Monday, March 11, 2019

राजगड ते तोरणा


या वर्षाची सुरुवात मोठ्या मोठ्या ट्रेक्स ने झाली. चंद्रगड ते आर्थरसीट, नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड, चोरवणे मार्गे  नागेश्वर गुहा. प्रत्येक ट्रेक हा नवीन आव्हान आणि शारीरिक क्षमतेची  परीक्षा पाहणारा होता. तरीसुद्धा एक ट्रेक करायची इच्छा बऱ्याच वर्षांपासून मनात रेंगाळत होती पण काही केल्या योग येत नव्हता. तो म्हणजे राजगड ते तोरणा. स्वराज्याच्या जुन्या राजधानीपासून स्वराज्याचे तोरण जिथे बांधले गेले तिथे. म्हणजे सर्वोच्च शिखरापासून पुन्हा पायथ्या पर्यंत. ते म्हणतात  ना अगदी Back to Basic तसे.

        सुशील ची आणि माझी ओळख चंद्रगडच्या ट्रेक ला झाली. चवड्यावर अलगद, पण झपाझप घाटवाटेवरून, डोंगरदऱ्यातून चालायची त्याची पद्धत फारच वेगळी वाटली. त्याची हलकीफुलकी शरीरयष्टी, चालताना असलेला कमालीचा वेग आणि तितक्याच तोडीचा स्टॅमिना आश्चर्यचकित करणारा होता. २०० वेळा सिंहगड सर केल्यामुळे लवचिकता आणि चपळाई त्याने अंगिकारली आहे.  आपल्याला नेहमीच संतूरची जाहिरात करणारी ललना दिसते जी आई असते पण वाटत नाही. अशी काही जाहिरात आम्हा बापुड्या पुरुषांची केली तर सुशील त्या भूमिकेत चपखल बसेल

          सुशीलने आणि मी, मध्ये चावंड, शिवनेरी आणि कुकडेश्वर असा ट्रेक प्लॅन केला होता. नियोजन सगळे त्याचेच. सगळ्या गोष्टी आटपून संध्याकाळी चहा च्या वेळात आम्ही घरी सुद्धा पोहोचलो होतो. सर्व गोष्टी जुळून येत असतील तर काही तरी मोठे प्लॅन केले पाहिजे असे मनात असतानाच राजगड ते तोरणाची मोहीम ठरली. Whatsapp वर ग्रुप तयार झाला. विजय गव्हाणे,अवधूत अत्रे, शिवेंद्र, निलेंद्र, हर्षद, तृणाल  देशमुख, राजन असे सगळे पट्टीचे ट्रेकर्स जमले. विनय देशमुख कडून काही टिप्स मिळाल्या.  सुशील कडून वेळापत्रक आणि प्रोजेक्ट प्लॅन तयार झाला. उन्हाळा वाढत असल्यामुळे फार उशीर करून जमणार नव्हते. मार्च २०१९ दिवस ठरला

        दोन अजस्त्र किल्ले चढून अंदाजे मधली २० किमी ची  घाटवाट करून जावे  लागणार होते. नसरापूर वेल्हे रस्त्यावर किमी अंतरावर दिसणाऱ्या या दोन्ही किल्ल्यांचे मराठांच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. सगळ्यांनी एका मार्गाने जाऊन जमणार नव्हते कारण ट्रेक संपल्यावर तिथून पुढे घरी येण्यासाठी बस च्या भरवशा वर विसंबून राहता येणार नव्हते. कदाचित उशीर झाला असता तर पंचाईत झाली असती. आम्ही दोन ग्रुप करायचे ठरवले. एक ग्रुप राजगड ते तोरणा करणार होता आणि दुसरा ग्रुप तोरणा ते राजगड करणार होता. प्रत्येक ग्रुप आपापली गाडी गडाच्या पायथ्या पाशी लावणार होता आणि दुसरा ग्रुप ट्रेक संपवून ती गाडी घेऊन घरी येणार होता. ऑफलाईन गुगल मॅप डाउनलोड करून घेतले होते. सगळी जय्यद तयारी झाली होती.

        शुक्रवारी ऑफिस मधले काम लवकर आटपून निघावे म्हणले तर रस्त्याला प्रचंड ट्रॅफिक लागले आणि अडीच तासांचा प्रवास करून मी कसाबसा घरी पोहोचलो. पटापट बॅग भरायला घेतली आणि लवकर जेवून झोपलोजाग येईल का नाही या भीतीने झोप आलीच नाही. शेवटी वाजता उठलो आणि आवरायला घेतले वाजता आम्ही सगळे धायरी फाट्याला भेटणार होतो. गाडीच्या जास्तीच्या चाव्या exchange करणार होतो. जर ट्रेक च्या वाटेवर दोन्ही ग्रुप ची चुकामुक झालीच तर बॅकअप keys दोन्ही ग्रुप कडे असाव्यात. मोबाइलला range मिळेलच याची खात्री नव्हती तेंव्हा दोन्ही ग्रुप चे Co-ordination हे एक मोठे आव्हानच होते. दुर्दैवाने मला ऑफिस मधून यायला उशीर झाल्यामुळे गाडीची जास्तीची किल्ली शोधायला वेळ मिळाला नाही. त्यात सकाळी पाषाण वरून यायला अवधूत ला थोडा उशीर झाला. शेवटी सुशील एक ग्रुप घेऊन पुढे मार्गस्थ झाला

