Tuesday, October 14, 2025

महाभारत (माणुसकी Vs भूतदया)


 दिनांक : १२-१०-२०२५, रविवार

 वेळ:  संधीप्रकाशाची (अगदी नृसिंह अवतार प्रकटण्याची)

 स्थळ: सिंहगड (गड आला पण सिंह गेला तिथेच)   

काल बातमी वाचण्यात आली राजगड वर पुन्हा अपघातात २४ वर्षीय तरुणी गंभीर रित्या जखमी . मधमाश्यांनी  हल्ला केला आणि बचावाचा प्रयत्न करताना तोल जाऊन संजीवनी माचीवरून ४० फूट खोल दरीत ती पडली.  मणक्याला दुखापत होऊन जायबंदी झाली. सुदैवाने रेस्क्यू टीम तिथेच पद्मावती माचीवर होती त्यामुळे पुढील मदत त्वरित मिळाली आणि जीव वाचला.  क्षणभर  फार वाईट वाटले. आमच्या सारखे भटके संजीवनीच्या प्रेमात पडतात आणि इथे काही लोकांचा तोल जातो ?

पण हि काही पहिली वेळ नाहीये राजगडावर. पर्यटक हुल्लडबाजी करायला लागले कि इथल्या मधमाश्या, माकडे आणि एकंदरीत सगळा निसर्ग राजांचा गड राखायला सज्ज होतात. शासन नवीन नियमावली काढेल, काही काळासाठी बंदी घालेल, गडावर यायच्या वेळेत बदल करेल पण हे सगळे वराती मागून घोडे. 

असो, कोकणी रानमाणूस सारखे निसर्गाचे महत्त्व इथे सांगत बसत नाही, पण मला मात्र जेंव्हा जेंव्हा अशा घटना घडतात तेंव्हा क्षाणिक दुःख होते आणि क्षणिक असुरी आनंद. आंनद याचा की निसर्गाचा मान न ठेवणाऱ्या आणि सर्वत्र कुरघोडी करणाऱ्या माणसांवर निसर्गाने  जेंव्हा सूड उगवतो  त्याचा. 

असो, कुठे अपघात होवो नाही तर काहीही होवो,  "आपली सिंहगड वारी ...जगात भारी "  नवरात्रात ९ दिवस ९ वेळा आणि खंडेनवमी आणि विजयादशमीच्या रात्री ५ वेळा सिंहगड चढून उतरून चांगलीच दमछाक झाली होती. क्वार्टर  एव्हरेस्टिंग झाले खरे पण नंतरच्या आठवड्यात ऑफिस मध्ये बरीच धामधूम  होती आणि त्या धबडघ्यातून म्हणावी तशी विश्रांती मिळाली नाही. सिनियर VP ची पुणे ऑफिस ला भेट आणि तिच्या बरोबर च्या सर्व बैठका व्यवस्थित पार पडल्या कि देवी पावली म्हणायचे. नीट विश्रांती काही मिळाली नव्हती .        

टीम लंच, टीम डिनर  झाले खरे पण ह्या स्ट्रेस बर्स्टर ऍक्टिव्हिटीचाच मला कधी कधी स्ट्रेस येतो. त्यात  पुन्हा व्हेज- नॉन व्हेज, ड्रिंकर- नॉन ड्रिंकर (चकणा वीर)  अश्या  फुटकळ विषयांना नव्याने फोडणी घालून शिळ्या कढीला ऊत आणला जातो. नॉन व्हेज खाण्याला माझा विरोध असायचे काही कारण नाही, कारण मी स्वतःच अंड खातो पण कुत्रा अथवा मांजर पाहिल्यावर aaw  cute म्हणणारी लोक जेंव्हा चिकन मटण वर आडवा हात मारतात तेंव्हा मात्र नवल वाटते. असे  पुतणा मावशीचे दूध प्यायलेले हे आधुनिक श्रीकृष्ण, चटकन पार्टी बदलतात तेंव्हा भूतदया आणि  माणुसकी सारख्या तकलादू रथात बसलेल्या आम्हा पामरांचा सॉरी पार्थ लोकांचा गोंधळ उडतो. 

पण हे लोक खऱ्या अर्जुनासारखे गीतासार एका घोटात bottoms up करून निसर्गातल्या कौरवांची शिकार करायला सज्ज होतात. मग त्यात चिकन मटण बरोबर इतर प्राणीही आलेच. त्वचेसाठी चांगला म्हणून मासा, हाडांसाठी चांगला म्हणून खेकडा. आपण माणूस आणि आपला धर्म माणुसकी म्हणून धर्माच्या रक्षणासाठी आणि माझ्या  त्वचेच्या सौंदर्यवर्धनासाठी मी मासे खाल्ले पाहिजेत, हाडांच्या मजबुती साठी खेकड्याच्या नांग्या ठेचल्याच पाहिजेत. शर्यतीत हरणाऱ्या सश्याला या महाभारतात काय स्थान, खोबऱ्यासारखा लागतो तर टाका खाऊन. कबुतरे तर मेली फारच प्रदूषण करतात आणि ह्या जैन मुनींना लैच पुळका यांचा, काय तर म्हणे नवीन राजकीय पक्ष काढतो आणि चिन्ह म्हणून कबुतर ठेवतो.  आता कोण सांगणार याला आम्ही मोर पण ठेवत नाही राष्ट्रीय पक्षी असून सुद्धा, तुझ्या कबुतराला सोडणारे का. इमारतीच्या सज्जावर उघड्यावर प्रणय करणारा पक्षी कधी पोहोचवणार त्या मैने प्यार किया मधल्या सुमन ची चिट्ठी सल्लू भाई कडे. काम का ना काज  का दुश्मन अनाज का.  धर्म आणि काम विसरलेल्या या क्षुद्र प्राण्याला खाऊनच संपवला पाहिजे मग भले त्याच्या विष्ठेच्या प्रदूषणाने आपण मेलो तरी बेहेत्तर.  पण या प्राणी आणि माणसातल्या महाभारतात विजय धर्माचा झाला पाहिजे. हरीण वगैरे तर रामायणापासून allowed आहे त्या मुळे धर्माच्या शास्त्रात बसतंय त्यामुळे हरीण खाणे तर शास्त्रच असले पाहिजे.

आमचे काही colleague ह्या आधुनिक महाभारतातले रथीं महारथी आहेत. या धार्मिक कार्यांत समस्त मानवजातीचे कल्याण व्हावे आणि या युद्धाच्या समयी आपले पानिपत होणार नाही या साठी त्यांनी विशेष काळजी घेतली आहे. मध्ययुगीन काळातले सगळे संदर्भ आता कालबाह्य झाले आहेत आणि त्यांना तसा काही ऐतिहासिक पुरावा नसेल आपण त्यांचा त्याग करून आधुनिकतेची कास धरली पाहिजे.  सुभेदार तानाजी मालुसरे यांचा त्याग आणि युद्ध जरी खरे मानले तरी घोरपड लावून सिंहगड चढले हे आत्ताच्या Genz पिढीला पटेल का? (आम्ही होतो बावळट, आम्हाला हि भाकडकथा खरी  वाटली. तसे आम्हाला काही पण खरे वाटायचे. असो, पण खरंच रिकी पॉन्टिंग आणि सनथ जयसूर्याच्या बॅट मध्ये स्प्रिंग होती हे त्रिकालाबाधित सत्य आहे). तर मुद्दा काय ? घोरपड खरंच गड चढायच्या काही कामाची होती का ? असेल तर पुरावा द्या आणि नसेल तर खाऊन टाका तिला पण. काय उपयोग तिचा आता. सांधेदुखी वर घोरपडीचे तेल वापरतात असं  कुठे तरी वाचले होते पण तिचे तेलकट मांस खाल्ले तर संधीवाताला संधीच मिळणार नाही आणि माणूस म्हणून आपण हा रोग कालबाह्य करू शकतो.  जसा नारू नाही का केला अगदी तसाच. संधिवाताचा रोगी दाखवा आणि १००० रुपये मिळवा. उपचार सोप्पा आहे. पोलिओ च्या डोस सारखे २ थेम्ब घोरपडीचे तेल आणि फरक नाहीच पडला किंवा चव आवडली औषधाची कि अक्खी घोरपड खाऊन टाकायची. काय बिशाद त्या दुखण्याची पुन्हा मान वर काढायची. सरळ खांडोळी करायची, आपल्या मानेची नाही...  त्या यशवंती घोरपडीची.         

 आसाम, चीन आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये तसेच दक्षिण आशियाई देशांमध्ये तर ज्या गोष्टी स्वतःहून हालत आहेत त्या गोष्टी खाण्यालायक आहेत समजून पोटातील समराग्नि  शमवला जातो. अगदी गणपतीचे वाहन असलेला उंदीर, बेसूर पणे डराव डराव करणारा बेडूक असो किंवा न आवाज करता नुसते फुत्कार टाकणारा साप नाग असो, आधुनिक महाभारतात कोणाचीच हयगय नाही. माणूस ठेवला तेच पुष्कळ. 

धर्मराज युधिष्ठिराला झाली असेल मदत सोबत असलेल्या कुत्र्याची स्वर्गात जायला पण आजकाल कुठे असतात असली कुत्री. त्यांचेच किती नखरे. आणि हे पृथ्वीवरचे महाभारत जिंकल्यावर इथले हस्तिनापूर स्वर्गापेक्षा काही कमी असणार आहे का ? पाहिजेत कशाला कुत्री मांजरी.  अमुक तमुक च्या पॉडकास्ट वर तर महाचर्चा झाली लग्न करण्यापेक्षा पेट पॅरेन्ट झालेले बरे का वाईट? हे म्हणजे प्राणी आणि माणूस यांच्यातल्या महाभारताच्या कन्सेप्ट लाच हरताळ फासण्यासारखे झाले. धर्म वगैरे काही आहे कि नाही, हे विचारायला नको का आम्ही स्वतःला ?  आणा तो कुत्रा चॉपिंग बोर्ड वर आणि याद राखा पुन्हा भुंकण्याचा आवाज आला तर. (लुकतुके उवाच)

तर असं सगळं आहे. युद्धाची तयारी झालेली होती. रविवार सकाळ मटणाच्या दुकानासमोर रांग लागलेलीच होती. पण आम्ही आपले कलियुगात वावरणारे पण द्वापर युगातल्या अर्जुनासारखे सतत गोंधळलेले.  त्यामुळे मालगुडी टिफिन नामक दाक्षिणात्य रेस्टॉरंट मध्ये डोसा उत्तपा खाऊनच आम्हाला युद्धात घायाळ झाल्यासारखी ग्लानी आली. दुपारच्या झोपेतून शुद्ध आली पण मेंदूची बधिरता काही गेली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे संध्याकाळ सिंहगड करावा म्हटलं.  

