Thursday, December 3, 2020

गुलाबी चांदण्यात ....गुलाबी थंडी

 दिनांक: ३० नोव्हेंबर २०२०
 स्थळ   : Kate's पॉईंट, महाबळेश्वर 
 वेळ: लॉक डाऊन नंतरची रम्य संध्याकाळ 

       श्या !!! अवकाळी पावसानं सगळी थंडी पळवली. एरवी कडाक्याची थंडी, बोचरी थंडी अशी विशेषणं लेवून गरमागरम बातम्या पेपर मध्ये येतात. "उत्तर भारत मै ठंड कि वजह से इस साल का न्यूनतम तापमान दर्ज" किंवा "महाबळेश्वर मध्ये वेण्णा लेक येथील तापमान गोठणबिंदू च्या खाली" या विशेषणांमध्ये अजून एक असते ते  म्हणजे गुलाबी थंडी. 

          म्हणजे बोचरी थंडी उकललेल्या गालावरून, चिरा पडलेल्या, फाटलेल्या ओठांवरून दिसू शकते पण  खरंच थंडी गुलाबी दिसते का ? का उगाच प्रेमवीरांची Fantacy.  असं काही वेगळे रसायन निसर्गात असते का, की  उंच दऱ्या डोंगरावरून वारा वाहत यावा आणि  Phenolphtelin घातलेल्या चंचुपात्रात चटकन End पॉईंट यावा आणि सगळे वातावरण गुलाबी होईन जावे. 

         थंडी गुलाबी होती का काय ठाऊक नव्हे पण मी मात्र त्या वातावरणात स्वतःला विसरून गेलो. दिवसभर प्रतापगडावर हुंदडून पाय थकले होते पण, तरीसुद्धा सूर्यास्त पाहण्यासाठी आर्थर सेट पॉईंट गाठायची धावपळ चालू होती पण संधी हुकली. तोवर खूप उशीर झाला होता, रवीकिरणांचा पसारा अजून आसमंतात तसाच पडला होता. महाबळेश्वर च्या रस्त्यांवर आल्हाददायक थंडी जाणवत होती.    

थोडीशी निराशा झाली पण जाताजाता केट पॉईंट करून जायचे ठरले. अंधार पडायच्या आत जे दिसेल ते बघू . पोहोचलो तेंव्हा तिथल्या विक्रेत्यांनी सुद्धा त्यांची दुकाने आवरायला घेतली होती. काही थोडे पर्यटकांचे जत्थे फोटो काढण्यात गुंग होते. कड्यावरून खाली दरीत हत्तीच्या आकाराचा कडा डोकावतो आहे . एका बाजूला बलकवडी तर दुसऱ्या बाजूला कमळगडाला वळसा घालून आलेला धोम धरणाचा जलाशय...  जणू अजगरासारखा विळखा मारून बसलाय समोरच्या डोंगरांना आणि कोळेश्वर पठाराला. संध्याकाळचा आल्हाददायक गारवा, वाऱ्याच्या मंद झुळुका... त्या विस्तीर्ण जलाशयावर उठणारे अलगद तरंग जे एवढ्या उंचीवरून सुद्धा स्पष्ट दिसत होते. एक अनामिक शांतता, क्षणिक स्तब्धता आणि स्वल्पविराम  ... दिवसभर चालेल्या धावपळीला, आपापसातल्या गप्पांना,  फोटोग्राफीला आणि मनातल्या नानाविध विचारांना. मोबाइल ची बॅटरी पूर्णपणे खलास. यांत्रिक जगताशी आणि त्यामुळे आलेल्या गतीला आता पूर्णपणे पूर्णविराम. 

अजूनही पुरेसा अंधार पडला नव्हता पण रजनीच्या आगमनासाठी रजनीनाथाने (चंद्राने)  तयारी सुरु केली होती. पौर्णिमा असल्यामुळे काहीसे पुसट पण पूर्ण गोलाकार बिंब आकाशात स्वतःचा तोरा मिरवत होतेच. मोबाइल बंद, त्यामुळे डोळे सताड उघडे आणि तो नजारा डोळ्यात साठवून घेण्यासाठी चाललेली माझी धडपड. एव्हाना आम्ही ४-५ जण सोडलो तर तिथे आता कोणीच नव्हते विक्रत्यांचा गोंगाट नव्हता कि इतर पर्यटकांची वर्दळ नव्हती. आर्थर सेट च्या दऱ्या डोंगरा मधून सूर्यनारायणाला अलविदा करून दौडणारे पश्चिमेचे वारे च काय ती धावपळ करत होते. सोबत गुलाबी थंडी वाहत आणत होते. इतक्यात समोरच्या कमळगडाच्या पायथ्याशी अचानक लाल गुलाबी प्रकाश जाणवू लागला. एक वेळ वाटले वणवा लागला असावा पण थोडे निरखून पहिले तर पायथ्यासकट आजुबाजूचे धोम धरणाचे पाणीसुद्धा गुलाबी दिसू लागले. अरेच्या एरव्ही सुर्यास्ताच्या वेळी अशी रंगपंचमी मी कित्येकवेळा आसमंतात पहिली आहे पण हे काहीतरी अजबच होते. कमळगडावर अचानक कमळे फुलली का काय? आणि धोम जलाशय गुलाबी कशाने झाला. त्यावर उठणारे तरंग तो गुलाबी रंग चहुदिशेला पसरवीत होते. 


             आता मात्र पूर्ण अंधार झाला होता रातकिड्यांचा आवाज कित्येकपटीने वाढला होता. त्यांच्या संगीतात आगमन झाले होते त्या पौर्णिमेच्या गुलाबी चंद्राचे. त्या तेजपुंज गोळ्याने आम्हाला भुरळ घातली. जाताजाता बघू आणि निघू असे ठरवून आलो होतो पण आता मात्र त्या सौन्दर्यावरून नजर ढळेना. वेळेचा विसर पडला, मन एकाग्र झाले त्या गुलाबी चांदण्यात. त्या गुलाबी चांदण्याचा धबधबा वरून कोसळत होता आणि हळूहळू सर्व पाणी गुलाबी होत चालले होते. वरूनच त्या गुलाबी डोहात डुबकी मारायचा मोह होत होता. आजूबाजूच्या डोंगरात वसलेली गावे कृत्रिम दिवे लावून त्यांचे अस्थित्व दाखवत होती पण त्या चांदण्यात त्या दिव्यांना विचारतो कोण? 


     ते शीतल गुलाबी चांदणे कितीतरी वेळ आम्ही डोळ्यांनी पिऊन घेत होतो पण समाधान होत नव्हते.  नंतर तांबूस, पिवळसर आणि शेवटी लक्ख पांढराशुभ्र असे हळूहळू या रात्रीच्या राजाने त्याच्या सामर्थ्याचे  सगळे रंग आम्हाला दाखवले. रसिक प्रेक्षक बनून आम्ही त्या निसर्गाच्या  रंगमंचावर उधळलेले रंग अनुभवले.             


        गुलाबी चांदण्यात गुलाबी थंडी दिसली. होय दिसली !!!  थंडी कडाक्याची तशीच गुलाबी सुद्धा असते.  पटलंय मला कारण स्वतःच्या डोळ्यांनी पहिली

                                                                                                                         (फोटो सौजन्य : चेतन श्रीगोड) 


वैभव -

फक्त नावात 

     

                  


Tuesday, March 24, 2020

कात्रज ते रायगड

                                                                                                                         दिवस: महिला दिन २०२०
                                                                                                                         वेळ सकाळी ६: ३०
                                                                                                                         स्थळ: चोर दरवाजा, राजगड

ते : काय रे  कुठून आलात
आम्ही:  पुण्यातून , तुम्ही ?
ते : पुण्यातूनच, हडपसर
आम्ही: चालत ?
ते: नाही रे,  वेडा  आहेस का ?
आम्ही : हो आम्ही आलोय, कात्रज पासून

                खरंच, आम्ही हा वेडेपणा केलाय. आज आमचाच आमच्यावर विश्वास बसत नाहीये. कात्रज पासून सुरु केलेली गडकोटांची वारी सिंहगड, राजगड, तोरणा , लिंगाणाच्या बाजूने सिंगापूर नाळेतून शेवटी दापोली गावात विसावली. सकाळी उठून रायगडाचे  दर्शन घेताच  ४ दिवस केलेल्या पायपीटीचा आम्हाला क्षणार्धात विसर पडला.

               या वर्षी पावसाळा लांबला तशीच थंडीही. उन्हाळा जाणवत नाही तो पर्यंत मोठे मोठे ट्रेक्स करून घ्यायचे हाच या वर्षीचा संकल्प होता. गेल्यावर्षी याच सुमारास सिंहगड ते विंझर, राजगड ते तोरणा असे ट्रेक केले होते तेंव्हा पासून सिंहगड-राजगड- तोरणा (SRT) चा ट्रेक करायचा मानस होता. आणि या वर्षी मुहूर्त निघाला विशाल आणि SG ट्रेकर्स ने कात्रज पासून रायगड पर्यंत मोहीम आखली. होळीची जोडून सुट्टी आली होती त्यामुळे ४ दिवस कामाला बुट्टी आणि फक्त डोंगर दऱ्यात मनसोक्त भटकंती, पाने, फुले, पक्षी निसर्गाशी गप्पाटप्पा आणि इतिहास-भुगोलाची उजळणी. अडचण एकच होती ती म्हणजे ४ दिवसांचा ट्रेक म्हणजे पाठीवर तितक्या दिवसांच्या शिध्याचे ओझे आले. पण अशी संधी तरी पुन्हा कधी येणार होती.