         अवधूत येताच आम्ही सुद्धा निघालो. अर्धातास उशीर झाला होता.  या आधी गुंजवणे मार्गे राजगड बऱ्याच वेळा केला होता, पण पाली दरवाजाचा मार्ग माहित नव्हता. मार्गासनी चिरमोडी गावातून गुंजवणे फाट्याला वळता आम्ही सरळ पुढे गेलो. तांबडे फुटले होते. सूर्याच्या किरणांनी अंधार भेदून सगळीकडे लख्ख प्रकाश पसरवला होता. गुंजवणी नदीवरच्या  पुलावरून जाताना संथ वाहणाऱ्या पाण्यावर सकाळची किरणे चमकत होती. नानाप्रकारचे पक्षी कुंजन करत होते. सकाळची शांतता आणि दूरवर मंदिरात चालणाऱ्या भजन किर्तनाचे सूर मनाला स्थिरता देता होते. सकाळपासून चाललेली धावपळ आम्ही क्षणार्धात विसरलो आणि निसर्गाशी समरस झालो. रात्रभर भजन किर्तन करून वाजेघरला मॉर्निंग वॉक करत घरी निघालेले एक आजोबा भेटले. त्यांना आम्ही लिफ्ट दिली आणि त्यांनी आम्हाला रस्ता सांगितला. टाळ मृदूंगाचा आवाज त्या पंचक्रोशीतील वातावरण मंगलमय करत होता. खाटपे वाडी मध्ये एका शाळेच्या आवारात असलेला आऊसाहेबांचा आणि शिवरायांचा पुतळा जणू आम्हाला आशीर्वादच देत होता. त्यांना नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. पाली गावात पोहोचल्यावर गाडी लावली आणि सुमारे : ३० ला आम्ही ट्रेक सुरु केला. पुढची वाट कठीण असल्यामुळे राजगड चढण्यासाठी सोपा मार्ग निवडला होता. सुमारे एक तास १५ मिनिटात आम्ही वर पोहाचलो. दरवेळेस पद्मावती माची, बालेकिल्ला, सुवेळा माची, हत्तीचे नेढे पहिले होते पण हि बाजू माझ्यासाठी नवीन होती. गडावर बरेच पुनर्बांधणीचं काम झालेले दिसले. जुने बुरुज, तटबंदी, पाली दरवाजा अजूनही सुस्थितीत आहेत.थोडे Photo Session केल्यावर आम्ही वेळ ना दवडता संजीवनी माची कडे कूच केले. वाटेत कातळावर लागलेली मधमाशांची पोळी दिसली. जणू आजही ती स्वराज्याच्या रक्षणासाठी तत्पर असावीत. तिथे जास्त वेळ ना घालवता आम्ही निमूटपणे पुढे  सरकलो आणि संजीवनी माचीवर पोहोचलो. तिथे उंचीवर असलेल्या एकमेव झाडाखाली आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. जवळ असलेली चिक्की , राजगिरा वडी, बिस्कीट असे किरकोळ खाऊन आम्ही लगेच चालायला सुरुवात केली. सळसळणाऱ्या नागिणीप्रमाणे भासणारी संजीवनी माची हि खरोखरच मराठ्यांच्या स्थापत्यकलेचा एक अद्भुत अविष्कार. बुरुजांना अनुक्रमे नंबर दिले आहेत. माचीवरून प्रत्येक बुरुजावर खाली उतरण्यासाठी अरुंद किंवा खुफिया वाटावे असे जिने काढले आहेत. आणीबाणीच्या वेळी गडावर पाणी कमी पडू नये म्हणून माचीच्या मधोमध टाकी (Water cisterns) बांधलेली आहेत. (आपण यालाच आजकाल Rainwater  harvesting म्हणतो). माचीच्या मुख्य तटबंदीला लागून आत अजून एक तटबंदी बांधलेली आहे आणि या दोन्ही संरक्षक भिंतींमध्ये जवळपास १० ते १५ फूट खोल जागा सोडली आहे. याच नेमका उद्देश काय असावा हा इतिहासकारांच्या अभ्यासाचा भागव्याघ्रमुख नावाच्या बुरुजावरून आम्ही आपापले DP  साठी लागणारे छायाचित्र टिपले आणि तोरण्याची वाट धरली

            आमच्या आधी ट्रेक सुरु करणाऱ्या दुसऱ्या ग्रुप ची काहीच खबरबात नव्हती. आम्ही संजीवनी माची उतरून खाली आलो तेवढ्यात देवजाणे पण कशी काय मोबाइल ला range आली आणि मला सुशील चा फोन आलाझुंजार माची, मेंगाई देवी मंदिर, रडतोंडी बुरुज, कोकण दरवाजा हे सर्व करून त्यांनी तोरणा उतरायला घेतला होता. त्यांची तोरण्याची बुधला माची उतरून झाली होती. जवळपास दोन्ही ग्रुप चा वेग सारखाच होता

           वाजले होते १०: २६ आणि आता मात्र ऊन जाणवू लागले होते. अजून सूर्य माथ्यावर यायच्या आत आम्हाला जास्तीत जास्त अंतर कापायचे होते. थोडीशी पोटात भर गेल्यामुळे आणि सुरुवातीला बऱ्यापैकी झाडी असल्यामुळे आम्ही वेग कायम ठेवू शकलो. थोडेसे सपाट अंतर चालल्यावर चढाई करताना जीवावर येत होते पण थोडे उंचावर गेले कि गार वाऱ्याची झुळूक येई आणि सारा थकवा निघून जाई. ऊन वाऱ्याच्या या खेळामध्ये मजा येत होती. घार, गरुड असे उंचीवर उडणारे पक्षी जणू वरूनच आमची टेहळणी करत होते कारण आम्ही त्यांच्या इलाख्यामध्ये प्रवेश करत होतो. पण आजूबाजूला उडणारे नानाविध प्रकारचे बुलबुल, खंड्यावेडा राघु, त्यासारखे अनेक छोटे पक्षी त्यांच्या आवाजाने आमचे आदरातिथ्य करत होते. काळ्या जांभळ्या रंगाचे पंख घेऊन गुणगुण करणाऱ्या भुंग्यांना मात्र आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. ते आपले त्यांच्या सकाळच्या कामात व्यस्त होते. मजल दरमजल करत आम्ही भुतोंडे खिंडीत उतरलो जिथे आम्हाला डांबरी रस्ता लागला आम्ही वेल्ह्याच्या वेशीपाशी पोहोचलो. काही स्थानिक लोकांकडून रस्ता बरोबर असल्याची खात्री करून आम्ही पुन्हा प्रवास सुरु केला. क्षणभर विश्रांती हि पुढील मैल भर अंतर कापण्यासाठी लागणारी ऊर्जा आम्हाला देत होती. वाटेत एक मंदिरासारखे दिसणारे घर लागले. पण तिथे कोणीच नव्हते त्यामुळे थंडगार पाणी मिळायच्या आमच्या आशा धुळीस मिळाल्या. पण सुदैवाने झाडी भरपूर घनदाट होतीत्या शीतल छायेत आम्ही बरेच अंतर कापून काढले. वाटेत काही म्हसोबासारखे शेंदूर लावलेले दगड दिसले. कडेला साडीसारखे कापड असल्यामुळे देवी होती का म्हसोबा हे सांगणे जरा अवघडच आहे. बाजूला असलेल्या चुलींवरून कदाचीत प्रसाद सुद्धा तिथेच शिजवला जात असेल. नक्की कोणत्या देवाची आणि कसल्या प्रकारची पूजा होत असेल तिथे याचा काही अंदाज बांधता येईनापण विश्रांतीसाठी आम्ही मात्र ती जागा निवडली होती. तिथून थोडेच पुढे गेल्यावर एक गावकरी कुटुंब भेटले त्यांनी आम्हाला तोरण्याकडे जायचा मार्ग सांगितला. वाटेत पाण्याचे एक टाके होते पण त्यातील पाणी पूर्णपणे आटले होते

        इतक्यात आम्हाला सुशील आणि इतरांचा आवाज ऐकू येऊ लागला. आवाज दिल्यावर आणि आवाजांचा कानोसा घेत गेल्यावर शेवटी आम्हा दोन्ही ग्रुप ची गाठभेट झाली. गाडीच्या चाव्या एकमेकांना देऊन आणि एकदोन छयाचित्रे काढून आम्ही आपापल्या पुढच्या गडांकडे मार्गस्थ झालो. दुपारचं रणरणतं ऊन आता भाजून काढत होते. सकाळसारखा वेग कायम ठेवणे आता जड जात होते. एक दीड तासावर बुधला माची दिसत होती. तोरणा आता आवाक्यात आला होता पण सकाळपासून चालून चालून पाय थकले होते. वाटेत लागणारी झाडी संपली होती. बोडके डोंगर आणि वाळलेली गवते या व्यतिरिक दूरदूर पर्यंत काहीच दिसत नव्हतं. सकाळसारख्या अधूनमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या झुळुका सुद्धा आता येत नव्हत्या. कोणीतरी अग्नीने मंतरलेले बाण आम्हाला मारतंय असे वाटत होते. उन्हाच्या झळांमुळं भोवळ आल्यासारखे होत होते पण सावलीसाठी एकही झाड तिथं नव्हतेआजचा सकाळचा नाश्ता पण यथातथाच होता आणि आता मात्र भुकेने पोटात कावळे ओरडायला लागले होते. पोटात काहीही नसल्यामुळे ऍसिडिटी झाली होती