या आधुनिक महाभारताचा आणि त्यामुळे मनात चालू असलेल्या द्वंदापासून थोडी शांतता मिळवण्यासाठी एकच उपाय सिंहगड वारी ...जगात भारी. मग काय, आज नेहमीप्रमाणे रविवारची सकाळची माणसांची गर्दी टाळून संध्याकाळी सिंहगड गाठला आणि ८० वि फेरी सुरु केली. सर्वत्र नानाविध रंगांची फुले फुलली होती. ऑक्टोबर हीट मुळे  हवा तशी दमटच होती.  संधिप्रकाशात पुणे दरवाजा गाठला. सूर्यास्त आणि राजगडाचे दर्शन घेण्यासाठी थोडा आटापिटा केला पण उशीर झाला होता. अजून वेळ न दवडता लागलीच गड उतार झालो. चढताना भेटलेले लोक अजून उतरतच होते हळूहळू. त्यांना ओव्हरटेक करून पायथा गाठला, घडयाळ पाहिलं आणि अजून एक फेरी होईल म्हणून पुन्हा गड  चढायला सुरुवात केली. हेडटॉर्च लावला होता त्यामुळे उतरणारे लोक मला भूत बघितल्यासारखे बघत होते. एकानी धारिष्ट्य करून मला विचारले सुद्धा, आता परत वरती चालले ? राहणार का परत येणार ? हसलो आणि निघालो. कदाचित त्याला मी भूत वाटलो असेल पण माणुसकी म्हणून त्याला माझी काळजी वाटली, त्याने माझी  चौकशी केली त्यामुळे मी त्याचा आभारी राहीन. दुसऱ्या फेरीला वेळ कमी लागला कारण वॉर्म अप झाला होता. जेमतेम ५० मिन मध्ये वरती पोहोचलो खरा पण या वेळेस गडावर कोणीच नव्हते आणि माझे स्वागत मोट्ठ्याने भुंकून एका श्वानाने केले. त्यानी पण या वेळी गडावर कोणाचीच अपेक्षा केली नसेल आणि त्याला पण  माझ्यात भूत दिसले असेल तर आश्चर्य करण्यासारखे  काहीच नाही. रात्रीच्या अंधारात कोण गड चढते. सुरुवातीला त्याच्या भूकंण्या ने मी दचकलो आणि माझ्या हातातील हायकिंग पोल आणि हेडटॉर्च मुळे तो चपापला, गुरगुरायला लागला. मी पुणे दरवाज्याकडे जायला लागलो तसा  तो मागे मागे आला. वास हुंगून खात्री झाल्यावर तो थोडा शांत झाला. माझ्या बॅगेतून त्याला काही खायला देता येईल का ते शोधात होतो पण काहीच नव्हते.  शेवटी पाणी प्यायलो आणि त्याला पण थोडे पाणी दिले. त्या शांत वातावरणात दोघेही आता शांत झालो होतो. एकमेकांबद्दलची भीती गेली होती. शेजारी शेजारी १० मिनिट बसलो आणि जेंव्हा  गड  उतार होण्यासाठी उठलो तेंव्हा कुत्रं सुद्धा माझ्यापुढे तयार. हेडटॉर्च लावायच्या आधीच  मार्ग दाखवायला  हा गडी सज्ज. मला सिद्धगड आठवला आणि खाली उतरता उतरता ती तमाम कुत्री डोळ्यासमोर तरळून गेली ज्यांनी मला सिद्धगड, साल्हेर, तोरणा, घोडपाण्याची नाळ,  देवतिब्बा, सारपास ह्या ट्रेक मध्ये सोबत केली होती. अगदी पायथ्याला मी गाडी सुरु करेपर्यंत त्याने  मला सोबत केली.  त्याचा सहवास खरंच स्ट्रेस बर्स्टर होता.   


    


        या श्वानांच्या निस्वार्थ सेवाभावी वृत्तीवर ते अनादी काळापासून ठाम आहेत म्हणूनच धर्मराजाबरोबर त्यांना स्वर्गीय यात्रा करण्याचे  पुण्य लाभले असेल. वारीत वारकऱ्यांबरोबर दोन पावले चालले तरी माऊली दर्शन होते इथे तर स्वर्गीय दूत आपल्यासोबत असतात पण आपल्याला आजकाल नरकाच्या भीकेचे डोहाळे लागलेले असतात. तरी नशीबच म्हणावे लागेल दिल्ली कोर्टाने भटक्या कुत्रांच्या बाबतीत काढलेला फतवा दुरुस्त केला.    

   

     असो, भूतदया आणि माणुसकीच्या या महाभारतात धर्माचा विजय होवो पण धर्म कोणाचा हा प्रश्न अनुत्तरित राहिला तरच शांतात प्रस्थापित होईल अशी आशा बाळगतो. युद्ध विराम देतो कारण पाल्हाळ लावलेल्या ब्लॉगला मर्यादा विराजते.  

 

-वैभव 

फक्त नावात 

      




Monday, October 28, 2024

सिद्धगडाची ट्रेकसिद्धी !

          बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहायचा घाट घातला आहे, त्याला कारण पण तसेच आहे. अर्थात कार्य सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ आहेत किंवा अथक परिश्रमानंतर कार्य सिद्धीस गेले.  अशा वाक्प्रचारांचा जेंव्हा खराखुरा अनुभव आला तो हा ट्रेक, कायम आठवणीत राहील असा. 

          या वर्षी उन्हाळ्यानंतर ट्रेकिंग मध्ये जो खंड पडला तो पुढे आजारपण, दवाखाना आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे सतत मनाला रुख रुख लावून जात होता.  गेल्यावर्षी खूप वेळा प्लॅन करून सुद्धा सतत मागे पडत असलेला गोरखगड एकदाचा कसातरी  केला होता. त्याचवेळेस या भागातले इतर गडकोट सुद्धा केले पाहिजे असा विचार डोक्यात आला. तसे नाही म्हणायला या भागातला पदरगड, भीमाशंकर, आंबेनळी घाटवाट, गणेश घाट वगैरे ट्रेक केले होते, पण मुंबई जवळ असल्यामुळे इथल्या दमट वातावरणामध्ये ट्रेक करताना दमछाक होते आणि एक मस्त अशी  फिटनेस टेस्ट होते. अशाच ट्रेक च्या आम्ही शोधात होतो पण योग येत नव्हता. मागच्या महिन्यात वसंतगड आणि दातेगड करून सुरुवात तर केली होती. अधून मधून जमेल तसा सिंहगड करुन पुन्हा एकदा फिटनेस रुळावर आणण्याचा माझा अट्टाहास चालू होता. अखेर  पायवाट च्या WhatsApp ग्रुप वर शेवटी कोथळीगडचा प्लॅन शिजला आणि त्याची अंमल बजावणी सुद्धा झाली.  तो ट्रेक संपताच सिद्धगडच्या ट्रेक ची मुहूर्तमेढ रोवली. ग्रुप वर विचारणा करताच उदंड प्रतिसाद मिळेल हि अपेक्षा फोल ठरली आणि पुन्हा एकदा गोरखगड प्रमाणे आम्ही नेहमीचेच ३ भिडू, अर्थात राहुल, मी आणि सुशील तीन तीगाडा काम तगडा करण्यास सज्ज झालो. (या वेळेस काम बिघाडा झालं पण हरकत नाही). 

नेहमीप्रमाणे या आठवड्यात सुद्धा ऑफिस च्या कामाला ऊत आला आणि कसातरी शुक्रवार वर्क फ्रॉम होम करत करत रात्री १२-१ वाजता ऑफिस चा पसारा आटोपला. त्यामुळे मॅप वर लोकेशन बघणे, ऑल ट्रेल सारख्या अँप वर ट्रेल चेक करणे, संबंधित ब्लॉग वाचणे, विडिओ पाहणे अशी कच्ची तयारी काहीच करता आली नाही. तसे राहुल सुशील असताना मी फार लोड घेत नाही. आदल्या दिवशी पुन्हा एकदा विचारले प्लॅन ऑन  आहे का ? तेंव्हा तिघांनी  चांदवड नाशिकचे ट्रेक  केले  तर एकदिवसाच्या ट्रेक ला ऐनवेळी कोणी टांग देणार नाही याची खात्री होती. पण तरीही का कोण जाणे या वेळेस मनात उगाच शंकेची पाल चुकचुकत होती. शेवटी सकाळी उठायचे आहे हे मनाला बजावून मी एक पॉवर नॅप घेतली. सकाळी उठलो जास्त काही खाऊ पिऊ घेतला नाही बरोबर कारण दरवेळेस बाहेर खातो आणि उगाच पाठीवर ओझे होते. सुशील नि पराठे घेतले होते पण सॉस विसरला, बोलण्याचा नादात सुतारवाडी च्या इथून पुलावरून गेल्यामुळे राहुल च्या घराकडे थोडे फिरून जावे लागले. राहुल ला गाडीत घेऊन अखेरीस गाडी एक्सप्रेस वे वर लागली. पहिला टोल गेल्यावर डिझेल भरून घेतले.  तो पर्यंत आता तांबडे फुटायला लागले होते. पेट्रोल पम्पाजवळ असलेल्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळाला. त्यांचे प्रभात संगीत कितीही वेळ ऐकायला मजा आली असती पण प्रवास मोठा होता त्यामुळे आम्ही तिथून निघालो. चहा मिळाला असता तर अजून मजा आली असती पण नेहमीचे रेस्टॉरंट बंद च दिसत होते. 

ऑफिस आणि ऑफिस मधली आव्हाने या वरील अनुभवांची देवाणघेवाण करत, गप्पा मारत आम्ही लोणावळ्याच्या  घाटात पोहोचलो आणि वाहनांची रांग लागलेली दिसली. आत्तापर्यंत सर्व काही वेळेत चालू होते. ठरवलेल्या वेळेत आम्ही ९ वाजेपर्यंत बोरवाडी या सिद्धगडाच्या पायथ्या जवळच्या गावात पोहोचू  ह्या गृहीतकाला  इथे मोठा धक्का बसला आणि सुशील च्या डोक्यात पुन्हा नव्याने गणित मांडायची तयारी सुरु झाली. तो खाली उतरला आणि जवळ जवळ'एक किलोमीटर पुढे चालत जाऊन घटना स्थळी पोहोचला. मुंबई वरून येणाऱ्या कोणी तरी मद्यधुंद ललनेने  अर्धवट झोपेत स्वतःची ठार गाडी कोणालाहि ठार ना करता फक्त रस्त्याच्या दुभाजकावरून आमच्या मार्गिके मध्ये आणली आणि एका बापुड्या ट्रक वाल्याने तिला तिच्या गाडी मधल्या एअर बॅग्स उघडून देत उशीची सोय करून दिली. सुदैवाने मॅडम कायमच्या झोपल्या नव्हत्या आणि हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या होत्या पण निष्कारण त्यांनी आमच्या साहसी ट्रेक ची झणझणीत सुरुवात करून दिली. असे सरप्राइसेस नवीन नव्हते कारण सुशील म्हणतो तसा बॅक अप चा पण बॅक अप ठेवावा. त्यात आज टीम मोठी नव्हती त्यामुळे पुढे कुठे तरी कव्हर करू हा आत्मविश्वास होता. 

ठरल्याप्रमाणे ठाकरे हॉटेल ला नाश्ता आणि प्रथेप्रमाणे कडाव चा मानाचा वडापाव खाऊन आम्ही जांभूर्डे गावाच्या कमानीतून आत शिरलो.  त्यात स्वप्नील खोत नि खात्रीशीर सांगितले होते जांभूर्डे ते बोरवाडी रस्त्याने गाडी जाते त्यामुळे ऑफ रोडींग करत करत आम्ही वनखात्याच्या चेकपोस्ट पाशी पोहोचलो. तेथील विश्वास लिंगे नामक अधिकाऱ्याने आमची चौकशी केली. आमच्यापैकी कोणी आधी हा ट्रेक केला आहे का अशी विचारणा करताच आम्ही एकमताने सुशील चे नाव सांगितले.  राहुल आमचा लोकल माणूस, मुरबाड किंवा कोकणात जा किंवा घाटावर कुठे पण ट्रेकला जा राहुल चे नातेवाईक सर्वदूर पसरलेले आहेत त्याने म्हसा, मुरबाड भागातील ओळख सांगितल्यामुळे जास्त चिकीत्त्सा त्याने केली नाही. तिकीट पण दिले नाही आणि पैसे हि कमी घेतले. जवळजवळ ४ किमी डोंगरावर वळणा वळणाची कच्ची वाट आणि भीमाशंकरचे निबीड अभयारण्य. माझ्या बोलेरो गाडीला खराखुरा न्याय देणारा रस्ता आणि आणि मनाला शांती देणारे जंगल. वाटले इथेच सफारीचा धंदा सुरु करावा. बोरवाडी ते जांभूर्डे.  जरा तेथील शांततेत रमतो तोच राहुल आणि सुशील याना सिद्धगड दिसू लागला मला मात्र त्याचे दर्शन घडेना. नकाशा वाचनात आणि भौगोलिक स्थानाचा अचूक वेध घेण्यात दोघांना सिद्धी प्राप्त झाली आहे. मला बापुड्याला त्या डोंगर माथ्यावर ढग आणि धुक्याशिवाय काहीच दिसत नव्हते. बोरवाडीत पोहोचलो गाडी लावली आणि गावात चौकशी केली तेंव्हा कळले सिद्धगड माची वर घरे आहेत तिथे जेवणाची व्यवस्था होऊ शकते, आधीच ट्रेक सुरु करायला १० वाजले होते त्यामुळे येताना उशीर होणार हे निश्चित समजले होते. सुशील कडे पराठे होते बॅक अप  साठी त्यामुळे आता अजून उशीर नको. एक सद्गृहस्थ आमच्या सगळ्या तयारी कडे कुतूहलाने बघत होते. भगवान श्रीकृष्णाचा मित्र पेंद्या, ज्याच्या अंगात व्यंग होते अगदी तसेच व्यंग. हात पाय वाकडे तिकडे त्यामुळे चालताना फेंगडे पडणारी पावले आणि चेहेऱ्यावर स्मितहास्य. कदाचित भगवंताने त्यांना  आमच्या  भविष्यातील  फजितीची कल्पना दिली होती कि काय देव  जाणे पण त्यांच्या हास्यात काहीतरी गूढता जाणवली. थोडेसे धुके सारले आणि गडाचा आकार आता दिसायला लागला. जेवढा दिसत होता तो फक्त सिद्धगड माची पर्यंतचा भाग. याहून वरती बालेकिल्ला तेवढाच आहे एवढा अभ्यास आम्ही करून आलो होतो. सगळ्यात जास्त elevation असलेला दुर्ग म्हणजे सिद्धगड. पण आता आव्हान स्वीकारलंय तर या गोष्टीचा कशाला विचार करायचा. 