                     शुक्रवार चे ऑफिस मधले सोपस्कार लवकर आटपून घरी आलो. ४ दिवसाचा ट्रेक पण अजून सॅक भरली नव्हती पटापट हाताला लागेल ते कोंबले  आणि कात्रज चौकात पोहोचलो. विशाल आणि मंडळी अजून स्वारगेट वरून निघायचे होते. मी, केळकर सर, मारुती, सिद्धांत  आणि हर्षल  एकमेकांची तोंडओळख करून घेत होतो तेवढ्यात बस आली. पाच दहा मिनिटांत आम्ही कात्रज जुन्या घाटाच्या बोगद्यापाशी पोहोचलो. अजून एक ग्रुप पण उतरला. आमच्या कडच्या अजस्त्र सॅक आणि एकूणच जय्यद तयारी पाहून ते गोंधळले. कात्रज ते सिंहगड रात्रीच्या ट्रेक साठी एव्हढे सामान ? जेव्हा बॅग्स पाठीवर चढवल्या आणि हाश्याहुश्य करत आम्ही वाघजाई मंदिरापाशी आलो तेंव्हा मात्र आम्ही गोंधळलो कि आपण तर रायगड पर्यंत जायचे म्हणतोय. इथेच श्वास फुलतोय, अजून सुरुवात पण नाही केली. वाघजाई देवीला नमस्कार करून पुढच्या प्रवासासाठी लागणारी शक्ती मागितली. विशाल ने संपूर्ण ट्रेक ची थोडक्यात रूपरेषा सांगितली. पुढील चार दिवस जसे मौज मस्तीचे तसेच कडक शिस्तीचे आणि सहयोगाचे होते.  ठरलेले अंतर ठरल्याप्रमाणे नाही कापले गेले तर बॅकअप प्लॅन काय असेल, काय अडचणी येऊ शकतात या वर सविस्तर चर्चा करून आम्ही श्रीगणेशा केला.  घाटाच्या सुरुवातीला इतिहासाची साक्ष देणाऱ्या एका बुरूजाचे अवशेष अजूनही वाघजाई मंदिरासमोरच्या उंबराच्या झाडाच्या फांद्यामध्ये शिल्लक आहेत ते विशाल ने दाखवले. इतक्यावेळा K२S ट्रेक केला होता पण इकडे कधी लक्ष गेले नव्हते.

 "एखाद्याला कात्रज चा घाट दाखवणे " या वाक् प्रचारा  मागच्या इतिहासाची उजळणी करत आम्ही पहिली टेकडी चढलो. पेपर लिहायला सुरुवात तर केली होती पण पुढचं सगळे अवघड वाटत होते. तसे वेळेचे बंधन नव्हते ४ दिवस होते, पण डाळ, तांदूळ, तेल कांदे बटाटे आणि  इतर सामान पाठीवर वागवणे हा फार मोठा प्रश्न होता. हिमालयीन ट्रेक चा दांडगा अनुभव असलेले केळकर सर, सह्याद्रीमधले ४०० च्या वर किल्ले फिरलेले भाडळे काका असे जाणकार बरोबर होतेच त्यामुळे लगेच नापास व्हायचे कारण नव्हते. थांबत थांबत गप्पा टप्पा करत आम्ही पहिला टप्पा पार केला.  पहिल्या २ उंच टेकड्या संपल्या कि मग अगदी MCQ चा पेपर होता. मळलेली वाट आणि थोडेफार चढउतार. सातारच्या अविनाश ची मात्र कुरकुर सुरु झाली होती (K2S ला नेहमी कोणीतरी असतेच असे )   त्याला मात्र ह्या चढउतारांचा वीट आला. शेवटचे ४ डोंगर आम्ही एकमेकांची खेचत, चेष्टा मस्करी करत कसेतरी करून पाठीवरच्या ओझ्याकडे दुर्लक्ष करत कापून काढले. वाटेत भेटणारे लोक आमच्या मोहिमेबद्दल ऐकून आश्चर्य व्यक्त करत होते. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे आम्हाला चेव येत होता. शेवटी सकाळी तांबडं फुटायच्या आधी आम्ही डांबरी रस्त्याला लागलो आता मात्र तिथून वर चालणे अवघड होते कारण रात्रभर केलेल्या पायपिटीमुळे कंटाळा आला होता. सिंहगडावर नाश्त्याची सोय ज्यांच्याकडे केली होती त्यांची गाडी आली आणि आम्ही सगळे वडाप सारखे गाडीत घुसलो.
         
               सकाळी सूर्योदयाला, पुणे दरवाजात पोहोचलो शनिवार उजाडला होता पण नेहमीची गर्दी गडावर नव्हती. धुक्याची चादर उसवण्याचा  सूर्यकिरणे व्यर्थ प्रयत्न करत होती. पक्ष्यांचा चिवचिवाट रात्रीला अलविदा करत होता आणि आमचे स्वागत करत होता. वातावरणातला आल्हाददायक गारवा मनाला सुखावत होता. नाश्त्याच्या ठिकाणी चटई पाहताच आम्ही लोटांगण घातले. पण इतक्यात इंजिन बंद केले तर पुन्हा गाडी सुरु होताना त्रास देईल म्हणून विशाल ने सगळ्यांचा स्ट्रेचिंग चा व्यायाम सक्तीने करून घेतला. रात्रभर ओझे वागवून अवघडून घेलेली पाठ, खांदे मोकळे झाले पायाला आलेले गोळे गायब झाले आणि आम्ही ताजेतवाने झालो. पिठलं भाकरी, वांग्याची भाजी खरडा चटणी या सगळ्यावर  यथेच्छ ताव मारला आणि मग एक अर्धा तास डुलकी काढली.  रोहित ची स्लीपिंग बॅग बघूनच आमच्या छातीत धडकी भरत होती. बाजारबुणजे आणि इतर लावाजम्यामुळे मराठ्यांचे पानिपत झाले होते तसेच कुठल्यातरी गडावर हि स्लीपिंग बॅग आमचं पानिपत करेल हि भीती वाटत होती म्हणून नाश्त्याच्या ठिकाणीच तिला सोडून आम्ही पुढे जायचे ठरवले. जास्त वेळ ना घालवता  तानाजी मालुसुरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून सह्याद्रीची प्रार्थना सामूहिकपणे म्हणालो आणि देवटाक्याकडे गेलो. Hydration Bladder, पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.

















 कल्याण दरवाजातून खाली उतरलो . १० वाजून गेले होते सकाळचा    प्रहर संपला होता . गडाची मागची बाजू , मावळ्यांनी चढलेला कडा पाहत पाहत पुढच्या मार्गाला लागलो. पाबे घाटाची डोंगर रांग स्पष्ट दिसत होती. सूर्य हळूहळू प्रखर होऊ लागला होता. सिंहगड ते विंझर हा ट्रेक मी गेल्यावर्षी रात्री केला होता अंधारात हे अंतर खूप वाटले नव्हते. पण आता मात्र उन्हाचे  चटके बसू लागले होते. एकच समाधान होते ते पुढचा थांबा नजरेच्या टप्प्यात होता. संपूर्ण रस्त्यात कुठेच झाडी नव्हती. दुतर्फा वाढलेली आणि वाळलेली कारवी आणि गोलाकार वाढलेले एखादे निवडुंगाचे झुडूप. शुष्क वाटणारे निवडुंगाचे झाड आम्हाला कधी सावली देईल याची कधी कल्पनाही  केली नव्हती. अवजड बॅग्स आणि गरम झालेले पाय आता काही पुढे जाऊ देत नव्हते.  गोगलगायीच्या गतीने आम्ही हळूहळू सरपटत होतो. वाऱ्याची झुळूक  तर सोडाच पण अग्निबाणांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते. सकाळी असलेले ढगाळ हवामान  इतकं  तीव्र  होईल असं  वाटलं  नव्हतं.  मला तर  मागच्या वर्षी 'राजगड ते तोरणा' ट्रेक ला माझे झालेले हाल आठवले आणि मी गलितगात्र झालो. शेवटचा डोंगर काही केल्या पायाखाली येईना.  तिथून आम्हाला खाली विंझर गावात उतरायचे होते. मागच्यावेळी अंधारात थोडी गडबड झाली होती आणि आता लख्ख प्रकाशात सुद्धा आम्हाला डोळ्यापुढे अंधाऱ्या येत होत्या. चालणे जिकिरीचे होत होते. हेच आव्हान असते सह्याद्री मध्ये. उगाच नाही महाराजांनंतर हि स्वराज्य झुंजवत ठेवले गेले ते या सह्याद्रीमुळे.

  मी आणि हर्षल मागे राहिले होतो आमच्या पुढे नजरेच्या टप्प्यात केवळ केळकर सर. हा हा म्हणता विशाल प्रथमेश आणि अविनाश विंझर चा डोंगर उतरून बरेच खाली गेले होते.  हर्षल च्या बुटाचा सोल सपाट झाल्यामुळे उतरताना घसरगुंडी होत होती. रोहित,भाडळे काका आणि एक ग्रुप आधीच खाली गावात पोहोचून एका रिकाम्या शेतात झाडाखाली वामकुक्षी घेत होता. रात्रभर चालल्यामुळे झोप झालेलीच नव्हती सकाळचा नाश्ता कधीच जिरला होता. भूक लागली होती पण गावात पोहोचेपर्यंत काही इलाज नव्हता. हळूहळू सगळे जण आपापल्या गतीने खाली गावात आले. झाडाखाली क्षणभर विसावले. गावातल्या एका आजोबानी विहीर दाखवली. बादली दिली, आणि मग काय ? उन्हामुळे अंगाची लाहीलाही झालेल्या आम्हाला मनसोक्त हातपाय तोंड धुवून ताजेतवाने होता आले. उन्हामुळे ओंकार आणि बऱ्याच जणांच्या पायाला फोड आले होते.  गार पाणी पायावर पडता स्वर्गसुख अनुभवता आले.  विशाल आणि काही लोक पुढे नसरापूर-तोरणा हमरस्त्या पर्यंत गेले आणि पुढील डांबरी रस्त्यावरून गुंजवणे गावात जाण्यासाठी वाहनाची सोय करून आले. तो पर्यंत आम्ही हळूहळू गावात पोहोचलो होतो. गावात काटेसावरच्या लालबुन्द फुलांचा सडा पडला होता. वटवट्या, बुलबुल, तांबट पक्षी, भुंगे त्यावर डोलत  होते. पाण्यात भिजून ताजेतवाने झालो होतो.  त्यामुळे दुपारच्या रखरखत्या उन्हात सुद्धा निसर्गाकडे आमचे लक्ष गेले आणि यावेळेस त्याने आम्हाला नाराज केले नाही.