         विजय आणि अवधूत उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी पटापट पुढे निसटले. आणि मागे राहिलेल्या मला एकट्याने ते थोडे राहिलेलं अंतर कापणे एक मोठे दिव्य दिसू लागले. हत्ती गेला होता पण शेपटासाठी माझं घोडं पेंड खात होतं.  सुदैवाने माझ्याकडे पुरेसे पाणी होते, पण सतत पाणी पिऊन सुद्धा काही उपयोग होत नव्हता कारण पोटात अन्न नव्हते. उष्माघातामुळे मला सतत उलटी झाल्यासारखे होतं होते. पायाला cramp येत होते. संपूर्ण रस्त्यात कुठेच पाण्याची सोया नसल्यामुळे लोकांना पाणी कमी पडते. पण मी मात्र सढळ मुखाने पित्तयुक्त पाण्याच्या उलट्या करत चाललो होतो. Dehydration होऊ नये म्हणून परत पाणी प्यायचो. परत पाणी ओकायचो. थोड्यावेळाने बघतो तर विजय आणि अवधूत माझ्या नजरेच्या टप्प्यात दिसेना मग मात्र मला सगळं अवघड दिसू लागले. एक क्षण थांबलो. गेल्या दोन वर्षात केलेले सगळे अवघड ट्रेक आठवले आणि एक निश्चय मनाशी घट्ट केला कि काहीही झाले तरी अर्ध्यात सोडता येणार नाही. आपल्याला हळूहळू का होईना पण चालत राहिले पाहिजे. शिवरायांच्या पुतळ्याला केलेला नमस्कार आशीर्वाद रुपी धावून आला कि काय देव जाणे पण कसेतरी करून मी अवसान गोळा केलं आणि बुधला माचीच्या बुरुजापर्यंत पोहोचलो. वरून एका माणसाने मला आवाज दिला आणि बुरुजाच्या इथे सावलीला यायला सांगितले. पण उन्हाने तापलेला कातळ चढुन जाणे फार फार जिकिरीचे होत होते. कसातरी जीव एकवटला आणि  सरतेशेवटी मी वरती पोहोचलो. तिथे विजय आणि अवधूत बसले होते, त्यांना पाहून मला जरा हायसे वाटले. लिंबू सरबत पिऊन थोडी विश्रांती घेतल्यावर मला जरा तरतरी आली

           पण पुन्हा तेच झाले बुधला माचीवरून रडतोंडी बुरुजाकडे जाताना पुन्हा मी मागे पडलो आणि थोडीशी वाट भटकलो एका कातळावर विनाकारण चढलो आणि एका माकडाच्या टोळीने माझे गुरकावुन माझं स्वागत केलेखाली पहिले तर रेलींग लावलेली पायवाट होती पण माकडांच्या घेरावामुळे मला खाली उतरणे कठीण झाले होते. थोडे धारिष्ट्य करून मी एक दगड हातात घेतला आणि तो भिरकवण्याची  action करून त्यातल्या मोठ्या माकडाला घाबरवलं. तसे तो सगळा त्याचा कुटुंबकबिला घेऊन पुढे सरकला. आणि त्यानंतर लोक गुरे हाकतात तसे मी माकडे हाकत हाकत बरेच अंतर कापलेकसातरी करत मी रडतोंडी बुरुजावर पोहोचलो आणि पायरीवर स्वतःला झोकून देऊन लोटांगण घातले. रडकुंडीला आलेल्या मी त्या बुरुजाचे नाव सार्थ केले होते.  बुरुजाच्या उंचीमुळे तिथे सावली होती आणि थंड वारा देखील येत होता. थोडाआराम झाल्यावर मेंगाई देवीच्या मंदिरापाशी असलेल्या आजींकडून आम्ही ताक, सरबत प्यायलो. Acidity झालेल्या पोटाला थोडी काकडी खाऊ घातली. घामामुळे चेहऱ्यावर जमलेल्या मिठाचा थर गार पाण्याने तोंड धुतल्यावर निघून गेला आणि आम्ही ताजेतवाने झालो. वाजले होते दुपारचे . २०. माझा आत्मविश्वास वाढलेला पाहून आम्ही गडउतार झाल्यावरच जेवायचे ठरवले. दोन Rock Patch आणि सगळा उतार मी झपाझप उतरलो. कॉंक्रिट चा रस्ता लागल्यावर मला जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करता येणार नाही

               खडतर प्रवास करून, संकटांवर मात करून नंतर मिळणार यश क्षणभर  जरी असले तरी त्यातून मिळणारा आनंद हा दीर्घकाळ टिकणारा असतो. सुशील ची गाडी घेऊन आम्ही निघालोखाली गावात गेल्यावर आम्ही मनोसोक्त जेवलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. सुशील चा message आला होता. शिवेंद्र चा बूट फाटल्यामुळे थोडा उशीर होत आहे. तरीसुद्धा एक अर्ध्यातासाच्या अंतराने शिवापूरच्या टोलनाक्यावर आम्ही सगळे भेटलो, एकमेकांची विचारपूस केली आणि  पुन्हा गाड्यांची अदलाबदली करून ट्रेक ची सांगता केली         




 



---वैभव
फक्त नावात





Tuesday, July 24, 2018

दुधसागर

दुधसागर ....

(फेसाळणाऱ्या शुभ्र पाण्याचा अस्मानी धबधबा कि जणु दुधाची गंगा जी भगीरथाने पृथ्वी वर आणली)

        पावसाळा आला कि सगळे जण ट्रेकर्स होतात,  रस्त्यावर तुडुंब गर्दी, रस्त्याला खड्डे, आणि  धबधब्यावर दारू पिऊन हुल्लडबाजी करणारे टोळभैरव या पेक्षा वेगळे चित्र नसते. हिरवागार  शालू नेसलेली वसुंधरा, धुक्याची चादर या सगळ्या निसर्गकवींच्या कल्पना आहेत ज्या आपण इंस्टाग्राम, फेसबुक वर फोटोंमध्ये पाहू शकतो.

