चकदेव महिमंडणगड पर्वत
कोरोना, लोकडाऊन, संचारबंदी,कडक नियम, शिथिल निर्बंध या सगळ्या गदारोळात मागील वर्ष कसेतरी सरले. वर्ष सरता सरता काही सवाष्णी घाट, वाघजाई घाट, पदरगड जवळची आंबेनळी-तांबडी घाटवाट अशा घाटवाटा, ठाणाळे लेणी तसेच जीवधन हडसर सारखे बऱ्याच दिवसांपासून रखडलेले दुर्ग सुद्धा भटकून झाले. पण तरी सुद्धा मनसोक्त असा मोठा कुठला तरी range ट्रेक करावा आणि एक फिटनेस चाचणी करून घ्यावी असे वाटत होते. (२०२० मध्ये खूप चाचण्या आणि त्यांचे निकाल आणि त्या अनुशंघाने मिळलेली Qurantine सेंटर ची शिक्षा भोगून आल्यावर ये फिटनेस टेस्ट तो बनता है ) .
फेब्रुवारी मध्ये पुन्हा एकदा भैरवगड ते रतनगड व्हाया कात्राबाई करायचा योग्य आला. वास्तवीक हा ट्रेक मी २०१९ मधे केला होता पण या वर्षी पुन्हा करायला वेगळे कारण नाही कारण कात्राबाई ची खिंड हे प्रकरण तसंच आहे. जसे प्रेमप्रकरणाचे गुपित जगापासून दडवून ठेवावे आणि एकट्याने त्याचा आनंद घ्यावा तसेच काहीसं या बाबतीत. फारसं कोणी या बाजूला फिरकत नाहीत. हाडाचे ट्रेकर्स फक्त कळसूबाईच्या गर्दी पेक्षा गवळ देवाला साद घालायला इथे जातात. अस्सल भटक्यांची भट्टी इथे जमली आणि जवळपास तीच टीम पुन्हा जावळीच्या जंगलात हुंदडायला तयार झाली.
दिवस शून्य ---
एक आठवड्यापूर्वी विशाल ने चकदेव, पर्वत आणि महिमंडणगड अशा ट्रेकचा एक कच्चा आराखडा आखला. व्हाट्सअँप ग्रुप वर PDF आले. २ दिवसांचा ट्रेक होता आणि रोज कमीतकमी ८-९ तास चालणे होते. मागच्याच आठवड्यात मी महिपतगड सुमारगड रसाळगड ट्रेक करून आलो होतो. कोकणातल्या दमट हवेत ट्रेक करण्यात काय वाट लागते त्याची चांगलीच रंगीत तालीम झाली होती. इथे तर मामला विचित्रच दिसत होता. खेड-जावळी-खेड असा तालुका प्रवास होता. म्हणजे रत्नागिरी-सातारा-रत्नागिरी. म्हणजे कोकणातून घाटावर आणि पुन्हा घाटावरून कोकणात. असं काहीतरी अतरंगी असले कि राहुल आणि सुशील तयारच असतात. त्यात आता भर पडलीये तन्मयची. घरी सगळी सेटिंग लावून त्यानी परवानगी काढली. मृणालिनी मॅम आणि विशाल नि नुकताच कात्रज ते रायगड केला होता त्यामुळे त्यांचे सुद्धा हौसले बुलंद होते. विशाल च्या विनंतीला प्रथमेश नाही कसा म्हणणार ? प्रसाद सरानी कोरोना नंतर नियमितपणे ट्रेक करून फिटनेस चाचणी पास केली होती. कौस्तुभ सर, दिलीप सर आणि प्रशांत अशी सगळी जातिवंत ट्रेकर्स मंडळी जमली आणि ट्रेक फायनल झाला.