                    एका टेम्पोत बसून आम्ही चिरमोडी गावातून नदीवरून साखर गावामार्गे गुंजवणे गाव गाठले. चालत हे अंतर ५ किमी होते पण टेम्पोने अंदाजे १०-१२ किमी झाले असेल. आता मात्र आम्ही सगळे थकून सुकलो होतो. गावात पोहोचताच बटाटयाची भाजी, वांग्याची भाजी तांदळाची भाकरी असे पोटभर जेवण केले.  कोणाच्याही अंगात आता पुढे चालायची ताकद नव्हती पण प्लॅन नुसार आमचा रात्रीचा मुक्काम राजगडावर होता. पण अपुरी झोप त्यात उन्हातून झालेली तंगडतोड यामुळे आम्हाला पुन्हा एकदा नव्याने पुढच्या ट्रेक चा आराखडा तयार करावा लागणार होता.  गावातल्या मंदिरासमोर काही कार्यक्रमानिमित्त मंडप घातला होता. आम्ही मात्र आमचा संसार मंदिरात मांडला आणि  २ तास आराम करायचा ठरवले. वाजले होते संध्याकाळचे ५: ३०-६:००. रोहित, अविनाश, हर्षल आणि केळकर सर यांनी सपशेल शरणागती पत्करली होती.  आम्ही त्यांना राजगड तोरणा न करता भट्टी गावातून  आम्हाला जॉईन करावे आणि ट्रेक पूर्ण करावा असा पर्याय सुचवला पण रात्रीची एक नीट झोप झाल्याशिवाय कोणीच स्वतःच्या शरीराची खात्री देऊ शकत नव्हता. सरते शेवटी आम्ही सगळ्यांनीच गुंजवणे गावच्या देवळात झोपायचा निर्णय घेतला. पण ओंकार स्टीफन आणि भाडळे काका या कट्टर मावळ्यांनी रात्रीच गडावर जायचा दृढनिश्चय केला हे बळ त्यांना कुठल्या दैवी शक्तीने दिले; ते त्यांनाच माहिती आणि त्या शक्तीला. आम्ही मात्र बोलू लागलेल्या आमच्या हाडांचे आणि फुगलेल्या स्नायूंचे ऐकणे पसंत केले.  भाडळे काका तर रात्री मुंबई वरून येणाऱ्या एका ग्रुप बरोबर राजगड करून तोरण्यालाही जायला तयार झाले होते. ४९ वर्षाच्या या तरण्या मावळ्यापुढे आम्हाला आमची लाज वाटू लागली आणि आम्ही अंथरुणात आमचे तोंड लपवले. थोड्यावेळाने मी, मारुती, प्रथमेश, विशाल उठलो स्वयंपाकाची तयारी केली. सरपण गोळा झाले पण बॅगा उघडल्यावर लक्षात आले कि चमचे सूरी उलथणे आणि सगळी अवजारे ओंकारच्या बॅगमधून गडावर पोहोचली. मग गावातून उधार डाव आणि सूरी आणली.  चूल पेटली, भात  शिजू लागला. आणि तिकडे देवळात घोरण्याची स्पर्धा सुरु झाली.  ज्यांच्या अंगात उठून जेवायची शक्ती होती ते उठले आणि जेवले. आमच्या पाठीवरचे ओझे हलकं झाल्याच्या समाधानानेच आमचे पोट भरले होते.  हातपम्पा जवळ असलेल्या कुत्र्याची आमच्यावर करडी कठोर नजर होती.  त्यामुळे गावातील शांतता आणि गडाचे पावित्र्य राखून आम्ही स्वयंपाकासाठी केलेला कचरा आवरुन  त्याची विल्हेवाट लावली आणि घोरण्याच्या स्पर्धेत wildcard एन्ट्री घेतली.

           सकाळी उशीर करून चालणार नव्हते त्यामुळे ५ वाजताचा गजर व्हायच्या आधीच विशालने सगळ्यांना जागे केले. पुन्हा एकदा अविनाश, रोहित, हर्षल आणि केळकर सरांचे मतपरिवर्तन करायचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी घरी जायचा निर्णय घेतला. शेवटी ज्याला त्याला त्याच्या शरीराच्या तारा किती छेडायच्या याचा अंदाज असतो. उगाच वाद्य लावल्यासारखे ट्रेकर्सचा वाद्यवृंद आपण भरवू शकत नाही आणि भरवू हि नये. आमची सगळी टीम शेवटपर्यंत नसणार याचे वाईट वाटले पण जेवढे लोक येणार नव्हते त्यांचा त्या हिशोबाने बराचसा शिधा पाठीवरून खाली उतरला आणि जरा हायसे वाटले. पण तरीही अजून पुढचे २ दिवस होते आणि अंतर बरेच होते. पहाटेच्या अंधारात आम्ही परेड सुरु केली. सकाळचा म्हणावा तसा गारवा नव्हता पण सोबतीला अजूनहि अवकाशात  चंद्र होता हेच काय ते मानसिक समाधान. हळूहळू आमचा वेग वाढू लागला, बऱ्यापैकी गड चढून वर गेलो. सूर्योदय आणि सुवेळा माची नेहमीच छायाचित्रकाराला मोहिनी घालते. सिद्धांत ने शेवटी इतक्यावेळ गळ्यात वागवलेला DSLR कॅमेरा बाहेर काढला. पूर्वेकडील रंगांची उधळण धुळवड आणि रंगपंचमीची चाहूल देत होती. सुर्यांश, प्रथमेश, विशाल ह्यांना फोटो काढायचा मोह आवरला नाही. पण माझ्या मनात मात्र मागच्या वर्षीच्या राजगड-तोरणा ट्रेकची भीती मनात बसली होती त्यामुळे मी उन्हाच्या आधी चोरदरवाजा गाठणे उचित समजले. मी एकटाच पुढे निघून गेलो आता माझ्या बॅग मध्ये अवजड असा रवा होता फक्त. एकदा का त्याचा शिरा किंवा उपीट करून पोटात गेले कि माझी बॅग बरीचशी हलकी होणार होती. जाताना काही ट्रेकर्स गडावरून खाली येताना मला भेटले.  माझ्या सॅक चा पसारा बघून ते चौकशी करत होते. एक जण बारीक आवाजात किशोर ची गाणी लावून चढत होते. मला तर क्षणभर मी जितेंद्र असल्याचा फील आला "मुसाफिर हू यारो ना घर है ना ठिकाना मुझे चालते जाना है " २ दिवसांच्या पायपिटीमुळे सगळ्या जगाचा विसर पडला होता. तारीख, वार, ऑफिस, घर काहीच आठवत नव्हते. फक्त एकच लक्ष्य होते ते म्हणजे उन्हाच्या आधी पद्मावती माची गाठायची. मजल दरमजल करत चोरदरवाज्यापाशी आलो तर वरून एक माणूस सहकुटुंब खाली उतरत होता. त्याच्या कुटुंबातील महिलांना पाहून मला महिलादिनाची आठवण झाली. त्यांच्यातील पाच वर्षाच्या छोट्या ताईला मी शुभेच्छा दिल्या आणि तिच्या बाबा ना माझ्या पाठीवरचे ओझे बघून दया आली आणि त्यांनी मला वाट मोकळी करून दिली. इतक्यात सुर्यांश पण वर आला होता. चोरदरवाजात एकमेकांचे फोटो घेऊन आम्ही दोघे वर आलो. लगेच मारुती पण वर आला. भाडळे काका आणि कंपनी आमची वाट बघत होते. बिचाऱ्यांना कडकडून भूक लागली होती. विशाल आणि प्रथमेश वर येताच आम्ही लगेच गडावरच्या मावशींची चूल ताब्यात घेतली आणि मॅगी आणि सूप बनवायला घेतले. मधल्यावेळात पद्मावती देवीचे दर्शन घेतले. जेष्ठ इतिहासकार अप्पा परब यांनी लिहिलेली पद्मावती देवीची आरती वाचली. मनसोक्त फोटो काढले, हातपाय ताणून सरळ केले. आज सर्वांची झोप पूर्ण झाल्यामुळे आज कालची गत येणार नाही, असा सगळ्यांच्यात आत्मविश्वास दिसत होता. पटापट पेटपूजा करून महिलादिनी पद्मावती देवीला वंदन करून आम्ही संजीवनी माचीकडे निघालो. आधीच आमची टीम ४ ने कमी झाली होती त्यामुळे इथून पुढे अंतर कापण्याबरोबरच बरोबरची माणसे जपणे हि जबाबदारी आम्हा सर्वांवर येऊन पडली होती.  कारण कोणाला क्रॅम्प्स  येत होते तर कोणाच्या पायाला फोड आले होते. विशाल मात्र प्रत्येकाची काळजी तळ हातावरच्या फोडासारखी घेत होता. त्याच्या  पोतडीमधून त्याने गुलकंदाची बरणी काढली. तो गुलकंद खाल्य्यावर पायातून निघणाऱ्या गरम ज्वाळा काहीअंशी शमल्या पोटातील दाह कमी झाला आणि आम्ही मोहिमेतील पुढच्या आव्हानासाठी सज्ज झालो. संजीवनीच्या वाटेवर बालेकिल्ल्ल्याच्या मागील बाजूस लागलेली मधमाशांची पोळी शांतपणे न्ह्याहाळात आम्ही पुढे सरकलो. विशालने आजूबाजूच्या परिसराची, जलाशयाची,  तिथून दिसणाऱ्या इतर किल्लांची, भुतोंडे खिंड आणि भुतोंडे गावातील येसाजी कंकांच्या वाड्याची  माहिती दिली. अशाप्रकारे पोटात आणि मग ज्ञानात भर पडल्यावर आम्ही पोहोचलो आमच्या सगळ्यांच्या आवडीच्या ठिकाणी. ते म्हणजे संजीवनी माची.  सळसळणाऱ्या नागिणीसारखी दिसणारी संजीवनी माची म्हणजे संजीवनीचा स्रोत. तिची रचना, बुरुज, भक्कमपणा, स्थापत्यामधील बारकावे सगळंच अगदी अद्भुत. निसर्गाच्या सौदर्यात भर घालताना त्याला मानवी गालबोट न लागू देता निसर्गदेवतेला प्रसन्न करून घ्यायची कला शिवाजी महाराजांनाच जमो जाणे. सांप्रतकालीन कोणा  येऱ्या गबाळ्याचे ते  कामाचं नव्हे. तिथे फोटो काढण्यात आम्ही गुंग होऊन गेलो. बराच वेळ घालवल्यानंतर पुढील प्रवासासाठी लागणारी संजीवनी घेऊन आम्ही व्याघ्र दरवाजातून उतरते झालो. सूर्य माथ्यावर आला होता पण दरवाजातून येणाऱ्या वाऱ्याच्या लहरींनी आम्हाला मोहिनी घातली आणि आम्ही त्या शांततेत वाऱ्याचा आस्वाद घेत काही क्षण तेथेच रेंगाळलो. मागे वळून वळून वेगवेगळ्या अँगल ने संजीवनीचे काळेकभिन्न पाषाण पाहताना अप्रूप वाटत होते.