          मागील वर्षी खूप ट्रेक्स केले पण धबधबा राहिला होता. दुधसागर ची सगळी माहिती काढली आणि या वेळेस जायचे ठरवले.  ट्रेन नि जायचे असल्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक मध्ये अडकण्याचा प्रश्नच नव्हता.   २१ जुलै २०१८, शनिवारी गोवा एक्सप्रेसनी  निघालो.  पहाटे ३ वाजता चा अलार्म लावून झोपलो पण झोप लागत नव्हती बाहेर धो धो पाऊस कोसळत होता.  शेवटी CastleRock स्टेशन वर Announcement ऐकली. दुधसागर ला जाण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरणाऱ्या लोकांना  कायदेशीर ताकिद होती. पण आता येईल त्या संकटाला तोंड द्यायची तयारी झाली होती. बरोबर Explorers चे अनुभवी ट्रेक लीड्स तुषार आणि आदित्य होते.  बरोबर रोप, हार्नेस, कॅराबिनर इत्यादी सर्व सेफ्टी gears होते त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नव्हते. Solaneum सर्विस स्टेशन वर गाडी २० सेकंड थांबली, तेवढ्यात तयारीत असलेले आम्हीसगळे जण खाली उतरलो. ट्रेन निघून पुढे गेली. आमच्या बरोबर अजून हि काही ग्रुप्स उतरले होते जे मोठ्या संख्येने आले होते. आमच्या मध्ये एक वयस्कर  काका होते ज्यांची कदाचित ट्रेक आणि ट्रिप या मध्ये गल्लत झाली होती आणि ट्रॉली वाली ट्रॅव्हल बॅग, छत्री आणि एका पिशवीत पाण्याची बाटली आणि लक्ष्मी नारायण चिवडा  घेऊन काका आमच्या बरोबर उतरले. त्यांची जय्यद तयारी पाहून आमच्या पोटात गोळा आला, आणि या पावसात आपले हाल होणार आहेत याची कल्पना आली, पण मनाचा निर्धार ठाम होता कि कुठल्याही संकटाला तोंड देऊ पण दुधसागर चा ट्रेक करू .

          गर्द अंधारात टॉर्चच्या साहाय्याने आम्ही ट्रॅक वरून  खाली गावात उतरलो नाश्ता करण्यासाठी ठरवलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि उजाडायची वाट पाहू लागलो. कोंबड्याने बांग दिली आणि तसा  रात्रीचा अंधार विरत गेला,  थोडेसे दिसू लागले होते पावसाचा जोरही ओसरला होता.

               प्राथमिक सूचना तुषार कडून मिळाल्यानंतर आम्ही दुधसागर कडे निघालो. वाटेत काही वेली  झाडावरून खाली आल्या होत्या ज्या भयंकर काटेरी होत्या. एक दोन जखमा झाल्यानंतरच  त्या अलगद कशा बाजूला करायच्या ह्याचे कौशल्य विकसित होत होते. वाटेत जळवा अंगावर चढायची भीती होती. तुषारच्याच पायावर सर्वप्रथम जळु लागल्यामुळे मीठ टाकून तिला कसे अलगद बाजूला करता येते याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले. आता आम्ही सगळे अगदी Trained झालो होतो, आत्मविश्वास वाढला होता. आणि काकांची ओली झालेली बॅग उचलायला पण आमच्यात उसने अवसान आले होते.

              आणि परीक्षेची वेळ आली, जंगलामधील एक ओढा पार करून आम्हाला जायचे होते.  रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे धबधब्याच्या पाण्याची पातळी आणि वेग वाढत होता आणि त्यामुळे ओढा पार करणे कठीण जात होते. थ्रिल वाढत होते आणि तरुणांचा उत्साहसुद्धा, पण कमकुवत मनाच्या आणि जरा वयस्कर माणसांची कढी  पातळ होत होती. आरडा ओरडा करत काही स्थानिक गावकरी, तुषार आणि आदित्य यांनी रोप च्या साहाय्याने ५ , ६ जणांना ओढा पार करून दिला पण त्यानंतर गणित अवघड झाले, पाण्याचा वेग प्रचंड वाढला आणि तुषार नि दुसऱ्या सोप्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला.  काही जणांचा हिरमुड झाला. पावसात वॉटरप्रूफ कव्हर मध्ये घातलेल्या मोबाइल नी  फोटो काढायची नामी संधी आम्ही दवडली होतो. पुन्हा वर आलो आणि पुढे चालू लागलो. पुन्हा तोच ओढा पण इथे जरा पाण्याचा वेग कमी होता आम्ही तत्परतेने दोरी बांधली आणि एका मागून एक पलीकडे गेलो.  काकांचा एक बूट वाहून गेला आता मात्र आम्ही त्यांना तिथेच थांबायचा सल्ला दिला आणि त्यांनी तो ऐकला.  जाताना आधारासाठी थांबलेल्या ४-५ जणांनि सर्व शक्ती पणाला लावली आणि महाभारतातल्या अरुणी ची गोष्ट आठवून दिली. आमचा आत्मविश्वास दुणावला आणि संकट हे तोंड दिल्यावर ते परत जाते हे पक्के झाले.

         आता थोडेच अंतर राहिले होते, View  पॉईंट ला जवळ जवळ पोहोचलोच होतो. जाता जाता दुधसागर चे अर्धवट दर्शन घडत होते त्याला छायाचित्रात टिपण्याची आम्ही संधी सोडणे शक्यच नव्हते. शेवटी View पॉईंट ला गेल्यावर आमचे डोळे दिपून गेले. डोंगर माथ्यावर धुक्याची चादर पसरलेली होती.  आकाशात कृष्ण मेघांची गर्दी झालेली आणि त्यांना बाजूला सरकावुन आपली किरणे पसरवण्याची सूर्यनारायणाची निरर्थक धडपड चालू होती.
काही तुरळक किरणे इमाने इतबारे प्रकाश  पसरवण्याचे काम करत होती. डोंगरावरून प्रचंड वेगाने कोसळणारा धबधबा उरात धडकी भरवत होता. कड्या कपाऱ्यातुन वाट काढत अनेक क्षीर रांगा धरणी मातेकडे झेपावत होत्या. दूधसागर चे हे फेसाळणारे वेगळे दूध पाहायला मिळाले ज्याचा उंच शिखरावर पान्हा फुटला होता आणि धरणी मातेची क्षुधा शांत करण्यासाठी वेगाने खाली सरसावत होता.

           खळखळणारे पाणी गर्जना करत खाली येत होते आणि हिरव्या निसर्गाच्या सौन्दर्यात भर घालत होते. त्यातून उडणारे धवल तुषार पुन्हा एकदा धुक्यात मिसळू पाहत होते. हे नयनरम्य दृश्य फोटो काढून चोरायचा आम्ही शिताफीने प्रयत्न करत होतो पण निसर्गाने सगळी कडे सेफ्टी डोअर्स लावले होते. तिथे असलेल्या माकडांनी आम्हाला  सळो की पळो  करून सोडले. कोणची पिशवी ओढ, कोणाला गुरगुरूंन  भीती दाखव या आणि अशा नाना प्रकारांनी आम्हाला तिथून हुसकावून लावायचा त्यांनी प्रयत्न केला.  पण शेवटी आम्ही त्यांचीच सुधारीत आवृत्ती होतो आणि फोटो काढल्याशिवाय तिथून हलणार नव्हतो. शेवटी सेल्फी, सोलो, ग्रुप असे सगळे फोटो सेशन झाल्यावर आम्ही निघालो.