      गाडी लावली तिथल्या घराजवळ  जास्वंदीचे आणि तगरीचे झाड मोहोरले होते. जणूकाही एकाच झाडाला दोन्ही फुले आल्यासारखी वाटत होते.  लालभुंद  जास्वदींच्या  फुलांची  पांढरीशुभ्र तगरी च्या फुलांबरोबर झालेली  विजोड  युती काहीतरी संकेत सूचित करत होती. लाल रंग धोक्याचा तर पांढरा रंग शांततेचा. कदाचित हि वादळापूर्वीची शांतता धोक्याची सूचना देत होती.  त्याला न्याहाळण्याचा नादात आम्ही तिघे पण आमचे हायकिंग पोल /काठ्या गाडीतच विसरलो. strava, relive सारख्या अँप वर route ट्रॅकिंग ला लावून आम्ही ट्रेक ला सुरुवात केली होती. सुरुवातीलाच एका झाडावरून वानरांनी चित्र विचित्र आवाज करून आम्ही चुकीच्या रस्त्याने जातोय ह्याची सूचना केली. हाईकिंग पोल किंवा काठी घ्यायला पाहिजे होती आणि आपण चूक केली याची लगेच प्रचिती आली. मागच्या एका SRT ट्रेक ला तोरण्यावर जेंव्हा वानरांनी मला गराडा घातला होता तेंव्हा हातातील हायकिंग पोल ने त्यांना हाकत हाकत मी रडतोंडी बुरुज गाठला होता. मॅप मध्ये चेक केले आणि पुन्हा थोडे मागे येऊन एका भातशेतातून बांधाच्या कडेकडेने आम्ही योग्य मार्गाला लागलो. 

भात कापणीला आलेला, पण पाऊस गेला आठवडाभर  रोज पडतोय  म्हणून  तो तसाच ठेवलेला. छाती पर्यंत वाढलेला गवतातून आम्ही मुख्य वाटेला  लागलो. लगेच "सिद्धगड किल्ल्याकडे" असा बोर्ड लावलेला दिसला. आता वाट मळलेली असणार त्यामुळे ज्याने त्याने आपला आपला वेग पकडला आणि ११ नंबर ची बस सुरु केली. नेहमी प्रमाणे राहुल पुढे, मध्ये सुशील आणि सगळ्यात शेवटी मी. माझा वेग हि कमी आणि त्यात मध्ये मध्ये मी फोटो काढत बसणार. कानपेट, सोनकी, तेरडा, भारंगी, कारवी अशा नानाविध फुलांनी सिद्धगडाची वाट आणि आजू बाजूचे जंगल बहरून आले होते. डोंगर माथ्यावरचे धबधबे प्रवाही झाल्यामुळे कातळामधून पाणी झिरपत होते आणि त्यामुळे दगडावर पाय ठेवावा तर शेवाळे आपल्याला अस्मान दाखवणार यामुळे तोल सावरत सावरत आम्ही हळू हळू वरती सरकत होतो. म्हणावे तसे ऊनहि  आज लागत नव्हते पण कोकणातला दमटपणा जाणवत होता.  

          मला गेले काही दिवस खोकला झाला होता त्यामुळे छातीतील कफ माझ्या श्वासोच्छवासामध्ये अडथळा निर्माण करून माझ्या चालीत गतिरोधक आणत होता. त्यात आज हायकिंग पोल पण विसरला होता, त्यामुळे जास्तीचे प्रयत्न करावे लागत होते.   काल  रात्री नीट झोप झाली नसल्याने थोडे वर जाताच माझा वेग मंदावला. पोटातला नाश्ता आणि जठरातले आम्ल पित्त यांचे द्वंद्व सुरु झाले. थोड्यावेळ मी या युद्धाला पोटात कोंडण्याची पराकाष्ठा केली पण शेवटी त्यांनी उलटीचा रूपात सह्याद्रीच्या कुरुक्षेत्रावर धाव घेतली. आता मात्र मी थोडा ब्रेक घायचं ठरवलं. मागे वळून पहिले तर जांभूर्डे डॅम चे  विलोभनीय दृश्य दिसत होते. वरून धबधब्याचे पाणी खाली येत होते. थोडे थोंडावर गार  पाणी मारले, चूळ  भरली. सगळे कपडे घामाने भिजून गेले होते आणि वेलकम तो गोवा सिंघम च्या तोऱ्यात सिद्धगड आम्हाला वेलकम करत होता. सुशील माझ्यासाठी थांबला होता, त्यांनी मला चघळायला एक गोळी दिली, जरा बरे वाटले पण नंतर पुढे गेल्यावर लक्षात आले कि मी वरती येताना ज्या एकी दोन ठिकाणी थांबलो तिथे कुठे तरी चष्मा विसरून आलोय. आता पुन्हा माघारी जाणे शक्य नव्हते. रॉकपॅच आला होता, जमेल का? म्हणून मला सुशील नि विचारले तेंव्हा कुठे लांबचे बघायचंय, तेवढे दिसतंय म्हणत मी वर चढलो. आता पोट रिकामे झाल्यामुळे मला थोडे हलके वाटत होते आणि राहुल सुशील पण माझ्या टप्प्यात आल्यामुळे हायसे पण वाटत होते. आज मी वेळ लावतोय हे पाहून कधी नव्हे ते सुशील देखील दिसेल त्या फुलांचे फोटो काढत होता. नेहमीप्रमाणे गावातून कोणी श्वान  तुमच्या बरोबर ट्रेक ला आला नाही  तर ट्रेक पूर्ण कसा होणार. या ट्रेक लासुद्धा एक श्वान युगुल आमच्याबरोबर बोरवाडी पासून येत होते. माझ्या ढासळलेल्या तब्येतीने जरा उभारी घेतल्यावर माझे लक्ष त्यांच्याकडे गेले. घाटवाटांवरती कातळात कोरलेल्या  प्रशस्त पायऱ्या किंवा इवल्याश्या पावट्या जरी नजरेस पडल्या तरी एक वेगळाच आनंद होतो. आपण कुठल्या ढोरवाटेने जाऊन भरकटत नाहीये तर योग्य वाटेवर आहोत याची एक  शाश्वती मिळते. एका मोठ्या कातळकड्यावरून धबधब्याचे पाणी झिरपत होते तर बाजूलाच अशा पायऱ्या पाहताच मला हुरूप आला. आता फार फार तर २०/३० मीटर ची उंची आणि छातीवर येणार चढ संपेल आणि आपण सिद्धगड माचीवर पोहोचलोच आता. पण घोर तपश्चर्या केल्याशिवाय कोणालाही कुठलीच सिद्धी प्राप्त होत नाही त्यामुळे सिद्धगड आमची परीक्षा घेत होता.  क्षणार्धात  माझा भ्रमनिरास झाला  वरती गेल्यावर कळाले की वाट वळून अजून वर चढत होती. सुख एवढेच कि  कारवीच्या फुलांचा इथे सडा पडलेला होता आणि फार चढाई नव्हती पण ट्रॅव्हर्स मोठा आणि निसरडा  होता.  

 

        थोडे वर गेल्यावर सिद्धगड बालेकिल्ला दिसायला लागला. वरच्या पठारावर दोन बैलांची झुंज चालू होती आणि २-४ गावातली पोरे त्याचा आस्वाद घेत होती. आम्हीही क्षणभर त्यांच्यात सामील झालो. दुपारचे १२ वाजत आले होते आणि तो दुर्गपुरुष अजूनही धुक्याची चादर पांघरून चिरनिद्रेत पहुडलेला वाटला.  आमच्या येण्याचे त्याला काही एक सोयरसुतक नव्हते. तसेच सिद्धगड माची वरच्या गावातल्या लोकांना सुद्धा. गावात इन मीन ४/५ घरे, १३-१५ माणसे, ७/८ कुत्री आणि १५-२०  कोंबड्या एवढीच काय ती गावाची सजीवसंख्या. त्या किर्रर्र जंगलामध्ये परत एखाद्या हिंस्त्र पशूने हल्ला केला तर अजून एक दोन कमी व्हायची भीती. त्यामुळे आधी वर्दी न देता आगंतुकासारखे अवतारल्यामुळे आमच्या स्वागतास तिथे फारसे कोणी उत्सुक दिसले नाही शेवटी आम्हीच एका घरात जाऊन जेवणाची काही सोय होतीये का याची चौकशी केली. घरातील कोकाटे काका खाली मुरबाड ला जाणार होते पण आम्ही फसवणार नाही, नक्की २ वाजे पर्यंत जेवायला येतो वरती जाऊन असे आश्वासन आमच्या कडून घेतल्यावर काकांनी आपल्या कारभारणीला स्वयंपाक करायची अनुमती दिली.

    सकाळी उलटी झाल्यामुळे माझ्या पोटात आता कावळे ओरडू लागले होते म्हणून मी एक सफरचंद बॅगेतून काढून खात खात च गावात प्रवेश केला होता. सहसा गावातील लहान मुले आमच्या सारखे शहरी भटके बघताच गोळी, चॉकलेट, बिस्कीट मागतात पण इथे कोंबडीने माझ्या हातातील सफरचंदावर उडी घेतली. तिने चोच  मारलेला शेवटचा तुकडा तिलाच बहाल केला.  जेवणाची सोय लागली होती त्यामुळे आम्ही फार वेळ ना दवडता सिद्धगडाच्या बालेकिल्ल्याकडे कूच केले.

 सुरुवातीला वाट मळलेली वाटली पण सर्वत्र कारवीचे रान माजले होते थोडे वर जातो तेच आम्ही वाट भरकटलो ऑल ट्रेल वरचा मार्ग सोडून आम्ही रानात घुसलो होतो . सुदैवाने लगेच लक्षात आले आणि पुन्हा शोध सुरु झाला मुख्य वाटेला कुठून लागता येईल त्याचा. पाण्याच्या वाटेने, दगड धोंड्यातून पुन्हा खाली उतरलो. शेवाळ्यावरून घसरायची भीती असल्यामुळे उठत बसत आम्ही जपून खाली उतरत होतो. श्वान युगुल आमच्या पायांमध्ये घुटमळत होते त्यांच्या मुळे त्या चिंचोळ्या रस्त्यात दगडांवरून उठाबशा करणे फार जिकिरीचे होत होते. पण त्या मुक्या प्राण्यांवर डाफरून पण काही उपयोग नव्हता. आम्हाला सोबत करायची हा निर्धार त्यांनी खाली  बोरवाडी पासून च केला होता त्यामुळे त्या घनदाट जंगलात त्यांचाच आम्हाला मानसिक'आधार होता.  ह्या सगळ्यात खूप वेळा गेला होता. सकाळपेक्षा आता मला थोडे बरे वाटत होते त्यामुळे मी राहुल आणि सुशील च्या वेगासोबत मिळते जुळते घेऊन चालत होतो.  आता ऊन जाणवू लागले होते, बऱ्यापैकी उंचीवर आम्ही आलो होतो. शेजारी असलेल्या अजस्त्र  दमदम्या डोंगराच्या उंचीला आम्ही आलो होतो. मागे वळून समोर पहिले  तर आता गोरखगड आणि त्याच्या मागे असणारा मच्छिन्द्रगड सुद्धा आता खुजे वाटू लागले होते. एक दोन रॉक पॅचेस चढल्यावर सिद्धगडाच्या गुहेत आम्ही पोहोचलो. राहुल आधीच पोहोचून तिथे आमची वाट बघत होता कारण इथून फोटो तर काढलाच पाहिजे. जेमतेम १०* १५ ची गुहा, बंदिस्त खोली सारखी आणि स्वच्छ, मुक्काम करण्यास योग्य पण इथे येई पर्यंत तुम्ही तग धरला पाहिजे. समोरचा कॅनव्हास डोळ्यात आणि कॅमेऱ्यामध्ये साठवत आम्ही पुढे चालते झालो. थोडे अजून वरती  गेल्यावर अजून एक गुहा लागली. हि गुहा तशी बंदिस्त नव्हती पण गुहेच्या भिंतीवर रेखाटलेले विठ्ठलाचे सुंदर चित्र लांबूनच नजरेस पडले. त्यात वरून येणार धबधब्याच्या पाण्याचा ओहोळ त्या नैसर्गिक देव्हाऱ्याचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. कडेला दिसणाऱ्या पायऱ्या जणू वैकुंठाची वाट भासू लागल्या होत्या कारण जितके वर जावे तितके गडमाथा वरून आम्हाला वाकुल्या दाखवत होता.  