                     संजीवनीचं विलोभनीय रूप आणि मुरुंबदेवाच्या डोंगराचा घेर बघत बघत आम्ही पुढे सरकलो. सुरुवातीला बऱ्यापैकी झाडी होती त्यामुळे एवढा त्रास जाणवला नाही. आज झोप पूर्ण झाल्यामुळे थकवा वगैरे काहीच त्रास नव्हता पण ओंकार च्या पायाचे फोड आग ओकत होते  आणि आता फुटण्याच्या मार्गावर होते. पुढे गेल्यावर मोठे जंगल आहे त्या झाडीत मोठा ब्रेक घेऊ असे सांगून आम्ही त्या  बिचाऱ्याला ३ टेकड्या चालवल्या. त्याला त्रास द्यायचा हेतू नव्हता पण दुपारच्या उन्हाच्या आधी जास्तीत जास्त अंतर कापायचे  होते. भुतोंडे खिंडीच्या आधी जंगलात एके ठिकाणी काही शेंदूर फासलेले दगड आणि  देवदेवस्ती होती, तिथल्या गर्द झाडीत शेवटी आम्ही एकमताने थांबायचा निर्णय घेतला. बुटांमध्ये गुदमरलेल्या पायांना थोडी मोकळीक दिली. ब्लू मॉर्मन फुलपाखरं उडताना पहिली. DSLR कॅमेरा वागवून मेटाकुटीला आलेल्या सिद्धांत ने शवासन केले. त्याची ब्रह्मानंदी टाळी वाजायच्या आत पुढचे प्लॅनिंग झाले आणि गावात ज्या घरात आम्ही स्वयंपाक करणार होतो ते रद्द करून आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला कारण फारशी भूक कोणाला लागली नव्हती. वाटेत महादू कचरे यांच्या घराचा पत्ता लिहिलेला मिळाला. क्षणभर मिळालेल्या विश्रांतीमुळे पुन्हा चालायला वेग आला. राजगड ते तोरणा या ट्रेकच्या बरोबर मध्यावर असलेल्या महादू कचरे यांच्या घरी आम्ही पोहोचलो थंडगार पाण्याने भरलेल्या  कळशीने त्यांनी आमचे स्वागत केले. ४ महिन्याचे वासरू अंगणात बांधले होते त्याला त्यांनी आत नेऊन गोठ्यात बांधले आणि ताडपत्री अंथरून आमची बैठक तयार केली. आमच्या विनवणी वरून त्यांनी आम्हाला चूल पेटवून दिली आणि आमचा स्वयंपाक होई पर्यंत ताक आणि लिंबू सरबताचे राऊंड झाले. एवढ्यात गुरे सोडायला गेलेल्या कचरे मावशी आल्या.  त्यांना पाहून त्यांच्या बंड्या नामक कुत्र्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाजारातून आई घरी आल्यावर माझ्यासाठी काय आणले ? ते पाहण्यासाठी लहानग्यांनी आईच्या इर्दगिर्द उड्या  माराव्या तश्या त्याने उड्या मारल्या. त्याच्या बाललीला पाहण्यात आमचा वेळ कसा गेला ते कळेलच नाही. भात शिजेपर्यंत सिद्धांतने  सगळ्यांसाठी फोटोग्राफीचा  क्रॅश कोर्स घेतला. कोंबडीच्या पिल्लांच्या चिवचिवाटात साग्रसंगीत जेवण झाले, थोडीशी झोप झाली. जाताना कचरे काकांनी अभिप्राय लिहिण्यासाठी वही दिली. आत्तापर्यंत येऊन गेलेल्या सर्व ट्रेकर्स मंडळींनी त्या दाम्पत्यानं दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि प्रेमासाठी मनापासून अभिप्राय नोंदवला होता.  डोंगरदऱ्यात ते करत असलेल्या सेवाकार्याबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या.  आम्ही सुद्धा आमच्या परीने वहीत अभिप्राय नोंदवला आणि त्यांचा निरोप घेतला. एवढी पशुसंपत्ती असून सुद्धा त्यांच्या राहणीमानतले साधेपण आणि त्यांनी केलेला आमचा पाहुणचार हा या ट्रेकमधला एक अविस्मरणीय अनुभव होता. शहरातील बेगडी प्रतिष्ठा आणि संपत्ती काहीच कामाची नाही याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.

         
त्यांची रजा घेईपर्यंत सूर्य माथ्यावरून जरा पश्चिमेकडे सरकला होता आणि त्यामुळे थोडे  काम  सोपे झाले होते पण म्हणावा तसा वेग नव्हता कारण इथून पुढच्या टेकड्यांवर झाडाझुडुपांचे नामोनिशाण नव्हते त्या बोडक्या डोंगरांवरून चालताना कंटाळा येत होता.  पोटात भर गेल्याने डोळ्यावर वेगळीच धुंदी होती. काही लोक आम्हाला तोरण्यावरून येताना दिसले. आमच्या मोहिमेची त्यांना आधीच खबर लागली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छा आणि टप्प्यात आलेली बुधला माची पाहून आम्हाला स्फुरण चढले. शेवटच्या रॉकपॅच आणि शिडी आधी थोडी विश्रांती घेतली आणि मग सगळ्यांनी एकादमात बुधला माची सर केली. अशारीतीने दुसरा मोठा टप्पा आम्ही पूर्ण केला होता. अभिमानाने उर भरून आला होता कारण याच ट्रेक ने मागच्या वर्षी मला रडवले होते. समोर दिसणाऱ्या राजगडासमोर ऐटीत पोझेस  देऊन फोटो काढण्यात आमचा वेळ कसा गेला ते कळले नाही. पण भाडळे काकांचे हातातल्या काट्यांवर लक्ष होते त्यांनी वेळीच विशाल ला घाई करायची सूचना दिली. कारण अंधारात गड उतरणे जिकिरीचं होणार होतं.




                  चिणला बुरुजाच्या बाजूने आम्ही वाळंजाई दरवाजाच्या घसरड्या वाटेने जाऊ लागलो. कात्रज ते तोरणा हा मुख्य टप्पा पूर्ण झाल्यामुळे एकप्रकारचे समाधान आमच्या चेहऱ्यावर दिसत होते. मावळतीचे सौम्य ऊन त्याला  अजून झळाळी देत होते. एवढी धावपळ करूनही आम्ही ताजेतवाने होतो आणि आसमंतातील आदित्याला मात्र विश्रांती साठी रजा घ्यायची होती. त्याने दिवसभर घातलेला रंगांचा पसारा त्याने आता आवरायला घेतला होता. घाईगडबडीने केलेल्या कोंबाकोंबीमुळे ढगांमध्ये रंगाच्या विविध छटा उमटू लागल्या होत्या. गुंजावणीच्या जलाशयावर पडणारा प्रकाश  त्या संपूर्ण परिसराचे सौंदर्य खुलवत होता. ह्या रमणीय दृश्यात फारकाळ न रमता आणि चालता चालता त्याचा आस्वाद घेत आम्ही वाळंजाई दरवाजापाशी पोहोचलो. देवीला दुरूनच नमस्कार करून आम्ही घसरड्या वाटेने बाजूच्या कारवी ला पकडून अलगद पावले टाकत उतरायला सुरुवात केली. थोड्यावेळ हि कसरत करून झाल्यावर सर्वांच्या लक्षात आले कि खाली मातीत बसून घसरगुंडी करण्याशिवाय पर्याय नाही. हिमालयात बर्फात घसरगुंडी केली होती मग आमच्या सह्याद्रीत का बरे नाही करणार? माती  धूळ खडे सगळे विसरून आम्ही घसरत खाली आलो. पाठीवरच्या ओझ्या बरोबरच वाढत्या वयाबरोबर आलेल्या बंधनांना, जबाबदाऱ्यांना एक क्षण विसरून पुन्हा लहान होता आले, बालपण जगता आले.

                 
              विजेरीच्या प्रकाशात खाली उतरल्यावर भट्टी गावात पोहोचलो. २०-२५ घरांचे छोटेसे टुमदार गाव. पुण्यामुंबईतील सर्व चाकरमानी शिमग्याच्या निमित्ताने गावी परतले होते. भट्टी गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेच्या आवारात मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक वीरगळ दिसली आणि गावाला लाभलेल्या ऐतिहासिक वारसाची कल्पना आली. आवारात पांडवकाळी जुने राममंदिर होते. गावातल्या लोकांनी त्याचा जीर्णोद्धार करून अगदी नवेकोरे वाटावे असे मंदिर  होळीच्या सणासाठी सज्ज करून ठेवले होते आमचा रात्रीचा मुक्काम त्याच मंदिरात होता. पंखा, खिडक्या, सतरंज्या आणि महत्वाचे म्हणजे फोन चार्ज करायला मुबलक पॉईंट्स !! अहाहा अजून काय पाहिजे एका ट्रेकर ला. अगदी पंचतारांकित सोय झाली होती. तेवढ्यात गावातली जेष्ठ मंडळी आमची विचारपूस करायला आली. त्यांनी आम्हाला शाळेच्या आवारातील पाण्याची, स्वछतागृहांची जागा दाखवून दिली. मंदिरातील उत्सवादरम्यान प्रसादाच्या स्वयंपाकासाठी असलेलं स्वयंपाकघर आम्हाला खुले करून दिले. एवढेच नव्हे तर सरपण आणि शिजवण्यासाठी भांडी सुद्धा आणून दिली. गावातील प्रत्येक जण येताजाता आमची चौकशी करत होता. आमच्या दिमतीला काही कमी पडणार नाही ना याची आवर्जून काळजी घेत होता. आता मात्र आम्हाला सेलिब्रिटी असल्यासारखे वाटू लागले होते. आम्ही पटापट नळावर जाऊन आंघोळी आटोपल्या आणि अंग मोकळे करून घेतले. भात खाऊन कंटाळा आला होता पण कधी सोयाबीन कधी बटाटे तर कधी वेगवेगळे मसाले घालून  आम्ही खाद्यसंस्कृतीत नवनवीन शोध लावून तिला समृद्ध करत होतो. गावातील एका शाळकरी मुलाने झोपेपर्यंत आम्हाला सर्वतोपरी मदत केली. ज्या रामाने १४ वर्ष वनवास भोगला त्याच्या मंदिरात आम्ही मात्र पंचतारांकित सुविधांचा आस्वाद घेत, पायांना तेल चोळत शेवटी निद्राशय्येवर देह टेकवला.