            पावसाचा जोर वाढला होता. दुधसागर अजूनच अक्राळविक्राळ होत होता. त्याचे विराट रूप मनामध्ये,  कॅमेऱ्यामध्ये साठवून आम्ही परतीच्या  वाटेला  लागलो. परत आम्ही ओढ्यापाशी आलो.  काका आमची वाट बघून कंटाळलेले होते. अजून एक ग्रुप आम्ही लावलेल्या दोरीला धरून पलीकडे जात होता. त्यांचे लीडर्स आता अरुणी झाले होते. त्यांचा एकंदरीत पेहराव बघता ते प्रोफेशनल वाटत नव्हते, पण ग्रुप मोठा  होता आणि रात्री पासून पावसात भिजल्यामुळे आता लवकरात लवकर परतीची गाडी पकडायची घाई झाली होती. पाऊस कोसळत होता क्षणाचीही उसंत न घेता. अजून थांबलो तर पाणी वाढेल आणि आपण इथेच अडकून राहू  या भीतीने सर्व ग्रुप चे लीडर्स आपापल्या परीने लवकर ओढा ओलांडायला सांगत होते.  आणि अचानक एका मुलीचा  पाय घसरला, तिच्या ग्रुप च्या लीडरने सर्व शक्ती पणाला लावून तिला उभे करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याही पायात बूट नसल्यामुळे तो जास्त वेळ तग धरू शकला नाही आणि त्याचा हि पाय घसरला. या सर्व प्रकारामुळे दोरी वर असलेल्या इतर लोकांवर ज्यादा ताण आला आणि त्यामुळे एकच कोलाहल माजला. पलीकडे उभा असलेला आमचा लीडर तुषार हा सर्व प्रकार पाहत होता त्याने तत्परतेने Tapesling ला लावून कॅराबिनर अडकवून तो मैदानात (पाण्यात) उतरला.  तो कॅराबिनर दोरीला अडकवणार एवढ्यात पाण्याचा वेग अचानक वाढला आणि एक जण त्या अरुणी लीडर्स च्या भिंतीला भेदून निसटला. एका क्षणात तो पार कोसभर लांब वाहून गेला. हा सगळा  प्रकार पाहून भीती चे वातावरण पसरले आणि दोरीवरील सगळ्यांचे पाय घसरू लागले.  एक, दोन करता करता बरेच जण वाहून जायला लागले. आम्ही मुख्य प्रवाहाच्या कडेला उभे राहून काळाने चालवलेली क्रूर चेष्टा पहात होतो. हळहळ करत होतो. एवढ्यात तुषारचा हि पाय घसरण्याच्या  बेतात होता. त्याची धडपड बघून आमच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानी मोठ्या धैर्याने स्वतःचा तोल सावरत कसे तरी करून कॅराबिनर दोरीला अडकवला आणि आमच्या जिवात जीव आला. सैल झालेला दोर झाडावरून काढून पुन्हा घट्ट बांधणे शक्य नसल्यामुळे रस्सीखेच केल्यासारखी आम्ही ती ओढून ताठ ठेवायचा प्रयत्न करु लागलो.

             एवढ्यात अंकित च्या मानेवर जळू चढली होती. पण आणलेले मीठ तुषारच्या बॅगमध्ये ओढ्याच्या पलीकडे होते. काय करावे सुचेना. तेवढ्या काही लोकांनी प्रसंगावधान राखून चुना काढला आणि त्याच्या मानेवर लावला तशी जळू खाली पडली. गायछाप खाणाऱ्या लोकांचा मना पासून राग येत असला तरी आज त्यांनी लावलेला चुना कामी आला होता.

           एवढ्यात पुढून कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला तसे गावातले स्थानिक लोक पाण्यात पळत सुटले त्यांना असे पळताना पाहून आम्ही अजून गडबडलो कारण समजत नव्हते कि अपघात होऊन गेलाय आणि आता Rescue Operation सुरु झालंय. १५ मिनिटांनी ते एका मुलीला घेऊन बाहेर आले. ती प्रचंड भांबावलेली  होती. सकाळ पर्यंत चढत्या क्रमाने वाढणारा आमचा आत्मविश्वास आता उतरता क्रम ना घेता थेट शून्यावर आला होता. पाऊस थांबत नव्हता. आम्ही उभे असलेल्या जागेवर आता पाणी साचू लागले होते. आत्ताच काही तरी प्रयत्न केले तर ट्रेन मिळेल अथवा जंगलात आणि या पाण्यात आपला काही टिकाव लागणार नाही याची खात्री झाली. काटेरी वेली, जळवा, पाऊस, चिखल, हुसकावणारी माकडे  हि वास्तविक पाहता संकटे नव्हती तर निसर्गाची सूचना होती. पण माणसाचा उन्मत्तपणा ऐकायचे नाव घेत नव्हता. असे वाटत होते कि दूधसागर गर्जना करून सांगतोय "चालते व्हा". पण इकडे आड नि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. रात्री पासून पोटात काही नव्हते; वाजले होते सकाळचे ११. शेवटी तुषार ने निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्यांनी डोंगर चढून रेल्वे ट्रॅक नि जायचे ठरवले.  आदित्य ला ओढ्यातून परत पाठवण्यात आले. आदित्य आमच्यात आल्यावर आम्हाला थोडे हायसे वाटले.

                 आम्ही इतर ग्रुप आणि आदित्य बरोबर उलटे चालू लागलो घनदाट झाडीतून काटेरी वेली चुकवत पोटाची भूक विसरून आम्ही चढू लागलो.  एक अर्ध्यातासामध्ये आम्ही रेल्वे ट्रॅकवर  लागलो. या सगळ्या प्रकारामुळे आमचे अंदाजे ३. ५ किमी अंतर वाढले होते. रेल्वे येताच बाजूला उभे राहून अधून मधून फोटो काढत मजल दरमजल करत आम्ही ज्या गावातून ट्रेक सुरु केला होता त्या गावात खाली उतरलो. सकाळच्या नाश्त्यासाठी सर्व ग्रुप ची एकाच ठिकाणी झुंबड उडाली होती. त्यांना सर्वांना नाश्ता देणे आणि त्याचा हिशेब ठेवणे त्या बिचाऱ्या गावातल्या हॉटेल मालकाला जिकिरीचे जात होते. शेवटी आम्ही नाश्ता वगळून थेट कुळें स्टेशन
ला जेवायला जायचे ठरवले, पण एकमत होईना शेवटी काहींनी तसेच पावसात पोहे पोटात कोंबले आणि चहाचे एक दोन झुरके मारले. पुन्हा प्रवास सुरु झाला. आता मात्र रात्रभर पायात असलेले ओले बूट सहन होत नव्हते आणि पायात गोळे यायला लागले होते.  त्यात पुन्हा रेल्वेच्या रुळांवरुंन  चालताना गुढघ्याच्या वाट्या कराकरा वाजत होत्या. घामेजलेल्या, ओल्या कपड्यांचा वास सहन होता नव्हता आणि रस्ता आमचा अंत बघत होता. कसे तरी करत आम्ही "कुळें"  स्टेशन  ला पोहोचलो तिथे वनाधिकाऱ्यांनी आमची चौकशी सुरु केली.

           सुदैवाने आम्ही आवश्यक ती वनविभागाची परवानगी आणि तिकिटे काढलेली होती. आदित्य ती घेऊन आला. थोडी चुकामुक झाली आहे अशी कारणे देऊन आम्ही तिथून निसटलो. जे ३ लोक हरवले होते ते आमच्या आधी इतर ग्रुप बरोबर अंबिका हॉटेलवर पोहोचले होते. अंबिका हॉटेलवर आधी पोटभर जेवलो तेवढ्यात तुषार हि पोहोचला आणि आमची संख्या पूर्ण झाली.  सरते शेवटी पांडुरंगाच्या कृपेने आम्ही वेळेत परतीच्या गाडीत बसलो आणि आषाढी एकादशीला आपापल्या घरी माऊलीच्या दर्शनाला पोहोचलो.         
          