सिद्धगड गुहा 
वैकुंठाच्या पायऱ्या आणि विठुराया 

         
           चंद्रभागेतिरी वाळवंटात विठुरायाच्या मंदिराचा कळस दिसला तरी भक्ताची तृषा शांत होते आणि त्याला  भगवंताचे दर्शन झाल्याचं समाधान मिळते काहीशी तशीच अवस्था आता आमची झाली होती. कळस दिसला नाही तरी पांडुरंगाचे दर्शन झाले होते आता उगाचच  शारीरिक मर्यादांची परीक्षा घेण्यात काय अर्थ आहे. पण हत्ती गेला आणि शेपूट राहिले असतांना अर्ध्या रस्त्यातून हार मानून माघारी फिरणे त्या देवालाही मान्य झाले नसते. पण उरलेले शेपूट हे मारुतीचे होते आणि त्यासाठी मोठी बलोपासना करावी लागणार होती. बरोबर ती मुकी श्वाने सुद्धा आमच्या बरोबर उपाशी पोटी मेहनत घेत होती. आम्ही कासवाच्या गतीने आता हळूहळू पुढे सरकत होतो. अचानक डावीकडच्या जंगलातून वानरांचे आवाज येऊ लागले कदाचित एवढ्या वरती त्यांनी कोणी येईल अशी अपेक्षा केली नव्हती. 

            वरूनच  राहुलचा आवाज आला. काहीतरी गडबड आहे रे. हि कुत्री पुढे जात नाहीये. घाबरलेली दिसतीये. काय करायचे ? जायचे का पुढे ? का जाऊ या मागे ? तसे पण कंटाळा आलाय, संपतच नाहीये. त्या मादी कुत्रीची भेदरलेली नजर कोणत्यातरी संकटाचा सुगावा तर देत नाही ना ?  जरा अजून भोवतालचा  कानोसा घेतला तर मधमाश्यांचा आवाज आल्यासारखे वाटले पण वरती म्हणावे इतकी कारवी नव्हती नुसते गवत होते त्यामुळे समजेना नक्की काय गडबड आहे. दोन मिनिट आम्ही तिघे आणि २ कुत्री सगळेच थांबलो. शेवटी सुशीलने लीड घेतले आणि थोडे पुढे जाऊन बघायचे ठरवले. मग लक्षात आले कातळावर शेवाळे होते आणि पाणी वाहत असल्यामुळे कुत्री घाबरत होती. घसरले कि खाली दरीत त्यामुळे चार पायांचा पसारा आवरणे त्यांना कठीण होते पण आम्हाला जमले आणि मग इमानदारीत कुत्र्यांना पण जमले. दोन तीन वळणे घेत त्या कातळावरची वाट सुशील ला सापडली. त्याची री ओढत आम्ही सुद्धा जवळपास वरती पोहोचलोच होतो. 

  आज राहुल चे shoes selection चुकले होते. रनिंगचे shoes ज्याला अजिबात ग्रीप नव्हती ते घालून तो आला होता त्यात आज खूपच निसरडे पॅचेस होते. अखेरीस राहुल आणि सुशील दोन कुत्र्यांना घेऊन माथ्यावर पोहोचले. मी मात्र सुरुवाती पासूनच विकेट वाचवत हळूहळू खेळत होतो. आता मात्र माझ्या पायाला cramp यायला लागले होते त्यामुळे मी थांबून थोडेशी  electrolyte   पावडर खाल्ली. पाणी प्यायलो आणि एकादमात  माथ्यावर धापा टाकत पोहोचलो. जात जाता एक पाण्याचे टाके दिसले पण ते स्वच्छ नव्हते. वरती पोहोचल्यावर महादेवाचे आणि नंदीचे दर्शन घेऊन मी लोटांगण घातले. वरून काय दिसते हे बघण्याचे सुद्धा मला सामर्थ्य उरले नव्हते २ मिनिट तसाच पडून राहिलो पण गडमाथ्यावर सुद्धा वारा नव्हता. सर्वदूर धुके आणि उन्हाचा खेळ चालू होता. भीमाशंकर, पदरगड ची बाजू अधून मधून दृष्टीस पडत होती पण म्हणावी तशी visibility नव्हती. त्यामुळे फार वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. घड्याळातली वेळ बघून माघारी फिरणेच इष्ट होते. दुसऱ्या टोकापर्यंत गेलो असतो तर गडावरील टाकी शोधता आली असती पण वरती भयंकर रान माजले होते आणि त्यात अजून वेळ गेला असता जे कि परवडणारे नव्हते. २ वाजले होते, एव्हाना आम्ही खाली माचीवर पोहोचून जेवायला बसणे अपेक्षित होते पण असो. फार वेळ न दवडता आम्ही परतीचा मार्ग धरला. 

जवळपास ३:३० वाजायच्या सुमारास आम्ही माचीवर  आलो हातपाय तोंड धुवून जेवायला बसलो. घरच्या अन्नपूर्णे ने आमच्या साठी चविष्ट वांगेबटाटा भाजी, डाळ भात असा बेत केला होता त्या वर मनसोक्त तुटून पडलो. जेवताना मावशींकडे चौकशी केली. त्यांची मुले मुरबाड ला शिक्षणासाठी होती आणि हे दाम्पत्य येऊन जाऊन असायचे. पावसाळ्यात गडावर कोणीच राहत नाही पण सध्या भात लावलेला आहे पण पावसामुळे त्याची कापणी लांबणीवर पडली होती.  जाखमाता मंदिरांची वाट मळलेली आहे पण लांबची आहे त्यामुळे तुम्हाला उशीर होईल आणि वळसा पडेल अशी पूर्वसूचना त्यांनी आम्हाला दिली पण वाट मळलेली असेल तर उशीर होई ना का काय फरक पडतो. अंधाराच्या आत रानातून डांबरी रस्त्यावर लागलो कि काम झाले मग पुण्यात पोहोचायला किती का वाजेना. अशा प्रकारे पुन्हा सगळे गणित मांडून आणि आमच्या गृहितकावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या शूज च्या नाड्या आवळल्या. बोरवाडीतून आमच्या बरोबर आलेल्या श्वान युगुलांपैकी मादीने त्या भागातील सर्व नर कुत्र्यांना नादी लावले आहे त्यामुळे पुन्हा याल तेंव्हा तिला वरती आणू  नका असा सल्ला आम्हाला गावातून मिळाला 

महादरवाजा 
उलट प्रदक्षिणा 
 

                 इतक्यात गावातील २ जण गावात दाखल झाले. बोरवाडीतून आले का ? असे विचारून खात्री करून त्यातील एकाने माझा चष्मा मला दिल्यावर आम्हाला सगळ्यांनाच नवल वाटले जाताना गाडी चालवावी'लागणार नाही या कल्पनेने राहुल सुखावला तर अपेक्षा नसताना चष्मा परत मिळाल्यामुळे मला पण उर्वरित  ट्रेक साठी हुरूप आला.  ४ वाजले होते आणि आता वेळेचे नियोजन अत्यंत महत्वाचे ठरणार होते कारण पाऊस, अंधार, जंगल वाट या सगळ्याचा विचार करता आमच्या हातात २ तास होते. पण आमच्या अभ्यासानुसार आता फक्त जाखमाता मंदिरापर्यंत थोडा चढ, मग ट्रॅव्हर्स आणि मग सगळं उतार. ढगांची गर्दी जमू लागली होती. झपाझप पावले टाकत आम्ही जाखमाता मंदिराची वाट धरली वाटेत अजून एक फाटा फुटला होता व तिथे 'दगडी गोळे' अशी पाटी लावली होती. कदाचित तोफेचे गोळे असावेत पण आता ते बघण्यात वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे तिकडे न जाता पायाखालची वाट धरून आम्ही एका प्रशस्त मंदिराच्या प्रांगणात पोहोचलो. हे जाखमाता मंदिर नसून नारमाता मंदिर होते. चहुबाजूने घनदाट जंगल आणि मध्यभागी असलेल्या त्या मंदिराच्या परिसरात अनेक वीरगळी इतिहासाची साक्ष देत उभ्या होत्या. नुकताच दसरा होईन गेला होता, मंदिराच्या परिसरातील इतर देव देवता आणि एक भली मोठी तोफ झेंडूच्या फुलांनी पुजलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली. झेंडू च्या माळा सुकून गेल्या होत्या पण तिथल्या शूर मावळ्यांनी गाजवलेले शौर्य अजूनही ताजेतवाने होते. नार मातेला नमस्कार करून आम्ही डाव्या बाजूने खाली जाणारी वाट पकडली. वाट अगदी मळलेली अगदी गावातल्या लोकांनी सांगितली तशी. आम्ही निश्चिन्त झालो. वाटेत महादरवाजा  लागला आणि आता खात्री पटली पण माझ्या मनात वेगळीच शंका घोळत होती. आपण बोरवाडी मार्गे चढून जखमातेच्या मार्गाने पुन्हा बोरवाडी ला उतरणार होतो तर परीक्रमा करायच्या हिशोबाने आपण सिद्धगडाच्या मागच्या बाजूस जाणे अपेक्षित आहे पण आपण डाव्या बाजूने भीमाशंकर कडे जात आहोत. मध्ये अजून एक उचले गाव ची वाट लागली, आपण ती घेतली नाही म्हणजे आपण बरोबर आहोत असे मला राहुल सुशील कडून समजावण्यात आले. थोड्यावेळ त्याच वाटेने पुढे गेल्यावर लक्षात आले वाट बरोबर आहे पण हे ती वाट नव्हे जी आपल्याला हवी आहे. एव्हाना खिंड लागायला हवी होती. मग पुन्हा ट्यूब पेटली आणि आम्ही मागे फिरलो.          