भट्टी , पंचतारांकित राममंदिर 
 सकाळी पोपटांच्या आवाजाने, पक्ष्यांच्या किलबिलाटाने आम्ही जागे झालो. पटापट बॅगा भरून थोडे स्ट्रेचिंग करून मंदिराबाहेर आलो. विशालने रात्रीच्या भातावर पुन्हा एकदा शेवटचा आडवा हात मारला आणि सतरंज्या झटकून जमिनीवरून झाडू मारला. आता ओझे बरचसे हलके झाले होते पण माझ्या सॅक मधला रव्याचा पुडा फुगला होता. काही केल्या त्याचा चुलीवर चढायचा मुहूर्त लागेना. पण एवढी आव्हान यशस्वी रित्या पेलल्यामुळे ते ओझे आता किरकोळ वाटत होते. पुन्हा सॅक पाठीवर चढवून गावातल्या लोकांकडून गेळगाणी गावाचा रस्ता माहिती करून घेऊन आम्ही निघालो.  वाटेत सुकलेल्या ओढ्यात पांढरी जांभळी फुले पाहायला मिळाली.  अशी फुले या पूर्वी सह्याद्रीत कधीच  पाहायला मिळाली नव्हती. सुरुवातीलाच थोडा रस्ता भरकटलो पण पुन्हा मूळ मार्गावर लागलो जाता जाता काळकाई देवीला नमस्कार करून JCB ने तयार केलेल्या कच्या रस्त्याला लागलो. रस्त्यात एक फार्महाऊस लागले.  समोरच्या जलाशयाचा नजारा आणि त्या बंगल्याचा एकंदरीत थाट बघून आमचे डोळे दिपून गेले. विशाल ची बॅग काही केल्या हलकी होत नव्हती त्यातल्या सामानापेक्षा तो आमच्या सगळ्यांची काळजीच जास्त वाहत होता. त्याला आणि प्रथमेश ला आम्ही हवा तितका वेळ विश्रांती करू दिली. बाकी पुढे गेळगाणी गावात पोहोचून भाडळे काका, स्टीफन आणि भरभर चालणाऱ्या लोकांनी मोबाइलवरती गाणी लावून रोजच्या पळापळीमध्ये थोडे मनोरंजन करायचा प्रयत्न केला. होळीच्या दिवशी गावात हि कुठली शहरी सोंगे आली ? असा प्रश्न गावातल्या लोकांना पडला. गावातल्या विहिरीवर रहाटाने पाणी काढण्याचा मोह मला आणि प्रथमेशला आवरला नाही त्यांच्या हंड्यांच्या रांगेत आम्ही आमच्या बाटल्या घुसवल्या पण आम्ही मोहरीला चाललो आहोत हे सांगितल्यावर विहिरीवरच्या आज्जीनी काही आक्षेप घेतला नाही; कारण आम्ही सणाला त्यांच्या माहेरी म्हणजे मोहरीला चाललो होतो.  कदाचित आम्ही त्यांना त्यांच्या माहेरची माणसं वाटलो असू. संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपून घेतलेल्या आजींना शेळ्या सोडायला जायची घाई होती पण माहेरचं नाव निघताच त्या पण क्षणभर आमच्याबरोबर थांबल्या.

                 गावात होळीची धुमधाम होती आणि त्या गर्दीतून आमची पळापळ चालू होती. एवढ्यात पुण्यात SP कॉलेज ला शिकणारा गावातला रमेश आम्हाला भेटला.  होळीसाठी त्याच्या गावी हार्पूड ला चालला होता. मार्च मधल्या रणरणत्या उन्हात पायात कोल्हापुरी चप्पल घालून हा मावळा गडी डोंगरांवरून लीलया वेगाने चालत होता, तेंव्हा त्याचबरोबर चालणे हे शहरी बेण्यांचे काम नाही हे कळून चुकले. जंगलात थोडी सावली मिळाल्यावर आम्ही मांड्या ठोकल्या. त्याची बिचाऱ्याची पुरणपोळी वाट बघत होती याची पण आम्हाला जाणीव राहिली नाही. अजून किती लांब आहेर रे मोहरी दादा ? असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या वेगाने खूप लांब आहे असे सडेतोड उत्तर देऊन तो मोकळा झाला.  SP कॉलेज मध्ये मिळलेलं  पुणेरी बाळकडू आम्हाला परत पाजून ऐन होळीच्या सणाला त्याने आमचे तोंड कडू करून बंद केले. आता झालेल्या अपमानामुळे म्हणा किंव्हा रानात घेतलेल्या विश्रांतीमुळे म्हणा पाय अचानक झपाझप चालायला लागले. ब्राह्मणवाडी, हार्पूड हि गावे  गेल्यावर बोडक्या डोंगरांच्या मध्ये एक विस्तीर्ण विहीर लागली (रमेश ने सांगितल्याप्रमाणे). तिथे आम्ही मनसोक्त हातपाय धुवून घेतले. पायाच्या फोडांना गोंजारून झाले आणि आमची गर्दी पाहून तिथे जमलेल्या गुरांना पाणी पाजून झाले.  डोंगरांमधील सापशिडीचा खेळ चालूच होता. वळसे वळसे घेऊन एकामागून एक डोंगर संपवत आम्ही थोड्याश्या सखल भागी आलो. तिथून लिंगाणा दिसू लागला म्हणजे आता मोहरी गाव जवळ आले होते. जाताजाता दिसणाऱ्या डोंगर रांगेतून कोकणदिवा शोधण्याचा खेळ खेळून झाला. सिंहावलोकन करून तोरणा राजगड किंवा सिंहगड किती लांब राहिलाय याचा अंदाज लावण्यात आला.

                सुदैवाने आज आम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळेत गावात पोहोचलो होतो आणि गावातच जेवण सांगितले होते त्यामुळे आजची पदयात्रा हि भातमुक्ती साठी दिलेला यशस्वी लढा होता. लिंगाणा क्लाइंबिंग च्यावेळेस मी २०१८ मध्ये मोहरीमध्ये जेवलो होतो त्यामुळे पुन्हा एकदा जिभेच्या जुन्या आठवणी जागृत  झाल्या. बबन कचरे काकांच्या घरी नाचणीची भाकरी भाजी भात वरण असे सुग्रास जेवण झाले. जेवता जेवता कचरे काकांबरोबर शहरातील आणि गावातील जीवनावर गप्पा झाल्या. माणूस कसा कष्ट-टाळू झालाय आणि नको त्या शानो शौकतेच्या नादात माणसाने तब्येतीची कशी वाट लावून घेतली आहे. पशुसंवर्धन कसे महत्वाचे आहे अशा अनेक विषयांना काकांनी हात घातला आणि आमच्या डोळ्यात अंजन घातले. जेवण झाल्यावर मात्र डोळे उघडे ठेवणे आम्हाला शक्य नव्हते.  शेणाने सारवलेल्या अंगणात एक मस्त झोप झाली आणि आता बोराट्याची नाळ आणि रायलिंग पठार अनावश्यक वाटू लागले. बोराट्याच्या नाळेने उतरून खाली पाणे गावात मुक्काम करायचा प्लॅन रद्दबातल करण्यात आला.  पुन्हा एकदा विचारविनिमय आणि चर्चा झाल्यावर सिंगापूर नाळेने दापोली मध्ये जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. बऱ्याच जणांनी या आधी लिंगाणा आणि बोराट्याची नाळ पहिली होती, काहींची लिंगाणा चढाई सुद्धा झाली होती त्यामुळे नवीन घाटवाट धुंडाळण्यात सर्वानीच होकार भरला. विशाल रेकी करायला आला होता तेंव्हा मोहरीमध्ये हेल्मेट विसरला होता त्यामुळे आता जरा कुठे सॅक थोडी हलकी झाली होती पण त्यात आता ह्या हेल्मेट चे ओझे आले.  (मढे घाट धबदब्यात असाच एक महाभाग आम्हाला हेल्मेट घेऊन धबधब्यात जाताना दिसला तेव्हा आम्ही खूप हसलो होतो. वाचकांना नम्र विनंती..  कृपा करून आम्हाला हसू नका) 

                     सिंगापूर नाळ बोराट्याच्या नाळीपेक्षा सोपी वाट होती आणि विशेष म्हणजे एक रॉकपॅच च्या वर आम्हाला 4G ची रेंज आली..  मग काय ? सर्वानी आपापल्या घरी खुशहाली कळवली. स्टीफन ने तर Tiktalk विडिओ मध्ये आजूबाजूचे डोंगर जगाला दाखवले सुद्धा.  सिंगापूर नाळेत सह्याद्रीच्या राकट रूपाचे दर्शन झाले. लिंगाण्याची मागील बाजू पाहायची संधी मिळाली. महादेवाच्या पिंडीसारखा दिसणाऱ्या अजस्त्र  लिंगाण्याच्या आम्ही पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडलो.