              हा ब्लॉग लिहिण्यामागे कारण एवढेच कि हा प्रसंग कधीही येऊ शकतो आणि कोणावरही. दुधसागर ह्या धबधब्या  जवळ जाण्यास सरकारने मनाई केली आहे ती या अशा प्रकारच्या भूतकाळातील प्रसंगानं मुळेच. निसर्गाचे सौंदर्य बघण्यात मजा घ्यावी पण कळपाने जाऊन माणसाची झुंडशाही तिथे चालणार नाही हे ध्यानात ठेवावे.  एका फटक्यात निसर्ग आपल्याला लोळवु शकतो. त्याचा आदर करण्यातच सर्वांचे भले आहे.

    या सर्व प्रकारातून एक धडा मिळाला संकटाला तोंड हि देता आले पाहिजे आणि वेळप्रसंगी पाठसुद्धा दाखवता आली पाहिजे. म्हणतात ना "सर सलामत तो पगडी पचास "! तुषार च्या प्रसंगावधानाला आणि साहसाला सलाम. Explorers च्या टीमने  योग्य वेळी योग्य निर्णय घेतले म्हणून सर्व जण सुखरूप घरी येऊ शकलो.

         बाकी ट्रेकिंग करत राहा, नवीन आव्हाने घेत राहा. त्याशिवाय कळणार तरी कसे तुम्ही नक्की कोणत्या परिस्थितीत आणि कोणाला घाबरता !!!

वैभव कुलकर्णी -- ट्रेककथा सदरासाठी 
फक्त नावात  













       

Saturday, February 3, 2018

अलंग मदन कुलंग ....AMK

           
         ट्रेकिंग ची आवड होती पण दुर्गभ्रमंतीचे मागच्या वर्षांपासून व्यसन लागले  होते. जानेवारी २०१७ मध्ये वासोटा केला आणि तिथून प्रवास सुरु झाला .  प्रत्येक महिन्यात एक ट्रेक करायचा असा संकल्प होता पण निसर्गात रममाण व्हायचे व्यसन फारच जहरीले होते. हा हा म्हणता वर्षभरात २३ किल्ले फिरून झाले . अलंग मदन कुलंग या सह्याद्री मधील सर्वात कठिण ट्रेक पूर्ण करून मी पंचवीस किल्ले पूर्ण करणार होतो. Excitement खूप होती आणि सोबतीला Explorers ची टीम होती. २६ जानेवारी  ची जोडून सुट्टी आली होती  आणि तीन दिवस होते फक्त गड किल्ले, निसर्ग, रानवाटा, कातळ,  घामाच्या धारा,  टाक्यातलं ,थंडगार पाणी आणि नवीन मित्र .

         २५ जानेवारीला  पुण्यावरून निघालो.  काही उत्साही मंडळी हैदराबाद वरून या ट्रेक साठी आली होती. दोन दिवसाचा दुपारच्या जेवणाचा डबा आणि गिर्यारोहणाची लागणारे साहित्य सॅक मध्ये भरून आम्ही पूर्वतयारी पूर्ण केली आणि रात्री १२:०० वाजता बस ने निघालो . सकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही उदडवणे गावात पोहोचलो जास्तीचे सामान गाडीत काढून ठेवले तरी सॅक काही हलकी होईना. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा गावातली शाळेची मुले झेंडावंदनासाठी आली होती. २६ जानेवारीच्या निमित्त देशभक्तिपर गाणी लागली होती. शेवटी आळस झटकून मनाची तयारी केली आणि सगळे ओझे पाठीवर चढवले.  घाटघर मार्गे अलंग ला जाता  येते त्या मार्गावर आल्यावर आम्ही सर्वांची एक तोंडओळख करून घेतली आणि ८ वाजता ट्रेक ला सुरुवात केली. एक अर्ध्यातासात थोडे वर चढून पठारावर पोहोचलो जिथून विस्तीर्ण घाटघर धरणाचा नजरा दिसत होता आणि तसेच पुढे किती चालायचे आहे त्याचा अंदाज आला. तिरंग्यासोबत थोडे  फोटो सेशन झाल्यावर  पुढे मार्गक्रमण केले.  




            सह्याद्री मधील कळसुबाई डोंगररांगामध्ये वसलेले अलंग मदन आणि कुलंग हे  त्रिकुट तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस  पहाते. घनदाट जंगल आणि विरळ लोकवस्ती  या मुळे  हे अजूनच दुर्गम वाटतात. नुकताच मकर वृत्तात प्रवेश केलेला सूर्य आता त्याची  ओळख नव्याने करून देत होता. साडेदहा वाजता आम्ही जंगलात  दगडावर बसून जेवण  केले. आम्रखंडाने चांगलीच झोप आणली होती पण थांबून चालणार नव्हते. कातळ तापू लागला होता आणि त्यावर चढाई करणे हि जिकिरीचे होत होते.  Rock Patch  संपवून वर आल्यावर सह्याद्री च्या डोंगर रांगांचे विराट रूप पाहावयास  मिळाले अलंग मदन आणि कुलंग यांची शिखरे दिसली. आणि सुरु झाला ३ ते ४ किमी चा डोंगर कपारीतला मार्ग. तो संपवून आम्ही दुपारी ३: ३० पर्यंत अलंग वर पोहोचलो. अलंगवर २ मोठ्या  गुहा आहेत. ४० लोकांची इथे  निवांत  झोपायची सोय होऊ शकते.  थोडा आराम करून आम्ही संध्याकाळी अलंग फिरायला निघालो. गावातील local guide भाऊ गिरे आमच्या बरोबर होते  त्यांनी आधीच सरपणाची सोय केली होती. आलं  घालून केलेल्या चहाने तरतरी आणली आणि दिवसभराचा क्षीण कुठच्याकुठे पळून गेला.

चहा आणि बरंच काही !!!

            अलंग ची उंची अंदाजे ४५०० फूट आहे.यादवकालीन या गडांचा इतिहास तसा अज्ञात आहे.  गडावर १० पाण्याची टाकी , एक शिव मंदिर,  काही शिलालेख आणि किल्ल्याचे अवशेष आहेत किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर फेरफटका मारल्यानंतर, आम्ही मावळत्या दिनकाराला निरोप देण्यासाठी जमलो. अवकाशात पसरणारी किरणे, मंद होत जाणारी सूर्याची तीव्रता आणि संध्याकाळचा संधिप्रकाश याची संधी साधून सर्वांनी  आपापली Fb , Insta, वॉट्स app ची छायाचित्रे टिपली. हवेत गारवा जाणवू लागला होता. ८ वाजेपर्यंत पुन्हा गुहेत परतलो तर अहो आश्चर्यम !!! पावभाजी तयार ???  Team Explorer च्या वेळेच्या नियोजनाबद्दल कधीच शंका नव्हती पण हि तत्परता खरंच वाखाणण्याजोगी होती. पावभाजी, गुलाबजाम, पापड असे यथासांग जेवण करताना सर्वांनी आडवा हात मारला. त्यानंतर थोडा वेळ अंताक्षरी चे सूर डोंगरदऱ्यात गुंजले आणि मग आम्ही झोपायला गेलो.