                 जवळ जवळ एक दिड किमी अंतर मागे येऊन आम्ही पुन्हा नार माते च्या मंदिराजवळ आलो आणि वरती जाणारी वाट शोध लागलो कारण त्या मार्गे खिंड लागणार होती. लगेचच योग्य वाट सापडली आणि आम्ही काही अवधीतच खिंडीत पोहोचलो. खिंडीतून पदरगड पर्यंतचा नजारा दिसत होता. पण अजूनही जाखमाता मंदिर दिसले नव्हते त्यामुळे रस्ता बरोबर आहे याची खात्री कोणी दयावी.  आधी एकदा तोंड पोळले होते त्यामुळे ताक सुद्धा फुंकून प्यावे ह्या उक्तीनुसार इकडे तिकडे बघत बघत आम्ही खिंड उतरायला घेतली आणि काय सुदैव. जाखमाता मंदिर सुद्धा सापडले. हे अगदीच छोटे मंदिर होते पण वाटेवरची ठळक खूण  होते. या सगळ्या गदारोळात वेळ थांबणारा नव्हता. वाजले होते ५ आणि हळूहळू अवकाशातून थेंब पडायला सुरुवात झाली होती. पाठीमागे गाडामागुन ढगांचा गडगडाट होत होता. सतत वेगवेगळी गृहीतके मांडून निसर्गाला आव्हान देणाऱ्या माणसांविरुद्ध जणू रणवाद्ये वाजायला सुरुवात झाली होती.  तसा पाऊस सुरु झाला नव्हता पण वातावरण निर्मिती पूर्ण झाली होती. पुन्हा एकदा जाखमाता मंदिराच्या इथून डावीकडील वाट पकडून बरच पुढे गेल्यावर लक्षात आले वाट खाली उतरणारी पाहिजे. नशिबाने मोबाइलला नेटवर्क होते, सुशील, राहुल ने पुन्हा एकदा ट्रेल चेक केली, काही व्हिडीओ पाहायचा प्रयत्न केला आणि पुन्हा थोडे मागे जावे लागणार हे लक्षात आले. पण इथे खूप मोठा हेलपाटा पडला नाही. सुशील ला रानात घुसलेली एक वाट सापडली. मी आणि राहुल साशंक होतो पण त्या वाटेने चालू लागल्यावर आमची खात्री पटली कि आम्ही बरोबर वाट पकडली आहे. आता वेळ दवडणे नाही सुसाट वेगाने दगड गोट्यातून जितक्या लवकर ह्या रानातल्या वाटे तुन जंगल संपवून डांबरी रस्त्यावर लागता  येईल ते बघायचे. मावशींनी सांगितलेली हीच ती ठळक आणि मळलेली वाट. आमच्या वाटेच्या समांतर पाण्याची वाट होती तिथून पाणी खळखळा वाहत होते आणि आमचा आनंद ओसंडून वहात होता. या वेळेस नकाशावर पूर्ण ट्रेल आमच्याकडे नव्हती पण आम्ही वाट शोधली होती. एक वेगळीच अचिएव्हमेन्ट. हा आनंद साजरा करायच्या आधीच याला गालबोट लागले, जवळपास अर्धातास आम्ही त्या वाटेने खाली उतरलो आणि अचानक एके ठिकाणी थबकलो वाटेत दरड कोसळलेली होती आणि वाट बंद झाली होती. पुन्हा नवीन आव्हान आणि नवीन गणिते मांडायची वेळ आली. वेळ पुढे सरकत होता आणि आम्हालाही त्वरित निर्णय घेऊन पुढे सरकणे भाग होते. कुठूनच मार्ग दिसेना. एकावर एक रचलेले दगड, रिबीन किंवा चिंध्या, कापलेल्या फांद्या काही काही  दिसेना.  या मार्गाने कोणी जा ये केली असती तर काही तरी खुणा सापडल्या असत्या पण आज नियतीने आम्हाला चुहूकडून घेरले होते.  शेवटी शेजारी वाहणाऱ्या पाण्याच्या मार्गातून जेवढे शक्य होईल तेवढे खाली जाऊ, पुढे काही तरी मार्ग दिसेल या आशेवर आम्ही पाण्याच्या वाटेने अर्थात नाळेच्या वाटेने खाली उतरणे चालू ठेवले. 

जाखमाता मंदिर 
नारमाता मंदिर 

   आता मात्र आमचा सगळा कारभार रामभरोसे चालू होता.  सुपेनाळ च्या ट्रेक मध्ये सुद्धा असाच अनुभव आला होता पण आज दुसरा इलाज नव्हता, पाण्याला वाट नसते आणि ते कुठूनहि खाली गुरुत्वाकर्षणाने येऊ शकते पण त्याच्या वाटेवर आपण विसंबून राहू शकत नाही. पुढे कुठल्यातरी कड्यावरून पाणी खाली उडी मारू शकते, पण आपण नाही. राहुलने त्याची भीती प्रांजळपणे मांडली कि ह्याच वाटेने परत वरती जायची वेळ आली तर वाट लागेल. "शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला लागली आग". अगदी झालेही तसेच. पुढचे वाटेतील दगड प्रचंड शेवाळलेले होते आणि पुन्हा नाळेच्या वाटेतून रानात जाणारी कुठली वाट हि दिसेना. एव्हाना आम्ही बरेच खाली आलो होतो. जवळपास २०० मीटर तरी खाली उतरलो होतो. 

तरीसुद्धा आमच्यातले survival instinct अजून शाबूत होते.  चहूबाजूला कुठून बाहेर पडायचा मार्ग दिसतोय का याचा नव्याने शोध सुरु झाला. शेवटी कारवी मोडून शेजारच्या डोंगरावर चढून काही मार्ग दिसतोय का याचा प्रयत्न झाला पण सर्व व्यर्थ. संधिप्रकशाची जागा हळूहळू काळोख व्यापत चालला होता त्यामुळे शेवटचा एकाच मार्ग दिसत होता. आता अतिहुशारी न करता आणि जास्त डोके न लावता पुन्हा आलो त्या वाटेने वरती जाणे आणि माचीवर पोहोचून पुढचा निर्णय घेणे. सर्वात प्रथम त्या जंगलामधून बाहेर पडणे महत्वाचे होते. वाट उतरायची ह्या हिशोबाने सर्वांकडे पाणी थोडेच होते. राहुल आणि सुशीलच्या मोबाइल चे चार्जिंग जेमतेम उरले होते आणि धो धो पावसाला  सुरुवात झाली होती. आलो तेवढे अंतर आता धोधो पावसात पुन्हा वर चढणे आणि ज्या ठिकाणी रानातून पाण्याच्या नाळेत शिरलो त्या ठिकाणी पोहोचून पुन्हा रानातल्या वाटेने वरती  जाखमाता, खिंड, नार माता मंदिर या मार्गे सिद्धगड माची वर पोहोचणे.  दिवसभराच्या धावपळीनंतर आमची स्वतःचीच बॅटरी संपायला आली असताना, तुटपुंज्या मोबाइल च्या बॅटरी च्या आधारे आम्हाला उलटा खडतर प्रवास करायचा होता. तिघांचीही डोकी सुन्न झाली होती पण कसे तरी धैर्य एकवटून आम्ही नाळेच्या वाटेतून वर चढायला सुरुवात केली. मला का कोण जाणे दूधसागरच्या घटनेची आठवण यायला लागली. (दुधसागर) डोंगरमाथ्यावर ढगांची आदळआपट सुरु झाली होती. नाळेच्या वाटेतून येणाऱ्या पाण्याचा वेग वाढत होता आणि आम्ही बाहुबली सारखे प्रवाहाच्या उलट दिशेने वरती चढत होतो. 

       आता मानसिक संतुलन कितीही स्थिर ठेवले तरी नुसत्या मानसिक बळावर लक्ष्य गाठणे शक्य नव्हते.  शारीरिक कष्ट सोसायची परिसीमा कधीच ओलांडली होती, पायात पुन्हा सकाळ सारखे cramp यायला लागले. इतके वेळ चष्म्याच्या कडांनी ओघळणारे घामाचे खारट क्षार डोळ्यात जाऊन डोळे झोंबत होते. ते सताड उघडे ठेवले तरी समोर दिसत होते फेसाळणारे पाणी आणि आजूबाजूच्या जंगलात पसरलेला  काळाकुट्ट काळोख. 

मनातल्या अनामिक भीतीमुळे वेग मंदावला आणि आम्हा तिघांची ताटातूट झाली. तिघेही तीन दिशेला जंगलात पांगलो. सुरुवातीला मला सुशीलचा आवाज येत होता पण नंतर पावसाच्या आवाजाला भेदून त्याला उत्तर देणे मला शक्य होत नव्हते. राहुल मधेच कुठे गायब झाला काही कळायला मार्ग नव्हता. कदाचित रानातून ज्या ठिकाणी नाळेच्या वाटेत शिरलो ती जागा त्याला सापडली असेल आणि तो वर पोहोचला असेल अशी माझी समजूत मी करून घेतली. 

     पण आता या जंगलात आपण ऐन पावसात पुरते फसलो आहोत या भीतीने माझी पूरती  गाळण उडाली आणि लक्षात आले आता खारट पाणी डोळ्यात जात नाहीये कारण चष्मा नाळेच्या वाटेत पाण्यात कुठे तरी वाहून गेला होता. पावसाच्या पाण्याने मी नखशिखांत भिजलो होतो. चालून गरम झालेल्या अंगावर धोधो पावसाने मारा केला होता त्यामुळे आता अंगात थंडी भरत होती. हातातल्या घड्याळावर रक्तदाब बघितला तर तो १६० च्या वर गेला होता. डोकं बधिर झाले, काय करावे सुचेना. ओरडून हाका मारून पण काही फायदा नव्हता. 

         शेवटी मी एक क्षण थांबलो,  नाळेतून रानात शिरण्याच्या विचार मी सोडून दिला. हळूहळू ह्याच मार्गाने वर जाऊ कुठे तरी  सपाटी लागेल तेंव्हा तिथून माचीचा मार्ग शोधू असा विचार माझ्या डोक्यात आला पण मधेच कुठे चढता नसते आले किंवा धोधो वाहणाऱ्या पाण्यात कुठे पडझड झाली असती तर केव्हढ्यात पडेल. पण चान्स घेण्याशिवाय पर्याय नव्हता. सुदैवाने मी हेडटॉर्च आणला होता तो डोक्याला लावला थोडीशी ORS पावडर खाली. घड्याळ्यावर नॅव्हिगेट बॅक चा पर्याय कुठे सापडतो का याचा शोध घेतला पण ओल्या झालेल्या हातांमुळे ते जमत नव्हते त्यामुळे त्याचाही  नाद सोडून दिला. हळूहळू मी  पाण्याच्या वाटेतील दगडधोंड्यांच्या आधारे पाण्याला भेदत वरती चढू लागलो. बऱ्यापैकी वर चढल्यावर विचार केला याला अंत नाही त्यामुळे कुठे तरी रानात घुसलो तरच लवकर वरती पोहोचेन अन्यथा पाऊस वाढला तर या नाळेच्या वाटेने जाणे अवघड होईल. शेवटी मी कुठे तरी उजवीकडे रानात शिरलो माझा टॉर्च बहुधा राहुल किंवा सुशील ला दिसला आणि त्यांनी मला आवाज दिला "अजून उजवीकडे ये, वाट दिसेल" त्यांचा आवाज ऐकून मी सुटकेचा निश्वास टाकला. वाट तिथेच होती आणि मग सुरु झाली आमची तिघांची एकत्रित उलट यात्रा. आता कितीही उशीर झाला तरी एकत्रच राहायचे ठरले. त्यांच्या मोबाइलला ची बॅटरी मरायला आलेली. सुदैवाने मी माझा मोबाइल flight mode वर टाकला होता आणि हेड टॉर्च माझ्या कडे होता त्यामुळे पुन्हा एकदा चुकलेल्या गणिताचा गुंता सुटेल अशी आशा पल्लवित झाली. 

कसे तरी करत  जाखमाता मंदिरापाशी आलो. माझे पाय बोलू लागले होते आणि एक एक पाऊल टाकणे सुद्धा मला  आता जिकिरीचे होत होते. पण  राहुल सुशील मला प्रोत्साहन देत होते. आता फक्त खिंड राहिलीये रे. ती चढून वर गेलो कि माची वर. 

पण आज नियती ने आम्हाला नापास करायचेच  ठरवलेच होते त्यामुळे पुन्हा एकदा जाखमाता मंदिरापासून खिंडीत वर चढणारी वाट सापडेना. एक ५ मिनिट चकवा लागल्यासारखे झाले. त्यात हेडटॉर्च च्या प्रकाशात मला झाडावर काही सरडे किंव्हा सापसुरळी तत्सम काही जीव सरकताना दिसले. त्यामुळे जास्त वेळ एकाजागी थांबताना सुद्धा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या भीतीने जीव घाबराघुबरा होत होता. इतक्यात मला मस्त कोरलेल्या पायऱ्या दिसल्या आणि आमची शोधयात्रा संपली वाट सापडली आणि आम्ही खिंडीत पोहोचलो. झपझप उलट्या बाजूला उतरून आम्ही सिद्धगड माची गावात प्रवेश केला वाजले होते ७/७:१५. 

