा बोरवाडीला जायचा रस्ता धरला.
पाऊस पूर्णपणे थांबला होता कालचे मळभ दूर झाले होते आणि गावातून पठारावर मोकळ्या जागी येताच आम्हाला जे काही दिसले ते स्वर्गापेक्षा कमी नव्हते. कदाचित त्यासाठीच कालच्या मरणयातना भोगल्या असाव्यात. वातावरण स्वच्छ होते. कोवळ्या उन्हात गवताची पाती चमकत होती. एका बाजूच्या दरी मध्ये सगळे ढग जमा झाले होते आणि दूरवर दिसत होते माहुली गडाचे सुळके, चंदेरी, ताहुली आणि माथेरान ची पूर्ण डोंगररांग. तर दुसरीकडे पदरगड, कोथळीगड, नाखिंद्या,आणि भीमा शंकरचा परिसर. अजूनही बरेच गडकोट विरत चाललेल्या धुक्यातून त्यांचे दर्शन देत होते. जांभूर्डे धरणाच्या जलशयावरून ढगांची चादर आजूबाजूच्या हवेत विरळ होत चालली होती. सिद्धगडाच्या कपारींमधून सगळे धबधबे प्रवाही झाले होते आणि हे सगळे दृश्य नजरेत साठवायला आज आमच्याकडे वेळ आणि चांगली मनस्थिती होती. कदाचित हेच सह्याद्रीचे अफाट, विराट आणि लोभस दृश्य दाखवण्यासाठीच सिद्धगडाने आम्हाला तिथे राहायची गळ घातली असावी. कितीतरी ट्रेकचे यशस्वी आयोजन आणि अंमलबजावणी करून देखील या वेळेस कशी काय चूक झाली या विचाराने ग्रासलेल्या आम्हा तिघांना मात्र निसर्गाचा प्लॅन आज उलघडत होता. कदाचित हेच त्या विधात्यास अपेक्षित असावे म्हणून त्याने आमचे नानाविध संकटांपासून रक्षण केले, वेळेला कोकाटे काकांच्या रूपाने आम्हाला दर्शन आणि मार्गदर्शन दिले. आम्ही चुकत होतो पण आमच्या मागे त्या मुक्या जनावरांना भरकटू नाही दिले. आणि मुख्य म्हणजे कितीही ट्रेल चा अभ्यास केला तरी निसर्गाला गृहीत धरून कोणतीच मोहीम फत्ते करता येणार नाही हा मोठा धडा आम्हाला शिकवला. आम्ही जी ट्रेल पाहून आराखडा आखला होता तो बरोबर होता पण ज्यांनी आधी हा ट्रेक केला होता ती वेळ जानेवारी मधली होती आणि आम्ही ऑक्टोबर मध्ये एवढ्या मोठ्या पावसाची अपेक्षा केली नव्हती आणि तिथेच सगळे चुकत गेले.

दिवसाढवळ्या त्या निसरड्या वाटेने येताना रात्री तिथेच राहायचा निर्णय योग्य होता आणि तो वेळीच घेतला या बद्दल आम्हालाच आमची पाठ थोपटून घ्यावीशी वाटत होती. सुकलेले कपडे पुन्हा एकदा छातीएवढ्या गवताच्या वाटेने चालताना ओले होऊन गेले पण आज त्याची तमा नव्हती कारण ऊन पडले होते. सकाळी ८: ३० पर्यंत आम्ही खाली बोरवाडी गावात आलो. काही मुले आम्हाला वाटेत भेटली त्यांना आमच्या अनुभवानुसार थोडे मार्गदर्शन केले आणि तब्बल ४ तास तरी वर पोहोचायला लागतील (सिद्धगड माची २ तास आणि बालेकिल्ला २ तास) असा मित्रत्वाचा आणि खराखुरा सल्ला दिला. पेंद्या सदृश्य व्यक्ती हसतमुखाने आमची वाट बघताना आढळला. त्यांच्या घरात कपडे बदलून आणि काही वेळ मोबाइल चार्ज करून घेऊन आम्ही पुण्याकडे निघण्यास सज्ज झालो एवढ्यात तिथे पन्नाशी ओलांडलेल्या वयस्कर ट्रेकर्सचा ग्रुप तिथे आला. आमच्या कडे चौकशी करताच आम्ही त्यांना वाटाड्या घायचा सल्ला दिला. खरेतर ९ वाजले होते पण तरी सुद्धा पुढच्या दिव्य संकटाची नुकतीच अनुभूती घेतलेल्या आम्हाला त्यांची काळजी वाटू लागली पण सगळे आमच्यासारखेच पट्टीचे ट्रेकर्स वाटत होते आणि त्यात त्यांनी आमचा सल्ला ऐकून वाटाड्या घेतला होता हे पाहून बरे वाटले. त्यांना ऑल द बेस्ट करून आणि गावात फक्कड बिना दुधाचा चहा पिऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
वनखात्याच्या चेकपोस्ट जवळ पुन्हा एकदा वेगळ्या अधिकाऱ्याकडून चौकशी झाली. तिथे गाडी लावून आम्ही जांबुर्डी धरणाच्या जलाशयावर गेलो. थोडेफार फोटो सेशन करून आम्ही रस्त्याला लागलो आणि अशा प्रकारे बिना चष्मा साऱ्या प्रवासात गाडी ड्राईव्ह करून माझ्या डोळ्यांना दिव्यशक्ती प्राप्त झाली होती. कालच्या दिवसापासून सतत नवीन आव्हानांना तोंड देऊन एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला होता. सिद्धगडाच्या आठवणी मनात रुंजी घालत असतानाच दुपार पर्यंत घरी पोहोचलो. घरी आल्यावर सगळया गोष्टींना रेंज आली. नकाशावर किती थोड्या अंतरासाठी गडबड झाली आणि आमचा एक दिवसाचा प्लॅन दोन दिवसाचा झाला हे पाहिल्यावर आम्ही तिघेही हळहळलो.
 |
| so close, yet so far |
या वेळेस डोक्यात पुढच्या ट्रेकचा विषय नव्हता कि उद्याचा ऑफिस चा सुद्धा. या वेळेस अगदीच हौश्या नवश्या ट्रेकर प्रमाणे आमचा ट्रेक झाला होता. कुठे संकटात अडकलो नाही किंवा वेळेला कसे योग्य निर्णय घेतले याचा अहंगंड मिरवावा कि थोडे आत्मपरीक्षण करावे आणि ज्या चुका टाळता येऊ शकत होत्या त्या पुढच्या वेळेस कशा टाळाव्यात या साठी सिंहावलोकन करावे हाच सवाल उरला आहे. त्याचे उत्तर मिळायचे असेल तेव्हा मिळेल पण एक मात्र खरंय, सिद्धगडाने आम्हाला एक नवीन सिद्धी प्राप्त करून दिली आणि आमचे डोळे उघडून दिले.
सुशील, राहुल कितीही म्हणत असले आता यापुढे ट्रेकिंग बंद तरी ते त्यांना कितपत शक्य होईल ते त्या सिद्धगडास ठाऊक. असो. अधून मधून असे अनुभव घेणे सुद्धा गरजेचे असते या मताचा मी आहे त्यामुळे ह्यातून धडा घेऊन ट्रेकिंग चालू ठेवायचा माझा तरी मानस आहे. बाकी कार्य सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ आहेतच.
भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन थरारक ट्रेक वर... अशीच अनुभवांची सिद्धी प्राप्त करायला.
हरहर महादेव
---वैभव
फक्त नावात