शिलालेख at अलंग 
             
अलंग वरील पाण्याची टाकं 


सरदारवाडा @ अलंग 





   
सूर्यास्त @ अलंग 
PavBhaji Preparation
          पहाटे  ३:३० वाजता  सर्वजण उपमा खाऊन मदनगडाकडे जाण्यासाठी निघालो. राष्ट्रकूट काळात १२व्या शतकात शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने हा अभेद्य किल्ला बांधला आहे.  पुढे आदिलशाही सरदार जसवंतराव दळवी यांच्याकडे हा किल्ला १६६१ पर्यंत होता. मोरोपंत पेशव्यानी हे सारे  किल्ले स्वराज्यात आणले. अलंग आणि मदन च्या मधील खिंडीत उतरताना rappelling करावे  लागणार होते. बरेच जण पहिल्यांदाच करत होते म्हणून वेळ लागणार होता. पण तरीही तांबडं  फुटायच्या आत आम्ही सर्वजण खाली उतरलो. आणि मदनगडाच्या दिशेने कूच केले. याची उंची ४९०० फूट आहे वरती जाण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. (Rock Climbing) . वर चढून  गेल्यावर काही पायऱ्या लागतात त्या उरात धडकी आणि पायात गोळे आणतात कारण एका बाजूने खोल कडा आहे. सकाळी ९ वाजता आम्ही मदनगडावर होतो. वरती पाण्याची दोन टाकी आहेत. गडावरून तुम्हाला अर्धचंद्रकोर दिसणाऱ्या अलंग गडाचे विहंगम दृश्य दिसते आणि तुम्ही त्याला कसा वळसा घेऊन इथपर्यंत आलात ते समजते. खाली उतरताना पुन्हा rappling करून आम्ही खाली आलो . त्या दिवशी आंनद सर आणि प्रीती मॅडम चा लग्नाचा वाढदिवस होता आम्ही डोंगरकपारीतच जेवणासाठी थांबलो होतो तेंव्हा Cake Cutting करून Anniversary Celebrate केली.  दोघांनीही आमच्या आग्रहाखातर उखाण्यात एकमेकांची नावे घेतली. आणि पुढचा प्रवास सुरु केला परतीच्या वाटेवर मागे वळून पाहता मदनगडावर असलेले नेढं लक्ष वेधून घेत होते. 
 कुलंग from मदन
अलंग from मदन 


    
            

                पाठीवरच्या ओझे वागवायची आता थोडी सवय झाली होती आणि तसे ते थोडे हलके हि होत चालले होते. पण कुलंग वर जाताना प्रत्येकी २ काठ्या सरपणासाठी न्यायच्या होत्या त्यामुळे पुन्हा एकदा ताकदीचा आणि सहनशक्तीचा कस लागणार होता. जाताना घनदाट जंगल होते, तिथे गावठी कडिपत्त्याचा वास दरवळत होता. रानवाटेने आम्ही कुलंग गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. २ दिवसाच्या भटकंतीने शरीर थकून गेले होते. पाय आता ऐकत नव्हते आणि लटपटायला लागले होते. हातातल्या सरपणाच्या काठ्या आता कुबड्यांचे काम करत होत्या. कुलंगगडाच्या पायऱ्या ह्या आमच्या मानसिक सामर्थ्याची परीक्षा होती. प्रत्येक पायरी वेगवेगळ्या उंचीची, आकाराची आणि नवीन आव्हानाची. सर्व जीव गोळा करून धापा टाकत आम्ही गडाचा दरवाजा गाठला. वरती डौलाने फडकणारा भगवा आम्हाला स्फुरण देत होता. खालून येणाऱ्यांना ओरडून प्रोत्साहन देत आम्ही सर्वांनी गड सर केला. गडाची उंची ४८२५ फूट आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास आम्ही वर पोहोचलो .


       गडावर एक मोठी आणि एक लहान गुहा आहे. सर्व सामान लावून झाल्यावर आम्ही गुहेच्या उजवीकडे असलेल्या पाण्याच्या टाक्यांवर गेलो . तिथलं थंडगार पाणी अंगावर घेताच आम्ही ताजेतवाने झालो. ही टाकी बर्‍यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे. इथे एक मोठा बुरुज आहे. तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन होते.

           गडाच्या पूर्वेला  तत्कालीन दुर्गस्थापत्यकलेचा अविष्कार पाहायला मिळाला. कातळात कोरलेला पाण्याच्या टाक्यांचा समूह इथे आहे.  इथलं पाणी अगदी पारदर्शक आणि सुमधुर आहे. येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे. थोडे पुढे गेल्यावर घळई मध्ये धबधब्याचे पाणी अडवण्यासाठी बंधारा घातलेला दिसतो. या बंधार्‍याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली दिसतात. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्‍यामधूनच एक वाट काढून दिली आहे. हे पाणी एका गोमुखातून खाली पडते आणि दरीत फेकले जाते. ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे. हा बंधारा पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकापाशी जायचे. येथून अलंग आणि मदनचे सुंदर दर्शन होते. दूरवर कळसूबाईचे शिखर आकाशाला गवसणी घालताना दिसते. पश्चिमेकडे रतनगड व बाजूचा खुट्याचा सुळका दिसतो. नाशिक मधील हरिहर, तसेच हा कुलंग. येथील स्थापत्यकलेने याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घातली आणि सर्व गडकोटांचा विध्वंस करणाऱ्या ब्रिटिशांना देखील याची भुरळ पडली. १८१८ च्या मराठ्यां बरोबरच्या लढाई नंतर इथे असलेली मार्कंडेय नावाची तोफ इंगंजानी वितळवली.    

 



      



               संध्याकाळी मसालेभात आणि शिरा असा बेत होता. मनसोक्त ताव मारल्यानंतर आमचा लगेच डोळा लागला. दुसऱ्यादिवशी निवांत गड  उतरायचा असल्यामुळे घाई नव्हती. सगळे निवांत उठलो आणि आवरून  नुडल्स चा ब्रेकफास्ट करून  आठवणीं ची शिदोरी घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. आंबेवाडीच्या दिशेने उतरून आम्ही खाली पोहोचतो तोच आमची बस तिथे पोहोचली होती. हातपाय तोंड धुवून ताजेतवाने होऊन आम्ही पुण्याला यायला निघालो. ३ दिवसाची एवढी दगदग करून सुध्या सगळे जण उत्साही होते. बसमध्ये छोटा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. कोणाचे काव्यवाचन झाले तर कोणी नाट्य छटा केली . गाणी लावून नाच झाला. ३ दिवसाच्या ट्रेकनं सर्वांना अशी काही ऊर्जा दिली होती कि ती बरेच दिवस पुरणार होती . त्यासाठी Team Explorer, सुनील सर, आनंद सर आणि सर्वांचे आभार मानावे तितके थोडेच.  

लवकरच भेटू पुढच्या ट्रेक ला !!!