जाखमाता मंदिराजवळ कुठेतरी  राहुलच्या डाव्या भुवई जवळ जखम झाली होती कुठली फांदी लागली का घसरून पडला ते त्यालाच ठाऊक. तिथले रक्त  साखळलेले होते आणि सूज हि आली होती. हे दुखणे कमी त्यात परत हा पावसातील उलटा प्रवास. असा सगळा पराक्रम आणि त्याच्या खुणा मिरवत आम्ही गावात प्रवेश केला होता. आता गावात सर्व हकीकत सांगितली तर वन खात्याकडे प्रकरण जाऊन बोंबाबोंब होते शकते त्यामुळे तिघांनी एकाच वाक्यावर ठाम राहायचे ठरले. गावात कोणी विचारले तर सांगू "जाखमाता मंदिराच्या इथे पाऊस सुरु झाला, वाट पहिली पण पाऊस थांबेना म्हणून आम्ही परत आलो. "  

पुन्हा एकदा दुपारी  जेवलेल्या कोकाटे काकांच्या घरी दरवाजा ठोठावला. एवढ्या उशिरा अंधारात आणि तेही बाहेरच्या धोधो पावसात आम्हाला पाहून ते चपापले. त्यांना अंदाज आला पण त्यांनी अजून उपदेशाचे डोस द्यायच्या आधीच आम्ही त्यांना आमचा प्लॅन सांगितला. जे व्हायचे ते झाले होते आम्ही पावसात अडकलो आणि जाखमातेच्या रस्त्याने बोरवाडी पर्यंत जाऊ नाही शकलो. त्यांना आम्ही विनंती केली कि आजची रात्र आमची राहायची सोय करा मग उद्या सकाळी आम्ही उठून जातो.  जर कोणी वाटाड्या असेल तर पुन्हा जाखमातेच्या रस्त्याने जाऊ  आणि त्याच्याकडे तुमचे आणि त्याचे दोघांचेही  पैसे देऊ कारण आमच्याकडे आत्ता पैसे हि नव्हते आणि त्यांच्याकडे google pay वगैरे सारखे पर्याय नव्हते. आणि असते तरी आमच्या मोबाइलच्या बॅटऱ्या शेवटच्या घटका मोजत होत्या.  

           काका आधी तयार होईनात. थोडे पुढे जाऊन एक मंदिर आहे तिकडे रहा असा सल्ला त्यांनी आम्हाला दिला पण ओल्या कच्च कपड्यामध्ये उघड्यावर पूर्ण रात्र काढणे शक्य नव्हते. परत सिद्धगड माची हा सुद्धा भीमाशंकर अभयारण्याचा भाग त्यामुळे रात्रभर हिंस्त्र पशूंची भीती होतीच. आम्ही त्यांना चहा मिळेल का आणि असेल तर तेवढा द्या मग आम्ही बघतो असे बोलल्यावर त्यांना आमची दया आली असावी. त्यांनी चहाची व्यवस्था केली आणि गावात एक रिकामे घर आहे तिथे तुमची सोया करतो असे आश्वासन दिले. सुशील आणि काका पावसात जाऊन ते घर बघून आले. आज इथेच राहून उद्या सकाळी घरी येतोय असे लागलीच घरच्यांना कळवून टाकले कारण मोबाइल कधी विझले असते याचा नेम नव्हता आणि गावात वीज सुद्धा नव्हती त्यामुळे तो पुन्हा चार्ज करायचा प्रश्नच नव्हता.  

तिथे आमची अगदी फाईव्ह स्टार सोया झाली होती. मस्त दगडी जोत्यावर  कळकाच्या काठयांनी शेणा मातीने शाकारलेले आणि सारवलेलं कौलारू घर होते. घरात कपडे वाळत घालायला दोऱ्या होत्या. एक प्रशस्त लाकडी दिवाण होता. चूल होत. आम्ही आत जाऊन  थोडंफार झाडून घेतले आणि  स्थिरस्थावर झालो. काकांनी आम्हाला सतरंजी, चटई,  अंग पुसायला टॉवेल सुद्धा दिले होते. सर्व प्रथम आम्ही ओले कपडे वाळत घातले आणि दिवसभर घडलेल्या चुकांची उजळणी करायला बसलो. काकांनी आम्हाला बदलायला कपडे सुद्धा दिले होते. ते बदलल्यावर आणि घरात चूल पेटल्यावर जरा घर उबदार वाटू लागले.  एखाद्या मठाधिपती सिद्ध पुरुषाने वस्त्रांमध्ये न अडकता  दिगंबर रहावे  त्या प्रमाणे कोणतीही लाज ना बाळगता  आम्ही शर्ट आणि टॉवेल या अनोख्या सोवळ्यात त्या घरामध्ये स्थिरस्थावर झालो.  

सुशीलला भरलेली थंडी पण पळून गेली आणि  राहुलचे त्याच्या सुजलेल्या डोळ्याकडे पण लक्ष गेले. वीज नसल्यामुळं मोबाइल आणि हेडटॉर्चच्या प्रकाशात राहुलने भुवईवरची खपली काढली आणि  त्यातील रक्त दाबून काढून सूज उतरवण्याचा रानटी प्रयत्न केला. कारण घरी आई आणि स्वानंदी त्याच्या सुजलेल्या डोळ्याकडे कानाडोळा करू शकणार नव्हत्या आणि तो त्यांच्या नजरेला नजर देऊ शकणार नव्हता त्यामुळे घरी पोहोचायच्या आत त्याचा बंदोबस्त त्याला करायचा होता. 

  

येताना कुठल्या कुठल्या दगडगोट्यांवर  हातपाय आपटले होते,  कुठे झाडांच्या फांद्यांनी खरचटले होते ते आता जाणवू लागले होते. पावसाचा जोर काही कमी होईना. शेवटी काका पिठलं भात घेऊन आले आणि त्या देवमाणसाने दिलेल्या त्या प्रसादाचे भक्षण करताच आमच्या  जीवात जीव आला. दिवसभर पावसात भिजल्यामुळे नाक चोंदले होते. चुलीजवळ पेटती लाकडे फुंकून कानाला बसलेले दडे आणि नाक मोकळे करायचा प्रयत्न केला पण फार यश आले नाही. शेवटी काकांनी दिलेल्या ब्लँकेट्स मध्ये शिरताच मी माझ्या चोंदलेल्या नाकाने वरचा निषाद लावला आणि झटकन तारसप्तकात शिरलो. पुढे त्याच गजराने राहुल सुशील मला सकाळी उठलेले दिसले. समोरच्या घरातल्या काकांनी कार्यालयात असावे तसे मोठे पातेले बाहेर आणले होते आणि मोठ्या चुलीवर त्यांनी पाणी तापायला ठेवले होते. पाऊस थांबला होता. अंधारातच प्रातःर्विधी उरकून घ्यावा असा विचार डोक्यात आला पण निसर्गाने आमची एवढी क्रूर चेष्टा केली होती कि आमचे शरीर आता निसर्गाच्या हाकेला सुद्धा ओ द्यायला तयार नव्हते त्यामुळे अजून त्यावर बळजबरी करून त्याची हेळसांड करण्याचा प्रयत्न सोडून दिला. परत एवढ्या तेव्हड्या कारणासाठी पुन्हा ओले शूज घालायचा कंटाळा तो वेगळाच. तरी पण मी जाऊन समोरच्या काकांना राहुल चा मोबाइलला चार्जिंग ला लावायची विनंती करून आलो त्यांनी तो लावला देखील पण विशेष काही चार्ज  झाला नाही. 


कोकाटे काकांना सकाळी वाटाड्या बद्दल विचारणा करताच कळाले कि तो शेतावर गेला आहे त्यामुळे तो येईपर्यंत वेळ घालवण्यात अर्थ नव्हता त्यामुळे आम्ही काकांच्या मुलाच्या नंबर वर google pay करून त्यांचे आभार मानले आणि रजा घेतली.  परतीच्या  प्रवासात आमची वाट सोडून गेलेले श्वान युगुल पुन्हा आमच्या पायांमध्ये घुटमळू लागले. रात्रभर कुठे गायब झाले होते देव जाणे. त्यांना सुखरूप पाहून बरे वाटले.  आम्ही आलो त्या मार्गानेच पुन्हा बोरवाडीला जायचा रस्ता धरला.  

पाऊस पूर्णपणे थांबला होता कालचे मळभ दूर झाले होते आणि गावातून पठारावर मोकळ्या जागी येताच आम्हाला जे काही दिसले ते स्वर्गापेक्षा कमी नव्हते. कदाचित त्यासाठीच कालच्या मरणयातना भोगल्या असाव्यात. वातावरण स्वच्छ होते. कोवळ्या उन्हात गवताची पाती चमकत होती. एका  बाजूच्या  दरी मध्ये सगळे ढग जमा झाले होते आणि दूरवर दिसत होते माहुली गडाचे सुळके, चंदेरी, ताहुली आणि माथेरान ची पूर्ण डोंगररांग. तर दुसरीकडे पदरगड, कोथळीगड, नाखिंद्या,आणि भीमा शंकरचा परिसर. अजूनही बरेच गडकोट विरत  चाललेल्या धुक्यातून त्यांचे दर्शन देत होते. जांभूर्डे धरणाच्या जलशयावरून ढगांची चादर आजूबाजूच्या हवेत विरळ होत चालली होती. सिद्धगडाच्या कपारींमधून सगळे धबधबे प्रवाही झाले होते आणि हे सगळे दृश्य नजरेत साठवायला आज आमच्याकडे वेळ आणि चांगली मनस्थिती होती. कदाचित हेच सह्याद्रीचे अफाट, विराट आणि लोभस दृश्य दाखवण्यासाठीच सिद्धगडाने आम्हाला तिथे राहायची गळ घातली असावी. कितीतरी  ट्रेकचे यशस्वी आयोजन आणि अंमलबजावणी करून देखील या वेळेस कशी काय चूक झाली या विचाराने ग्रासलेल्या आम्हा तिघांना मात्र निसर्गाचा प्लॅन आज उलघडत होता. कदाचित हेच त्या विधात्यास अपेक्षित असावे म्हणून त्याने आमचे नानाविध संकटांपासून  रक्षण केले, वेळेला कोकाटे काकांच्या रूपाने आम्हाला दर्शन आणि मार्गदर्शन दिले. आम्ही चुकत होतो पण आमच्या मागे त्या मुक्या जनावरांना भरकटू नाही दिले. आणि मुख्य म्हणजे कितीही ट्रेल चा अभ्यास केला तरी निसर्गाला गृहीत धरून कोणतीच मोहीम फत्ते करता येणार नाही हा मोठा धडा आम्हाला शिकवला. आम्ही जी ट्रेल पाहून आराखडा आखला होता तो बरोबर होता पण ज्यांनी आधी हा ट्रेक केला होता ती वेळ जानेवारी मधली होती आणि आम्ही ऑक्टोबर मध्ये एवढ्या मोठ्या पावसाची अपेक्षा केली नव्हती आणि तिथेच सगळे चुकत गेले.

 

 

     दिवसाढवळ्या त्या निसरड्या वाटेने येताना रात्री तिथेच राहायचा निर्णय योग्य होता आणि तो वेळीच घेतला या बद्दल आम्हालाच आमची पाठ थोपटून घ्यावीशी वाटत होती. सुकलेले कपडे पुन्हा एकदा छातीएवढ्या गवताच्या वाटेने चालताना ओले होऊन गेले पण आज त्याची तमा नव्हती  कारण  ऊन पडले होते. सकाळी ८: ३० पर्यंत आम्ही खाली बोरवाडी गावात आलो. काही मुले आम्हाला वाटेत भेटली त्यांना आमच्या अनुभवानुसार थोडे मार्गदर्शन केले आणि तब्बल ४ तास तरी वर पोहोचायला लागतील (सिद्धगड माची २ तास आणि बालेकिल्ला २ तास) असा मित्रत्वाचा आणि खराखुरा सल्ला दिला. पेंद्या सदृश्य व्यक्ती हसतमुखाने आमची वाट बघताना आढळला. त्यांच्या घरात कपडे बदलून आणि काही वेळ मोबाइल चार्ज करून घेऊन आम्ही पुण्याकडे निघण्यास सज्ज झालो एवढ्यात तिथे पन्नाशी ओलांडलेल्या वयस्कर ट्रेकर्सचा ग्रुप तिथे आला. आमच्या कडे चौकशी करताच आम्ही त्यांना वाटाड्या घायचा सल्ला दिला. खरेतर ९ वाजले होते पण तरी सुद्धा पुढच्या दिव्य संकटाची नुकतीच अनुभूती घेतलेल्या आम्हाला त्यांची काळजी वाटू लागली पण सगळे आमच्यासारखेच पट्टीचे ट्रेकर्स वाटत होते आणि त्यात त्यांनी आमचा सल्ला ऐकून वाटाड्या घेतला होता हे पाहून बरे वाटले. त्यांना ऑल  द बेस्ट करून आणि गावात फक्कड बिना दुधाचा चहा पिऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला. 