आता आमचा ९५ % ट्रेक पूर्ण झाला होता. काळ नदीची एक उपनदी आहे दापोली गावाला लागून. त्या नदीतले दगड गोटे लांघून गेल्यावर आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता. दापोली गावात प्रवेश करताच शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला. आत्ता पर्यंत लागणारी ऊर्जा इथूनच तर मिळत होती. आम्ही सगळे तिथे नतमस्तक झालो. गावातल्या लोकांनी कळशी भरून आम्हाला पाणी दिले. आमच्या मोहिमेबद्दल कळल्यावर कौतुक केले आणि गावातील होळीला येण्यासाठी निमंत्रण दिले. एक नुकतीच व्यायलेली कुत्री तिच्या गोंडस पिल्लांना घेऊन गावात फिरत होती.  त्या  पिल्लांशी थोडे खेळून झाल्यावर आम्ही गावातील दत्तमंदिरात पोहोचलो.  मंदिर मोठे प्रशस्त होते.  आम्ही बॅगा ठेवून गावातल्या विहिरीवर जाऊन ताजेतवाने होईन आलो. लगेच चूल पेटवली शेवटचा मसाले भात शिजायला ठेवला. गुलाबजाम वळायला घेतले. Barbeque च्या सळया वापरून चुलीत बटाटे भाजायला टाकले. हा हा म्हणता सगळा  स्वयंपाक झाला.  अर्धवट भाजले गेलेल्या बटाट्यांचे काप तेलात तळून फ्रेंच फ्राईज तयार झाले.  सर्वानी गेल्या ३ दिवसात घेतलेल्या कष्टाचे चीज झाले होते. जवळ जवळ १०० किमी चा प्रवास आम्ही पूर्ण केला होता. उद्या सकाळी उठून फक्त रायगड चडून जाणे बाकी होते. जेवण झाल्यावर बॅगा आवरता आवरता कधी झोप लागली याचा पत्ताच लागला नाही. जी कोकणातली होळी बघण्यासाठी आम्ही इतक्या दूर आलो होतो ते विसरलोच. पण विशाल, प्रथमेश आणि मारुतीने गावाबाहेरील माळरानावर पेटलेल्या होळीला आमच्या वतीने हजेरी लावली आणि आमच्या साठी सगळी  होळी विडिओ मध्ये घेऊन आले.  सकाळी उठल्यावर झुंजूमुंजू झाल्यावर रात्री पाकात भिजलेल्या गुलाबजामचा आणि पाईनॅपल शिऱ्याचा नाश्ता  केला. अशा रीतीने ट्रेकची सांगता माझ्या सॅक मधल्या रव्याचा महाप्रसाद करून केली.

                     गावातील टेम्पो ने आम्हाला पंडेरी, वाघीरी या गावातून वाळणकोंडी डोहापर्यंत आणले. तिथल्या लोखंडी पुलावर, रांजणखळग्यात  आणि  आजूबाजूच्या निसर्गसौंदर्यात अजून थोडी फोटोग्राफी झाली. पावसाळ्यात या भागातील धबदब्यांना पुन्हा भेट द्यायचा निर्णय आता झालेला आहे.  डोहाच्या कडेला वसलेल्या वरदायिनी मातेचे दर्शन घेऊन आम्ही वारंगी गावात पोहोचलो. अजून थोडे चालल्यानंतर आम्ही शेवटच्या गावी म्हणजे छत्री निजामपूर ला पोहोचलो. किरण आणि महेंद्र सर गाडी घेऊन  तिथे आले होते. मॅच जिंकल्यावर ड्रेसिंग रूम मध्ये होते तसे जंगी स्वागत त्यांनी आमचे केले. जवळपास १०३ किमी चा पल्ला आम्ही चालत पार केल्याचा आम्हाला विश्वास बसत नव्हता. आजूबाजूला दिसणाऱ्या कोकणदिवा, लिंगाणा, खानूचा डिग्गा, रायगडाचा भवानी कडा जणू आमच्या वेड्या साहसाचे कौतुक करत होता. संघभावनेने घेतलेल्या कष्टांचे चीज झाले होते. गाडीतून जेमतेम १५-२० मिनिटांमध्ये आम्ही पाचाडला रायगडाच्या पायथ्याला पोहोचलो. पाठीवरचे सर्व ओझे गाडीत ठेवायचे असल्यामुळे  चुकल्याचुकल्या सारखे वाटत होते. महादरवाजापाशी पोहोचल्यावर ४ दिवसांचे कष्ट विसरायला झाले.

रायगडासारखाच भक्कमपणा आपल्यात असल्याचा आणि कोणत्याही संकटाना सामोरे जायची ताकत असल्याची भावना आम्हा सगळ्यांना जाणवत होती.  गडावर गर्दी होती पण आज आम्हाला घाई नव्हती. अंधार पडेल म्हणून पळापळ करायची नव्हती. महादरवाजा, पालखी दरवाजा, हत्तीतलाव, गंगासागर, शिरकाई देवी मंदिर, होळीचा माळ, मनोरे, धान्याची कोठारे, सदरेचे अवशेष, राण्यांचे महाल, जगदीश्वर मंदिर, टकमक टोक  महाराजांची समाधी, बाजारपेठ, राजदरबार, नगारखाना सर्व ठिकाणे निवांत फिरून आम्ही जेवायला गेलो गडावर जेवण झाल्यावर महेंद्र आणि किरण सर सिद्धांतच्या वाढदिवसाचे निमित्त साधून खास पुण्यावरून कयानी बेकरीचा केक घेऊन आले होते. वाढदिवसाचा एक छोटेखानी समारंभ गडावर मोठ्या आनंदात पार पडला.


टकमक टोक 

खानूचा डिग्गा आणि कोकणदिवा 


               खाली उतरताना या पूर्वी कधीही न पाहिलेला नाने दरवाजा पहिला.  एवढी संकटे झेलून सुद्धा  देवड्या, दरवाजा आणि बुरुजांचे अवशेष अजून शाबूत आहेत.  दरवाजातील मारुतीला आम्हाला दिलेल्या शक्तीबद्दल धन्यवाद देऊन आम्ही खाली उतरलो. आमच्यासाठी हा वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद होता. स्टीफन आणि ओंकार ने रस्त्यावर आम्ही लांघून आलेल्या दुर्गांची विटेने नावे लिहिली. तिथेच रस्त्यात फोटो काढून आम्ही सेलेब्रेशन केले. आणि Icing on Cake म्हणतात तसे शेवटची भेट आम्ही वाघबीळ ला दिली . दुर्बिणीसारखी दिसणारी कातळातील नेढी पाहताना आम्हाला आश्चर्याचा धक्का बसत होता. खरंच सह्याद्रीमध्ये मुक्त संचार फक्त वाराच करू शकतो. त्या नेढ्यात बसल्या बसल्या  संध्याकाळच्या कातरवेळी गेल्या ४ दिवसांच्या प्रवासाच्या आठवणी दाटून आल्या. त्या सुखद आठवणींचे ओझे घेऊन आम्ही शेवटचा चहा पिऊन बसमध्ये बसलो आणि पुण्याच्या दिशेने रवाना झालो.

वाघबीळ 
         पुण्यात कात्रजच्या घाटात पोहोचताच कोरोनाच्या संसर्गाची बातमी कळाली आणि काळजात चर्र झाले. संचारबंदी, Lockdown या सारख्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल याची पुसटशी पण कल्पना आम्हाला नव्हती. ४ दिवस सह्याद्रीमधील मुक्त संचारानंतर डायरेक्ट संचारबंदी म्हणजे ज्या गिर्यारोहकाने मोठ्या कष्टाने शिखरमाथा सर करावा आणि त्याच  शिखरावरून त्याचाच कोणीतरी कडेलोड करण्यासारखे हे होते.
         
                     
            असो, कितीही दुःख झाले तरी भावनांना आवर घातला पाहिजे. थोडा संयम सगळ्यांनीच  पाळला पाहिजे. आम्ही खूप भाग्यवान होतो म्हणून आमच्याकडून १०३ किमी चा हा अवघड ट्रेक पूर्ण झाला. आज ह्याच ट्रेक च्या आठवणींमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीने घरात कोंडले असताना वेळ घालवणे मोठे आव्हान वाटत नाहीये .  देव तुम्हा सर्वांना ह्या कठीणसमयी शक्ती, सहनशक्ती आणि या संकटाला सामोरे जाण्यासाठी लागणारे धारिष्ट्य देवो हि प्रार्थना !




           
 
हरहर महादेव !!!

---वैभव
फक्त नावात



     
       



   






               





Saturday, January 11, 2020

भैरवगड ते रतनगड

           २०१९ च्या वर्षाची सुरुवात चंद्रगड ते आर्थर सीट या Range ट्रेक ने झाली.  आणि त्यानंतर एकापाठोपाठ Range ट्रेक झाले. हिमाचल मधील सारपास,  राजगड ते तोरणा, सिंहगड ते विंझर, ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड,  लोणावळा ते भीमाशंकर.  वर्षाचा शेवट सुद्धा एखादा  मोठा ट्रेक करून करावा असं वाटतं होते. पण थंडीच्या  मौसमात सर्वजण काही ठराविक गडकिल्ले आणि काही मोजक्याच जागांवर गर्दी करतात. तेंव्हा  कुठला तरी offbeat ट्रेक करायचा मानस विशाल ला सांगितला आणि हो नाही करता करता शेवटी भैरवगड ते रतनगड चा ट्रेक  फायनल झाला.

             बरोबर ११ लोकांची टीम जमली. जास्त गर्दी नाही. सुटसुटीत कारभार. ऑफलाईन मॅप डाउनलोड केला पुण्यावरून राजगुरूनगर, आळेफाटा मार्गे राजूर जवळील शिरपुंजे गावात पोहोचलो. वाजले होते सकाळचे ५: ३०. रात्रभर प्रवास केल्यामुळे अंग अवघडून गेले होते. आजूबाजूच्या गावाने धुक्याची चादर पांघरली होती. म्हणावी तशी थंडी नव्हती पण एक प्रकारचा आल्हाददायक गारवा हवेत होता. आळस झटकून'आम्ही बसमधून खाली उतरलो. सभोवतालच्या डोंगररांगा अजूनही रात्रीच्या अंधारात आकाशाला घट्ट मिठी मारून झोपल्या होत्या.  आम्हाला कितीही झोप आली तरी झोपून चालणार नव्हते कारण २ दिवसांचा मोठा कार्यक्रम घेऊन आम्ही आलो होतो. गावातल्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल रुख्माई च्या मंदिरात आम्ही आमचा पसारा मांडला. विशाल ने पटापट शेगडी सिलेंडर जोडून त्यावर चहासाठी आधण ठेवले. सोबतीला ओंकार आणि राहुल होतेच. खरतर मंदिरातल्या पायऱ्या ह्या बर्फाच्या लाद्या वाटत होत्या पण नाश्त्याच्या तयारी साठी सगळेच जण  उत्साहाने आणि लीलया त्या मंदिराच्या आवारात वावरत होते. गप्पा गोष्टी करत करत गाजरं कापून झाली , मटार सोलून झाले आणि मॅग्गी शिजू लागली. स्पेशल गुळाचा चहा तयार झाला.     