वैभव ... 

 (फक्त नावात )


Team Explorers



सूर्योदय at कुलंग 







Sunday, May 8, 2016

सोच वहा शौचालय !!!






बरेच दिवस हि अस्वस्थता सतावत होती. अमांश झाल्यावर पोट साफ होत नाही पण  उगाच जुलाब होईल अशी भीती मनोमन सतत सतावत असते. थोडी फार काहीशी अशीच अवस्था झाली होती. प्रसाधनगृहातले तसले साहित्य लिहायचा काही विचार नाही. पण  काय करणार, आजकाल अशाच प्रकारच्या जाहिरातींचा आपल्यावर सतत भडिमार होत असतो. हिंजवडीला ऑफिसला जायला मला एक तास लगतो मग काय एक तास रेडिओ मिरची. गाणी कमी आणि जाहिरातीच  जास्त. म्हणून ठरवले आज या जाहिराती वर काहीतरी लिहिले पाहिजे नाही तर विचार करून करून डोक्याचे शौचालय व्हायला वेळ लागणार नाही.

सोच वहा शौचालय !!!

"खरी नटी विद्या बालन नसुन प्रियांका भारती आहे जिने लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या पतीचे घर सोडुन स्वच्छतेसाठी शौचालायची  मागणी  केली." इतर बायकांसारखी विकेंडला कुठेतरी फिरायला न्या किंवा हॉटेल मध्ये जाऊन पाकिटाला फोडणी घाला अशी अवाजवी मागणी न केल्याबद्दल मी सर्व प्रथम या स्त्री चे तमाम परुष वर्गाच्या वतीने मनपुर्वक आभार मानतो. बायकोची योग्य आणि रास्त मागणी पुर्ण करणे हे कुठल्याही पुरुषाचे आद्य कर्तव्य. आणि कुठलीही फुटकळ मागणी पुर्ण न झाल्यास घर सोडून जाणे हा (आजकालच्या) स्त्री चा गुणधर्म आणि कायद्याने मिळालेला विनाकर्तव्य अधिकार. 

       वरील जाहिरातीत मागणी जरी रास्त असली तरी संडासची गैरसोय म्हणून घर सोडून जाणे कितपत योग्य. मला काही प्रश्न पडलेत आणि मी रेडिओद्वारे विद्या बालनला  विचारण्याच्या विचारात होतो. पण म्हटले आपले लिखाण तशीच  आपली सोच, सगळे शौचालय. लोकांना विषय कळणे तर दूर पण उगाच नको ते वास यायचे. प्रश्न असे कि

१) एकंदरीत बघता प्रियांका भरतीचे लग्न हे  arranged दिसतेय. दोन्ही कुटुंब हि गावाकडची आहेत शहरातली तर बिलकुल वाटत नाहीत. आजही गावात लग्न ठरवताना मुलाचा पैसा अड्क्या  बरोबर घर दार जमीन जुमला पहिला जातो. मुलगा शहरात नोकरी करत असला तरी जमीन नसेल तर लग्न ठरणे मुश्किल. जावयाच्या ऐपातीचा एवढा अभ्यास करणाऱ्या सासर्यांकडून शौचालय सुटलेच  कसे?

२) जर मुलीकडचे लोक संडास घरात आहेत का नाही हे बघितल्या शिवाय सोयरिक ठरवत असतील तर घरात संडास बांधायची ऐपत त्यांची सुद्धा नाही. 

३) अशा सर्वसामान्य घरातील मुली बहुतेकदा सोशिक आणि संस्कारी असतात.एवढ्यातेवढ्या कारणावरून संसार मोडणाऱ्या नसतात त्यामुळे आपले म्हणणे नवराच्या गळी कसे उतरवायचे याचे रीतसर कोचिंग त्यांना त्यांच्या आई कडून मिळालेले असते. दुर्दैवाने प्रियांका भारती यांना त्यांच्या ऐपती आणि बद्धि प्रमाणे आई वडिल लाभलेले दिसत नाहीत त्यामुळे नवऱ्याच्या बाबतीत
त्यांनी पुकारलेला यल्गार हे माहेरच्या शोषणा विरोधात पुकारलेलं  बंड वाटते.

४) आता तुम्ही म्हणाल स्वच्छता, आरोग्य अशा महत्वाच्या विषयांना मी बगल देतोय किंवा एकांगी विचार मांडतोय. तर आता मुद्द्यावर येतो, वास्तविक बघता "सकाळची संडास" हा घटकाभराचा खेळ  कोणाला वेळ असतो हो संडास या विषय वर चर्चा करायला. हा, आता तुमची तब्येत बरी नसेल, अमांश, जुलाब, हगवण, मुळव्याध असा काही त्रास असेल तर होणार वारंवार  दर्शन त्या शौचालयाचे. पण तुमच्या सोच मध्ये कायम शौचालय असेल तर नक्की तुम्हाला काही तरी त्रास आहे. आणि त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. संडास घरात बांधून आपण बाहेर जायची वणवण थांबवु पण जुलाब नाही. अशा प्रकारे सतत विव्हळणार्याणा शारंगधर सुखकारक वटि देणे गरजेचे आहे.

५)   शौचालायची मागणी  केल्यावर प्रियांका भारती यांच्या यजमानांनी ती पूर्ण करण्यासाठी काही तरी पावले उचलली असतील त्याचा उल्लेख देखील वरील जाहिरातीत केलेला दिसत नाही. यावरून भारती यांचा कल शौचालय बांधण्यापेक्षा घर मोडण्याकडे जास्त दिसतो. 

६) अशा खंबीर आणि धाडसी निर्णय घेणारी महिला नक्कीच कौतुकास पात्र आहे. महिला सक्षमीकरणाची  आज गरज देखील आहे परंतु अशा प्रकारच्या जाहिराती मधून नक्की काय संदेश द्यायचा आहे ते कळत नाही.  प्रियांका भारतीचे कौतुक नक्की कशासाठी होते आहे, शौचालायची रास्त मागणी केल्याबद्दल का पतीचे घर सोडून पुरुषप्रधान संस्कृतीत बंड केल्याबद्दल. मागणी नक्की कशाची आहे. त्यात कितपत तत्यथा आहे, ती नक्की कोणी पूर्ण करायची आहे, ती पूर्ण झाल्यास कुटुंबा मध्ये, समाजामध्ये त्याचा काय उपयोग होणार आहे आणि न झाल्यास त्याचे काय पडसाद  उमटणार आहेत याचा एकदा तरी जाहिरात करणार्यांनी विचार करावा.

शेवटी हि माझी सोच. प्रत्येकाला आपली सोच बरोबर वाटते. पण त्या सोच पासून संडास बांधायचा का महाल  हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे माझे संडास पुरण इथेच आटपते घेतो नाहीतर इथे बऱ्याच लोकांच्या पोटात दुखायला लागेल आणि तुम्हाला तर माहितच आहे, आपल्या इथे सोच म्हणजे विचारांची आणि शौचालयांची दोन्हींची कमतरता किती आहे.

हे ईश्वरा सर्वांचे पोट साफ ठेव, निरोगी ठेव 
आणि तुझ्या कृपेने सर्वाना शौचालय लाभू दे !!!


वैभव … 
फक्त नावात