       वनखात्याच्या चेकपोस्ट जवळ पुन्हा एकदा वेगळ्या अधिकाऱ्याकडून चौकशी झाली. तिथे गाडी लावून आम्ही जांबुर्डी धरणाच्या जलाशयावर गेलो. थोडेफार फोटो सेशन करून आम्ही रस्त्याला लागलो  आणि अशा प्रकारे बिना चष्मा साऱ्या प्रवासात गाडी ड्राईव्ह करून माझ्या डोळ्यांना दिव्यशक्ती प्राप्त झाली होती. कालच्या दिवसापासून सतत नवीन आव्हानांना तोंड देऊन एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला होता. सिद्धगडाच्या आठवणी मनात रुंजी घालत असतानाच  दुपार पर्यंत घरी पोहोचलो.  घरी आल्यावर सगळया गोष्टींना रेंज आली. नकाशावर किती थोड्या अंतरासाठी गडबड झाली आणि आमचा एक दिवसाचा प्लॅन दोन दिवसाचा झाला हे पाहिल्यावर आम्ही तिघेही हळहळलो.


so close, yet so far  

  

 या वेळेस डोक्यात पुढच्या ट्रेकचा विषय नव्हता कि उद्याचा ऑफिस चा सुद्धा.  या वेळेस अगदीच हौश्या नवश्या ट्रेकर प्रमाणे आमचा ट्रेक झाला होता. कुठे संकटात अडकलो नाही किंवा  वेळेला कसे योग्य निर्णय घेतले याचा अहंगंड  मिरवावा कि थोडे आत्मपरीक्षण करावे आणि ज्या चुका टाळता येऊ शकत होत्या त्या पुढच्या वेळेस कशा टाळाव्यात या साठी सिंहावलोकन करावे हाच सवाल उरला आहे. त्याचे उत्तर मिळायचे असेल तेव्हा मिळेल पण एक मात्र खरंय, सिद्धगडाने आम्हाला एक नवीन सिद्धी प्राप्त करून दिली आणि आमचे डोळे उघडून दिले.  

      सुशील, राहुल कितीही म्हणत असले आता यापुढे ट्रेकिंग बंद तरी ते त्यांना कितपत शक्य होईल ते त्या सिद्धगडास ठाऊक. असो. अधून मधून असे अनुभव घेणे सुद्धा गरजेचे असते या मताचा मी आहे त्यामुळे ह्यातून धडा घेऊन ट्रेकिंग चालू ठेवायचा माझा तरी मानस आहे. बाकी कार्य सिद्धीस नेण्यास 'श्री' समर्थ आहेतच.     


भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन थरारक ट्रेक वर... अशीच अनुभवांची सिद्धी प्राप्त करायला. 


हरहर महादेव 

---वैभव 
फक्त नावात 















Thursday, March 17, 2022

रिठ्याचे दार - घोडपाण्याची नाळ

             सालाबाद प्रमाणे फेब्रुवारी मध्ये सिंहगड राजगड तोरणा असा तगडा ट्रेक झाला. एकाच दिवसात ४० किमी पेक्षा जास्त अंतर आपण चालू शकतो हे पडताळून पाहल्यावर आत्म विश्वास दुणावला होता. गेल्यावर्षी मार्च मध्ये चकदेव महिमंडणगड, पर्वत आणि कांदट जावळी परिसरातील तेलसरीची घाटवाट केली होती. या वर्षी पण उन्हाळा वाढायच्या आधी २-४ अवघड घाटवाटा करून घ्याव्या असे वाटत होते आणि बरेच विचार मंथन झाल्यावर रिठ्याचे दार आणि घोडपाण्याच्या नाळेचा ट्रेक ठरला. सुशीलने नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण आयोजन केले आणि ट्रेकची रूपरेषा ग्रुप वर पाठवली. राहुल कोंडेचे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तळ्यात मळ्यात चालले होते पण तरी सुद्धा ट्रेक नाही तर निदान प्रवासात तरी आम्हाला सोबत करता येईल म्हणून तो सपत्नीक आकाश ला नाष्टासाठी आम्हाला भेटला. आमचा ट्रेक ऑफबीट असला तरी कधी कधी संसारिक धोपट मार्ग सोडून चालत नाही म्हणून कोंडे दाम्पत्य आज शिवनेरीचा ट्रेक करणार होते.  
            मी, सुशील, दिलीप आणि प्रसाद सर सकाळीच पुण्याहून निघालो होतो.  तांबडं  फुटायला लागले होते तेंव्हा आम्ही मंचर पार करून आकाश हॉटेल ला नाष्ट्या साठी पोहोचलो. आज आम्हाला कुठेच गर्दी लागली नाही. आम्हाला अभिवादन करून राहुल आणि मंडळी त्यांच्या  दुचाकीवर पुढे रवाना झाले.  आम्ही जुन्नर च्या दिशेने ९ वाजायच्या आसपास आंबोली गावात पोहोचलो. नियमानुसार दिलीपने कलिंगडापासून द्राक्ष्यापर्यंत सर्व आकाराची, वजनाची आणि चवीची फळे घेतली. आंबोली गावातून दाऱ्या घाट सुरु होतो तेथे सुरुवातीला किसन मोरेंचे घर आहे.  गावातून कोणी वाटाड्या मिळेल का? याची चौकशी केली पण त्यांच्या घरातून कोणी उपलब्ध नव्हते पण गावात आलेल्या पाहुण्याचे योग्य आदरातिथ्य झालेच पाहिजे असा शिष्टाचार अजून हि आहे आणि गावातील  लोक तो  मनोभावे पाळतात सुद्धा. काकांनी कासळेंच्या घरी चौकशी केली आणि बबन कासळे आमच्याबरोबर यायला तयार झाले. ह्या सगळ्यात पाऊण तास गेला, ऊन वाढायच्या आधी ट्रेक सुरु करणे गरजेचे होते पण किसन मोरेंच्या घरी त्यांच्या निरागस नातीने, सईने आम्हाला खिळवून ठेवले. रविवारी शाळेत जायचे म्हणून आजोबांकडे हट्ट करत होती मग काय दिलीप गुरुजींनी लगेच शाळा भरवली. पाटीवर दोन चार रेघोट्या मारेपर्यंत कोंबडीच्या पिल्लांनी वर्गात एकाच धुडगूस घातला. छोट्या उत्साही विद्यार्थिनी ला लिमलेट ची गोळी देऊन मग शाळा सुटली आणि आम्ही वाटाड्या बरोबर ट्रेकची  सुरुवात केली. 

दिलीप गुरुजींची शाळा 
सई 
तेरा नाम क्या है बसंती 


















आंबोळ्या 

            आत्तापर्यंतच्या अनुभवाप्रमाणे गावातील कुत्रा /कुत्री ट्रेक मध्ये नेहमीच साथ देतात तशीच या वेळी देखील एक कुत्री आमच्या बरोबर ट्रेक मध्ये सहभागी झाली. ती बबन मामांच्या घरचीच होती पण तिला विशेष असे काही नाव नव्हते म्हणून मग आम्हीच "तेरा नाम  क्या है बसंती" म्हणत तिचे नामकरण केले. डाव्या हाताला ढाकोबा ची वाट होती तिला फाटा मारून आम्ही विरुध्द्व दिशेने समोरच्या डोंगरावर चढू लागलो. सुरुवातीलाच  आंबटचिंबट आंबोळ्याचा रानमेवा खायला  मिळाल्यामुळे ट्रेक चा श्रीगणेशा तर गोड झाला होता. 

        फारसे कोणी या अनवट वाटा धुंडाळायला जात नाहीत त्यामुळे वाटाड्या घेण्याचा निर्णय योग्य होता. गावात मिळालेल्या माहितीनुसार रानात असलेल्या जंगली श्वापदांची कल्पना आली आणि वाटेत दिसलेल्या विष्टेवरून पट्टेरी वाघ, बिबट्याचा वावर तिथे आहे या माहितीला पुष्टी मिळाली. नुकतेच वाघाने १४ शेळ्यांचा फन्ना उडवला होता असे कळले आणि काळजात चर्र झाले. आम्ही डाव्या हाताला दाऱ्या घाट आणि ढाकोबा मागे सोडून कारवीच्या रानातून वर चढत होतो. कोयता फिरवत बबन मामा रस्ता मोकळा करत होते. अर्ध्यातासात डोंगरमाथ्यावर पोहोचलो. मागे उच्छिल गावातील जलाशय उन्हामुळे चकाकत होता आणि समोर दिसणाऱ्या विस्तीर्ण दरी मधून दिसत होता खाली पसरलेल्या कोकणाचा नजरा. हेच ते रिठ्याचे दार. हाच ट्रेक खालून कोकणातून सुरु करणारे लोक सिंगापूर - पुळे  गावातून  करतात. ढाकोबावरच्या कोकण कड्यावरून हाच परिसर आणि जीवधन, वानरलिंगी पहिला होता त्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या. हा कोकणकडा एक भौगोलिक आश्चर्य आहे. उजवीकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात पाऊस पडतो तर डावीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अरबी समुद्रात पाऊस पडतो असे STF च्या सुरेंद्रभाऊ दुगड यांनी सांगितले होते त्या अभ्यासाची उजळणी झाली.  पण आज आमच्या जीवस्य जीवधन चे अजूनही दर्शन झाले नव्हते. दिसत होती ती मोठी खिंड आणि हरिश्चन्द्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी दगड धोंड्यांची अतिशय दुर्गम वाट. सुरुवातीला थोडे कारवीचे रान होते त्यामुळे नेमकी वाट कुठून आहे त्याचा अंदाज येईना. पण वरून दिसणारे दृश्य छायाचित्रात टिपण्याशिवाय दुसऱ्या शंकाकुशंका या गौण होत्या. काय व्हायचाय तो उशीर होऊ दे पण फोटो काढून मगच  निघू. मामांनी सुद्धा आम्हाला अजिबात घाई केली नाही उलट अशा जागा वाटेत खूप आहेत आपण पुढे अजून फोटो काढू असे सांगून त्यांनी आम्हाला चालते केले. कारवीच्या जंगलातून वाट काढत काढत आम्ही खाली उतरू लागलो. पायथ्याला असलेला सुकलेला ओढा आम्हाला दिसत होता तिथे नक्कीच कुठे तरी पाण्याची सोया होईल याची खात्री होती पण मध्ये वाटेत कुठेच पाणी दिसत नव्हते. होते फक्त उंच उंच प्रस्तर, कारवी आणि खुरट्या झाडांचे जंगल आणि दगड धोंड्याची अवघड वाट. अशा वाटा चढताना चांगलीच दमछाक होते आणि उतरताना तर विशेष काळजी घ्यावी लागते कारण वेगावर नियंत्रण, शरीराचा तोल, वाटेवरच्या दगडांवरची नजर आणि एकाग्र चित्त अशी चहुबाजूने कसरत करावी लागते. 