            थोड्याच वेळात तांबडे फुटले, कोंबड्याने बांग दिली. गुळाचा चहा आणि तिथल्या प्रसन्न वातावरणात आमची मरगळ गळून पडली. सूर्यनारायणाने अवकाशात भगवे निशाण फडकवले आणि आम्ही प्रवासासाठी सज्ज झालो.  महाराष्ट्रामधली उंच शिखरे कोणती असे कोणी विचारले तर कळसुबाई आणि तारामती ह्या पलीकडं लोकांना फारशी माहिती नसते. आम्ही अशीच काही शिखरे चढणार होतो.  पण फार दुर्गम भागात असल्यामुळे आणि ट्रेक च्या रस्त्यात पिण्याच्या पाण्याची काही सोया नसल्यामुळे गवळदेव (१५२२ मीटर्स ), घनचक्कर (१५३२ मीटर्स ) हि  शिखरे तशी  दुर्लक्षितच आहेत. फारसे ट्रेकिंग ग्रुप ह्या ट्रेकच्या वाट्याला जात नसल्यामुळे रस्ता वहिवाटीचा नव्हता. जरी गुगल नकाशावर दाखवत असला तरी एखादा वाटाड्या बरोबर घेणंच शहाणपणाचे होते. आम्ही गावात विचारपूस केली आणि गावातून सुरेशभाऊ आमच्याबरोबर यायला तयार झाले ते आमच्या बरोबर  मुडा  पर्यंत येणार होते नंतर कुमशेत चा रास्ता दाखवून पुन्हा माघारी शिरपुंजे ला येणार होते.  

             सगळे सोपस्कार होईपर्यंत ७:४५ ते ८:०० वाजले होते.  आम्ही भैरवगड चढायला सुरुवात केली.  सखल रस्ता लगेच संपला आणि खडी चढाई सुरु झाली. सकाळी ऊन नसल्यामुळे फारसा त्रास जाणवला नाही पण तरीसुद्धा गडाने ऐन थंडीत घाम काढला. मस्त वॉर्मअप झाला होता. जाताना रस्त्यात दिशादर्शक म्हणून दगडांवर त्रिशूळ काढलेले होते. हळूहळू करत आम्ही एका'खिंडीत पोहोचलो तिथून हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांना जोडणारा रस्ता जात होता. तर दुसरा थेट भैरवगडावर. गावाचा उत्सव वगैरे होत असल्यामुळे वरच्या पायऱ्या बाजूचे रेलिंग सुस्थितीत होते. गडावर पोहोचताच एकाबाजूला स्वच्छ पाण्याचं  मोठे टाके आहे तर काही ३-४ लहान लहान टाकी आहेत. थोडे पुढे गेल्यावर मुख्य भैरवनाथाचे मंदिर दिसते. मंदिराच्या सुरवातीलाच काही वीरगळ आहेत. दगडात कोरलेले मंदिर हे उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे दगडातून च मंदिरात प्रवेश करायला आणि बाहेर यायला २ दरवाजे काढले आहेत. आत मध्ये असलेली भैरवनाथाची अश्वारूढ  मूर्ती फारच सुंदर आहे. आमच्यासारख्या गिरीप्रेमी लोकांना अशी देवस्थाने ऊर्जा देतात. इथूनच नवनवीन शिखरे पादाक्रांत करायची शक्ती मिळते. दर्शन घेऊन अजून थोडे वरती  गेल्यावर "सीता डोनी" नावाचे पाण्याचे टाके आहे. त्याच्या वरील पठारावरून दूरवर असलेल्या बालाघाट रांगेचा मनमोहक नजारा भुरळ घालतो. त्यात विराजलेला आणि ऐसपैस पसरलेला  हरिश्चंद्रगड त्यातील विशिष्ठ आकाराच्या तोलारखिंडीमुळे सहज ओळखता येतो. गडावर असलेल्या भगव्याला वंदन करून, आजूबाजूचा परिसर न्ह्याहाळात आम्ही गडउतार झालो पुन्हा खाली खिंडीत आल्यावर आम्ही सर्वानी विशाल च्या मागोमाग सह्याद्रीचे वर्णन असलेली एक प्रार्थना म्हणालो. इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे याची एक रूपरेषा जाणून घेतली आणि समोरच्या डोंगरवरून एका निमुळत्या पायवाटेने आम्ही मार्गस्थ झालो. दूरवर धुक्यात हरवलेल्या कलाडगडाला शोधायचा आम्ही प्रयत्न करत होतो.


                  काही अंतर चालून गेल्यावर आम्हाला एक नैसर्गिक आणि एक मानवी चमत्कार पाहायला मिळाला. इंद्रदेवाच्या कोपामुळे गोकुळात अतिवृष्टी झाली. आलेल्या पुरात गायीवासरे वाहून जाऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला आणि त्याखाली सर्व गावाला आसरा दिला हि पुराणकथा सर्वश्रुत आहे  पण विश्वास बसणार नाही, आम्ही असाच काहीसा चमत्कार भैरवगडासमोरील डोंगरावर पहिला. या डोंगरात नैसर्गिकरित्या एक अत्यंत खोल अशी कपार तयार झाली आहे. गावातील काही स्थानिकांनी या कपारीमध्ये गोठा बांधला आहे. तिथल्या मावशींना विनंती केली असता त्यांनी आम्हाला त्याचा गोठा पाहायला आत बोलावले. आत कमीतकमी १० गायी आणि २०-२५ शेळ्या होत्या. त्या गावकऱ्यांचा संपूर्ण संसार होता.  काटक्या आणि वेलींनी संपूर्ण कपार समोरून झाकून  टाकली होती त्यामुळे वारा पाऊस यापासून अगदी कडेकोट सुरक्षा होती. त्यांचे ते घर पाहून आम्हाला खरंच हेवा वाटला. privacy आणि security  च्या नावाखाली  शहरात आपण ज्या खुराड्यात राहतो त्याची लाज वाटली.



                त्या घरातल्या लोकांशी  जरा हितगुज करून आम्ही पुढे निघालो.  थोड्याच वेळात आम्ही एका विस्तीर्ण पठारावर पोहोचलो. हिरवेगार पठार सकाळच्या उन्हामध्ये पाचूसारखे चमकत  होते. वाटेत  "धोटी" नावाची श्वेतवर्णीय फुले दिसली. यांचा मुख्य उपयोग सर्पदंश झाल्यावर आलेली सूज उतरवण्यासाठी केला जातो अशी माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली.  थोड्याच वेळात दर्शन झाले ते घनचक्कर शिखराचे. थोडावेळ फोटो सेशन करून , पेटपूजा करून आम्ही वरती पोहोचलो. अजूनही धुके सरले नव्हते पण तरी सुद्धा भंडारदरा जलाशयाचा काही भाग आता दिसू लागला होता.

                  गवळदेव चा डोंगर दिसत होता आणि त्याहीपेक्षा सुखावह म्हणजे कात्राबाई, रतनगड सुद्धा अंधुकसे दिसत होते. दऱ्याडोंगरात भटकताना दुसऱ्यादिवशी गाठायचे डेस्टिनेशन आदल्यादिवशी दिसण्यासारखे सुख नाही. घनचक्कर वर वाऱ्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन आम्ही खाली उतरते झालो. सामोर एक पठार दिसत होते जिथे बऱ्याच गाई चरताना दिसल्या पण कोणी गुराखी दिसत नव्हता. पठारावरून समोर  गवळदेव चा डोंगर त्याच्या उंचीने छातीत धडकी भरवत होता. सूर्य माथ्यावर आला होता आणि पोटात कावळे ओरडू लागले होते.
समोरच्या गर्द झाडीत सावलीला बसावे आणि सकाळ पासून पाठीवर वागवलेले डबे रिते करून पोटाची क्षुधा शांत करावी असा विचार करून आम्ही पटापट खाली उतरलो पण पुढे  फारच मोठा भ्रमनिरास झाला. समोर मोठी दारी होती आणि पल्याड असलेल्या गवळदेव च्या डोंगरावर जायला रस्ता च दिसत नव्हता. दुर्दैवाने आमचे वाटाडे सुरेशभाऊ पण वाट विसरले होते. आता मात्र आमची वाट लागली असती जर गूगलदेव धावून आला नसता  तर आम्ही काही गवळदेव ला पोहोचू शकलो नसतो.  दिलीप सरांच्या घरून विशालच्या मोबाइल वर फोन आला आणि आम्हाला Range आली. रम्बलर वरचा मॅप गुगल वर खात्री करून आम्ही रस्ता  शोधून काढला.  समोरच्या गवळदेवच्या पायथ्याशी एका  मोठ्या दगडाच्या आडोशाला थोडी सावली मिळाली आणि समोर दिसत होता खोल आणि लांबवर पसरलेल्या दरीचा नजारा. कुंडलिका Valley ची आठवण करून देत होती ती दरी. आम्ही तिथेच अंगत  पंगत मांडली आणि वदनी कवळ न म्हणताच अन्नाला जवळ केले. दरीतून गार गार वारे वाहत होते.