  
थोडा टप्पा उतरलो कि आम्ही पुन्हा सिंहावलोकन करत. किती खाली आलो आणि अजून किती  अंतर बाकी आहे. ट्रेकच्या उत्तरार्धात आम्हाला जेवढे उतरणार होतो  तेवढेच पुन्हा घोडपाण्याच्या नाळेने वर चढायचे होते. जेवणाची वेळ, कापलेले अंतर आणि शिल्लक राहिलेले अंतर, चढाई, वाढणारे ऊन  याचे गणित सतत मनात चालू होते. सकाळचे फोटोसेशन आणि या अवघड  वाटेने आमचा वेग  मंदावला  होता. ऊन देखील वाढत होते. एवढ्यात मामांनी एका उंबराच्या झाडाच्या मुळाशी  असलेली ओलसर जागा दाखवली आणि काय आश्चर्य, एकदम थंडगार पाणी !! हीच तर खासियत घाटवाटांची. या जलस्रोतांचा वापर माकडे आणि इतर पशु करतात पण स्थानिक गावकऱ्यांशिवाय आपल्याला अशा जागांचा थांगपत्ताच लागणार नाही. आमच्याकडे पुरेसे पाणी होते त्यामुळे फार वेळ तिथे नदवडता  आम्ही पुढे सरकलो. जिथे मोठे मोठे दगड होते ज्यामुळे वाट बंद होत होती तिथे बाजूच्या डोंगरावर झाडीत शिरून पुन्हा मुख्य वाटेला लागावे लागत होते. अशा पेच प्रसंगी बसंती आम्हाला बरोबर वाट दाखवत होती अन्यथा ती आमच्या मागे राहायची. पण एके ठिकाणी जवळजवळ १५-२० फूट उंचीचा रॉकपॅच होता आणि नक्की वाट दिसेना. मामा सांगत होते कडेच्या डोंगरावर थोडे चढून परत खाली उतरायला मिळेल पण एवढे कष्ट घेण्यापेक्षा "आज कूच तुफानी करते है"  म्हणत दिलीप बिना दोराचा तो रॉकपॅच  खाली उतरले देखील. आमच्या कोणामध्ये इतका आत्मविश्वास नव्हता पण एक जण खाली उतरला कि पुढचे गणित सोपे होते आणि झालेही तसेच. कपारी मध्ये उगवलेल्या झाडांच्या मुळ्या घट्ट होत्या, त्या पकडून थेट खाली उतरलो. आणि मग सगळ्यांचाच आत्मविश्वास वाढला. 
रॉकपॅच 
पण बसंतीची मात्र इथे मोठी पंचाईत झाली. केवीलवाण्या स्वरात भुंकून तिने आम्हाला आवाज दिला. मामांनी  तिला कोयत्याने "झाडातुन ये कडेच्या"  असा इशारा दिला आणि तिने तो ऐकून रस्ता शोधून काढला. पुढे जिथे जिथे असे अवघड टप्पे आले तिथे कधी उलटे तर कधी सुलटे होऊन आम्ही खाली उतरू लागलो. अगदीच गरज पडली तर दिलीप यांचे भगवे उपरणे आज दोराचे काम करत होते. ऊन वाढत असल्यामुळे आम्ही वेग थोडा  वाढवला पण डोंगरदऱ्यांमध्ये अशी घाई करून चालत नाही हात, पाय आणि मेंदूचे संतुलन ठेवून शांत चित्ताने वाटेवर नजर ठेवावी लागते नाही तर मग "नजर हटी दुर्घटना घटी". सुशील चा पाय एका दगडावरून घसरला,  थोडेसे किरकोळ खरचटले आणि हायकिंग पोल दगडात अडकून वाकला. पण सुशील नि स्वतःला वेळीच सावरले. तो जरा स्थिरस्थावर  झाल्यावर पुन्हा एकदा रपेट सुरु केली. थोड्याच वेळात आम्हाला दर्शन झाले सह्याद्रीच्या राकट अलंकारांचे. उन्हामध्ये चकाकणारा जीवधन चा काळाकभिन्न कडा, वानरलिंगी, टोक, पळूची लिंगी असे सुळके आणि नानाचा अंगठा दिमाखात उभे होते. या आधी दोन्ही मार्गानी म्हणजे नाणेघाट बाजूने आणि घाटघर बाजूने जुन्नर दरवाज्याने मी जीवधन वर गेलो होतो पण इथून जीवधन बघताना संपूर्ण नाणेघाटापर्यंत पसरलेली त्याची उत्तुंगता पाहून डोळे थक्क होऊन गेले.  


रिठ्याच्या दार वाटेवरून जीवधन दर्शन 



तिथे मनसोक्त फोटो काढून आम्ही अल्पावधीत खाली दिसणाऱ्या ओढ्या पाशी पोहोचलो इथून आम्हाला परत वर चढायचे होते. पण ट्रेक चा उत्तरार्ध सुरु करायच्या आधी जेवण गरजेचे होते. दुपारचा एक वाजला होता रिठ्याचे दार उतरून आम्ही पूर्णपणे खाली आलो होतो. डावीकडची वाट सिंगापूर गावात जात होती. तर उजवीकडे ओढ्यात काही आदिवासी लोक मासे पकडत होते त्यांच्याकडून पुढच्या घोडपाण्याच्या नाळीचा रस्ता विचारून नक्की करून घेतला. इथे मुबलक पाणी होते. सावलीची जागा बघून आम्ही अंगत पंगत मांडली. पण मामांचा उपवास होता त्यांनी त्यांच्या बरोबर तांदळाची भाकरी आणि गूळ आणला होता त्यांना आम्ही आमच्याजवळची  फळे दिली आणि दिलीप यांची बॅग जरा हलकी झाली. तरी दिड किलोचे कलिंगड आम्ही पुढे रस्त्यात ऊन लागल्यावर कापायचे ठरवले.  आम्ही आमच्या कडच्या  पराठे, गुळाची पोळी, अंडी, फळे या वर आडवा हात मारला. बसंतीने मात्र कडक उपवास केला. ओढ्याच्या पाण्यात मात्र तिने मनोसोक्त जलक्रीडा केली आणि आमचे जेवण होईपर्यंत तिने मस्त वामकुक्षी घेतली. असो, पुणेकरांबरोबर ट्रेक करताना तिला सुद्धा वाण नाही पण गुण लागला. आम्ही सुद्धा एक एक डुलकी काढली पण फार वेळ घालवून चालणार नव्हते अन्यथा सूर्यास्ताच्या आधी ट्रेक संपणार नव्हता. तिथल्या पाण्यात थोडे ताजेतवाने झाल्यावर आम्ही चढाई सुरु केली.


मामांनी आता लीड घेतले होते आणि पुढे जाऊन ते थांबून आम्हाला  फोटो काढायच्या जागा दाखवत होते पण ऊन आणि कोकणातील दमट हवा म्हणजे आधी उल्हास त्यात फाल्गुन मास. फोटो वगैरे सगळे बाजूला सारून आम्ही थांबत थांबत कासवाच्या गतीने चढाई करत होतो.  जवळ जवळ ९०० मीटर इतकी चढाई करायची होती त्यामुळे बरोबर जास्तीचे पाणी लागणार होते. एवढ्यात एक लाल रंगाचे गुलमोहराचे  झाड दृष्टीपथात पडले. तिथून खाली एका झऱ्याप्रमाणे पाणी वाहत होते.  ह्या लाल सिग्नल ला थांबून पाणी भारण्याशिवाय पर्याय नव्हता. पाणी भरून घेतले क्षणभर तिथल्या शांततेत विसावलो. पक्षी निरनिराळे आवाज करून आमच्या आगमनाची चर्चा आपापसात करत होते. थोडे वर आल्यावर आम्हाला बाहुला बाहुलीचे सुळके दिसू लागले. 


अजून थोडे वर गेल्यावर एका मोठ्या दगडावर उजवीकडे वळण्यासाठी दिशादर्शक बाण कोणीतरी आधीच्या ट्रेकर्सने कोरून  ठेवला होता. सरळ जाणारी नळीची वाट थेट फांगुळगव्हाण ला जाते पण पडझड झाल्यामुळे ती वाट आता बंद झाल्याचे समजले. उजवीकडे सुरु होत होती घोडपाण्याची नाळ. चहू बाजूनी उंच उंच कड्यानी आम्हाला वेढले होते त्यामुळे आता उन्हापासून आमची सुटका झाली होती. मागे वळून पहिले तर आता तिसरा बाहुली चा सुळका पण दिसू लागला होता. सह्याद्रीमधली हि भातुकलीची खेळणी खेळायला धाडस लागते. तिन्ही बाहुल्यांचे  सुळके आम्हाला भुरळ घालत होते. जसे जसे नाळीतून वर वर जाऊ तसे निसर्गाचा शृंगार उलघडू लागला. बाहुली सुळक्यांच्या मधून वानरलिंगी डोकावू लागला, अजून थोडे वर गेलो तर जीवधन चा कडा दिसू लागला, त्याच्या अजस्त्र भितींवर हि सगळी सुळके रुपी खेळणी कोणीतरी अडकवून ठेवली आहेत असे  वाटत होती. तिथल्या निरव शांततेत आवाज घुमत होता त्यामुळे प्रतिध्वनी (echo) ऐकण्यासाठी आम्ही सगळ्यांनी घसे मोकळे केले आणि स्वरयंत्राच्या तारा छेडल्या. त्या आवाजांचा गुंजारव ऐकत ऐकत बऱ्यापैकी वर आलो. आता नानाचा अंगठा सुद्धा त्या दृश्यात घुसू पाहत होता. सगळ्या सुळक्याच्या गर्दीत जागा करून तो आपले वेगळे अस्तित्व दाखवून आम्हाला Thumbs up करत होता. संध्याकाळचे ६ कधी वाजले कळलेच नाही.  मावळतीचे रंग त्या सह्याद्रीच्या  कॅनव्हासवर शेवटचे रंग भरत होते. किती तरी फोटो काढले तरी समाधान होत नव्हते. पाय निघत नव्हता पण अंधार पडायच्या आत वर जाणे गरजेचे होते. दगडगोट्यांची वाट संपली होती आणि कारवीचे रान लागले होते. त्यात वाट चुकू नये म्हणून परत काही ट्रेकर मंडळींनी विशिष्ट प्रकारे दगड रचून त्यांचा दिशादर्शक बाण केला होता. 
                                                                       
दिशादर्शक बाण 

शेवटची चढाई 
                                                                                   


सह्याद्रीची सावली उन्हापासून सुटका 


घोडपाण्याची नाळ 















               
त्या मार्गाने आम्ही पटापट वर आलो. मामांनी पुन्हा कोयत्याने कारवीच्या रानातून वाट मोकळी केली. वरती पोहोचल्यावर आम्हाला खाली आंबोली गाव दिसत होते. ट्रेक पूर्ण झाल्यात जमा होता. अंधाराच्या आत नाळेतून वरती आल्यामुळे एक वेगळेच समधान होते सगळ्यांना. पण इतक्यात मामांना रानात काळवीटाची हालचाल दिसली त्यांनी आवाज करून त्याला पळवून लावले. उगाच त्याच्या वासावर असलेल्या वाघाचे आम्हाला दर्शन नको. बसंतीने सुद्धा भुंकून भुंकून त्याला पळवून लावले. पटापट डोंगर उतरून शेताच्या बांधावरून चालत चालत आम्ही खाली गावात पोहोचलो. शेतातली बिजलीची, झेंडूची फुले आसमंतात चालेल्या मावळतीच्या रंगाच्या उधळणीमध्ये आपले रंग मिसळत होती. बटाटा, कांद्याच्या शेतातून कडेकडेने आम्ही बबन मामांच्या घरी पोहोचलो. हातपाय तोंड धुवून ताजेतवाने झालो तर घरातल्या आज्जीने चहाचे आधण ठेवले होते. फक्कड चहा पिऊन सगळा  दिवसभराचा क्षीणवटा गेला. आज्जीने गव्हाच्या ओंब्या भाजल्या होत्या. आम्ही मागायच्या आधीच "अतिथी देवो भव"  म्हणत आज्जीनी  सुपलीतून मूठभर ओंब्या आम्हाला खायला दिल्या. 

बिजलीची फुले 
गव्हाच्या ओंब्या 
  


 
                                        

आज कासळे मामा आणि बसंती नसते तर आमचा ट्रेक एवढा अविस्मरणीय झाला नसता. कदाचित रस्ता शोधण्यात वेळ गेला असता आणि परत येई पर्यंत अंधार झाला असता. त्यात अजून त्यांच्या घरच्यांकडून आमचा झालेला पाहुणचार म्हणजे पर्वणीच होती. दिलीपने त्यांच्या बॅग मधले कलिंगड घरातील लहान मुलांना देऊन टाकले आणि ओझे हलके केले. कासळे मामांच्यासाठी आज्जीच्या हातात काही मानधन देऊन आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त केली. शहरातील मोठ्या नोकऱ्यांचे, शिक्षणाचे, पदाचे बेगडी मोठेपण आपण गर्वाने जपत असतो,  पण गावातल्या लोकांसारखी मनाची श्रीमंती आपल्याला लाभो हीच मनिषा मनी धरून आम्ही तिथून निरोप घेतला. 
ठरल्याप्रमाणे नारायणगाव ला मसाला दूध प्यायचा कार्यक्रम या वेळेस मात्र रद्द केला कारण जेवायची वेळ झाली होती. कळंबच्या पुढे मल्हार मध्ये जेवण केले आणि घरचा रास्ता धरला. राजगुरूनगर, चाकण कुठेच ट्रॅफिक लागले नाही त्यामुळे आज अगदी कपिलाषष्टीचा योग्य होता.  असे योग पुन्हा पुन्हा येवोत आणि असे ट्रेक पुन्हा पुन्हा होवोत हीच जगदीश्वरा चरणी प्रार्थना. 



                                                     

  -वैभव
  फक्त नावात