               जेवण झाल्यावर डोळ्यावर पेंग आली होती पण पुन्हा एकदा झोपेला मुरड  घालून आम्ही shoes च्या नाड्या आवळल्या. जेवल्यानंतर आमचे वेग भरकटले होते त्यातच काही लोकांची चुकामुक झाली आणि ते चुकून खालच्या बाजूने गेले पुन्हा आवाज देऊन त्यांना वर बोलावून घेतले. आणि मजल दर मजल करत आम्ही वर पोहोचलो. आधीच सरळ वाट नसल्यामुळे आम्ही बराच वळसा घालून वर आलो होतो आणि नवे आव्हान आ वासून आमची वाट पाहत होते. वरती भला मोठा रॉक patch चढायचा अजून बाकी होता. कसे बसे धापा टाकत आम्ही वरती आलो. गवळदेव शिखरावर एक पांढऱ्या रंगाची पिंड आणि अनेक घंटा आहेत.



              इथून दूरवर आजोबा पर्वत, करंडा,  कात्राबाईची खिंड, रतनगड, रतनगड चा खुट्टा,अशी अनेक मोठी मोठी शिखरे दिसतात. दुसऱ्या बाजूला भंडारदऱ्याचा विस्तीर्ण जलाशय. ते दृश्य नजरेत तसेच कॅमेऱ्यामध्ये साठवून आम्ही कुमशेत गावच्या दिशेने उतरायला सुरुवात केली. सुरेशभाऊ ना परतीच्या वाटेवर अंधार लागू नये म्हणून आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि मुडा डोंगराला गर्द  झाडीतून  वळसा मारून आम्ही उतरणीचा रास्ता धरला.  रस्त्यात जंगली श्वापदांचे पायाचे ठसे पाहावयास मिळाले. सूर्याची तीव्रता कमी झाली होती. पण तो मावळायच्या आत आम्हाला कात्राबाई ची खिंड उतरून खाली गावात कुमशेत ला वस्ती ला जायचे होते. आम्ही सर्वानी आता झपाझप पावले टाकलेला सुरुवात केली. राहुल आणि दिलीप सर वाऱ्याच्या वेगाने सुटले. क्षणार्धात ते त्या झाडीत अदृश्य झाले. उजेड होता तो पर्यंत आम्ही बराचसा डोंगर उतरून खाली आलो.
पण तरी विजेरी काढावी लागली. त्याच्या उजेडात दगड गोट्यातून अलगद पावले टाकत शेवटी आम्ही गावाच्या वेशीपाशी पोहोचलो. एव्हाना २-३ वेळा Walky Talky वर बोलून आमच्या गाडीच्या ड्राइवर ला बरीच प्रॅक्टिस झाली होती त्यांनी गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरापाशी गाडी आणली. आम्हाला मात्र अजून मंदिर टप्प्यात येत नव्हते. काही घरे दिसत होती पण त्या अंधारात आमच्याशी वार्तालाभ करायला कोणी येईना.


              अंधारात डोकयावर चादर पांघरलेली एक आकृती आम्हाला दिसली. "काय मामा, मंदिर किती लांब आहे, ? शाळा कुठे आहे गावातली ?" असे  प्रश्न आमच्याकडून ऐकून सुद्धा तिकडून  एक नाही ना दोन. असा अनुभव आमच्यासाठी सुद्धा नवीन होता. सहसा गावात आदरातिथ्य नसले तर विचारपूस तर नक्कीच होते. पण हे काही तरी अजब च होते. आम्ही तसेच पुढे चालत राहिलो आणि शेवटी गावातल्या मंदिरात पोहोचलो. त्याला लागूनच प्राथमिक शाळा होती. आणि समोरच्या आवारात मोठे पटांगण होते आम्ही पटापट गाडीतून तंबूचे साहित्य काढून तंबू उभारले. गावातील  काही लोक पाणी भरायला चालले होते त्यांच्याकडून आम्हाला मागे बांधलेल्या तलावाची माहिती मिळाली. तिथे बाजूलाच असलेल्या स्मशानभूमी मुळे आम्ही थोडे दचकलो पण इलाज नव्हता. आम्ही पाणी भरले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागलो.  दिवसभराच्या धावपळीमुळे कधी जेवून झोपतोय असे झाले होते. राहुल, ओंकार विशाल आणि दिलीप सर अजून हि त्याच उत्साहात स्वयंपाकाची तयारी करत होते. आम्ही आपले उचलल्या तळी ला चांग भलं म्हणत भाज्या कापाकापी, निवडा निवडी सारखी किरकोळ कामे करून मदत करत होतो. थोड्याचवेळात पुलाव आणि पाईनॅपल शिरा तयार झाला आम्ही सगळ्यांनी त्यावर आडवा हात मारला. भांडी विसळली. गावात कुठे दूध मिळाले असते तर अजून मजा आली असती.
     

                     एवढ्यात ती चादर पांघरलेली आकृती आमच्या डोळ्यासमोरून वाऱ्याच्यावेगाने मधल्या पटांगणातून समोरच्या पारावर चढून पलीकडल्या अंधारात गायब झाली. कोणीतरी मनोरुग्ण असल्याची आमची खात्री पटली. त्या रात्रीच्या अंधारात आमचे तंबू किती सुरक्षित होते देव जाणे पण शेवटी देवाचे नाव घेऊन आम्ही तंबूत शिरलो आणि sleeping बॅग मध्ये निद्रेत विसावलो. सकाळी ५: ३० /६: ०० वाजता उठलो तेंव्हा सर्वजण ताजेतवाने होते. सकाळी फक्कड असा आल्याचा चहा आणि उप्पीट असा नास्ता करून आम्ही आमचे चंबूगबाळे बस मध्ये ठेवले. थोड्यावेळ गावातल्या लोकांबरोबर शेकोटीवर गप्पा झाल्या. शाळेतल्या मुलांना गोळ्या वाटून झाल्या बस ड्राइवर बस घेऊन रतनवाडीच्या दिशेने गेला आणि आम्ही पुन्हाएकदा कात्राबाईच्या खिंडीतून वर चढू  लागलो आज झोप झाली होती त्यामुळे आम्ही पटापट वर चढून आलो.  वाटेत झऱ्यावर पाणी भरले. आणि गर्द  झाडीतून पिवळ्या फुलांमधून मार्ग काढत आम्ही हळूहळू एक एक टप्पा चढत वर जात होतो.  जसे जसे वर जात होतो तसे कुमशेत चा "वाकड्या" सुळका आणि काल लांघून आलो होतो ती डोंगर रांग आमच्या निरोपासाठी  उभी असल्यासारखी भासत होती. हवामान ढगाळ होते पण मधून अधून सूर्यकिरणे खाली पर्यंत पोहोचत होती आणि गावातील तलावावर चमकत होती. त्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही शेवटी वरती पोहोचलो. वरती जवळजवळ १.५ किमी आडवे चालत गेल्यावर आम्हाला जे काही दिसले ते शब्दात वर्णन करणे केवळ अशक्यच.  आज पर्यंत कोकणकडा पाहिल्यावर आपल्याला सह्याद्रीचे रौद्र रूप दिसते अशी समजूत होती.  पण कात्राबाई टोकावरुन सुमारे २०००-२५०० फूट खोल दरीचे अक्राळविक्राळ रूप  पाहिल्यावर आम्ही स्तब्ध झालो तिथल्या निरव शांततेत हरवून गेलो.



                 समोर दिसणारी दरी, पलीकडील रतनगडचा परिसर अवाक करून टाकत होता, सोबतीला वाहणारा वारा जणू काही शिवतांडव स्तोत्र म्हणत होता. मनसोक्त फोटो काढून झाल्यावर आम्ही तिथून निघालो पण त्या जागेने मनात घर केले होते. वेळ कसा गेला ते कळलेच नाही नंतर मात्र उशीर होऊ नये म्हणून दिलीप सर काही निवडक लोकांना घेऊन पुढे गेले.  मी, विशाल विवेक सर आणि अनुप सर निवांत येत होतो. रतनगड ला आधी गेलो होतो त्यामुळे परत वर जायची घाई नव्हती पण कात्राबाई वरून दिसणाऱ्या निसर्गावर प्रेम जडलं होते. ते आठवत आठवत रमत गंमत आम्ही ४ जण खाली उतरलो. घनदाट जंगलातून आम्ही रतनगडाच्या दिशेने जाऊ लागलो. शेवटचे बोलणे झाले तेंव्हा कळले कि दिलीप सर आणि राहुल मंडळी रतनगडावर पोहोचली सुद्धा. आम्ही तर आत्ताशी कुठं खिंड उतरून खाली आलो होतो म्हणजे जवळ जवळ ५-६ किमी चे अंतर पडले होते दोन गटांमध्ये. वेगात दौडणारे आमचे ७ मावळे गडावर पोहोचले पण आम्ही मात्र रतनगड -हरिश्चंद्रगड जंकशनला आराम फर्मावला. तिथल्या हॉटेलमध्ये सेल्फ सर्विस नव्हती पण विशालनं त्यांच्या चुलीचा ताबा घेतला (Of course त्यांना विचारून ) आणि हवे तसे पोहे केले आणि यजमानांना आराम करायची संधी दिली.  थोड्याच वेळात वर गेलेले मावळे खाली आले आणि कात्राबाईच्या खिंडीतून अग्निबाण नावाचा सुळका आहे तिथून गाववाल्या लोकांचा एक रस्ता आहे जो घेतला असता तर ७-८ किमी चे अंतर वाचले असते. पण अशा अनवट वाटांची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्यांच्या वाट्याला ना गेलेलेच बरे. थोड पुढंमागं झाले असले तरी ट्रेक मस्त झाला होता. आयुष्यभरासाठी आठवणी गोळ्या झाल्या होत्या.  २ दिवस दऱ्याडोंगरात फिरून मन तृप्त झाले होते. खाली आल्यावर अमृतेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला बस मध्ये बसलो वाटेत नारायणगाव ला मस्त मासवाडीचे  जेवण केले आणि तृप्त मनाने आणि पोटाने ट्रेक ची सांगता करत आम्ही घरी परतलो .
 
      ह्या ट्रेकच्या आठवणी नवीन वर्षात देखील अजूनही  रेंगाळत आहेत.  असेच ट्रेक दरवर्षी होवोत हीच प्रार्थना त्या भैरवनाथा पाशी आणि गवळदेवा पाशी.



          
 कात्राबाई प्रसन्न ! हरहर महादेव !!! 

 ---वैभव   
 फक्त नावात