शुक्रवार असला कि ऑफिसच्या कामाला ऊत नाही आला तर नवलच. आटपलं कसतरी आणि निघालो. वाईला सुरूर फाट्याला बस थांबली आणि थोड्याच वेळात साताऱ्याहून मृणालिनी मॅम आल्या आणि बस थोड्याच वेळात पसरणी घाट, आंबेनळी घाट आणि कशेडी घाट ओलांडत रात्रीचा अंधार कापत कोकणात खेड ला आंबिवली गावात पोहोचली. प्रशांत अर्थात ज्याला आम्ही यम म्हणतो तोच फक्त पूर्ण प्रवासात अगदी मेल्यासारखा निपचित झोपू शकला. घाटातल्या प्रवासात अशी साखरझोप येणं हे यमाला दैवी वरदान च म्हणायला पाहिजे. वाजले होते पहाटेचे ४:३०. हातपाय झाडून गावातल्या मध्यभागी असलेल्या मारुती मंदिरात आम्ही आमचा संसार मांडला. पाण्यासाठी मी आणि सुशील शेजारची शाळा, आणि गावातील आजूबाजूच्या गल्ल्या धुंडाळून आलो पण कुठेच पाणी मिळाले नाही. वेळ घालवून चालणार नव्हते कारण आजच्या दिवसात चकदेव आणि महिमंडणगड असा मोठा कार्यक्रम होता. बस मधून पाण्याचे कॅन बाहेर काढले आणि चहाचे आधण ठेवले, गुळ चिरून झाला. पाककलेत नवनवीन प्रयोग करण्यास विशाल कायम उत्साही असतो . त्याला आता तन्मयच्या हॉटेल मॅनॅजमेन्ट च्या व्यावसायिक कौशल्याची मोलाची साथ मिळाली. कांदा मिरची कापायच्या नव्या पद्दधती जाणून घेता आल्या, चहा उकळेपर्यंत तन्मयची मनसोक्त चेष्टामस्करी (निंदानालस्ती) करून झाली. दिलीप सरांची एक डुलकी काढून झाली. उपम्याची तयारीची झाली.
दिवस पहिला ...
थोड्याच वेळात तांबडे फुटले गावातले लोक सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी यायला लागेल होते. त्यांच्या कडे चकदेव ला जायच्या वाटेची चौकशी केली. मारुती मंदिरामधील आमचा सगळा पसारा गाडीत कोंबला. बुटांच्या लेस ची सोल्जर गाठ मारायचा आणि ती शिकण्याचा प्रयत्न करून झाला. पण उशीर होतोय हे बघून आम्ही आवरते घेतले आणि थोड्याच वेळात चकदेवच्या वाटेला लागलो. जाता जाता दुरून च झोलाई देवी ला नमस्कार केला. हि झोलाई म्हणजेच वरच्या चकदेव ची बहीण अशी गावातल्या लोकांकडून माहिती मिळाली.
सगळ्या प्रवासात एकमेकांची औपचारिक ओळख झाली नव्हती, ती करून घेण्यात थोडासा अजून वेळ गेला. वेगाने चालणारी मंडळी आता मात्र कोणत्याही सोपस्कारासाठी थांबणार नव्हती. ती पुढे सरकली. मी, प्रथमेश आणि विशाल मात्र निवांत तिथल्या शांततेचा आस्वाद घेत, काजूची बोन्ड फोडून त्यातले काजू खात , पक्ष्यांचे आवाज ऐकत रमत गंमत मार्गक्रमण करत होतो. थोड्याच वेळात जरा सखल सपाटीला लागलो आणि मग दृष्टीपथात पडला तो चकदेव चा भाला मोठा डोंगर. जवळपास अकरा वाजत आले होते. ऐन बारा च्या टळटळीत उन्हात हा डोंगर चढायचा हि कल्पनाच त्रासिक वाटत होती त्यात कोकणातली दमट हवा म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.
वाटेत एक वयस्कर बाबा भेटले, कमरेला कोयता, हातात काठी, डोक्याला कानटोपी. आणि खाली नाममात्र लंगोट वजा चड्डी. अंगातील सदराच एवढा ढगळा कि तोच सगळे काम करत होता. या दमट हवेत वास्तविक खालच्या वस्त्राची गरजच नव्हती . त्यांना आमच्या ट्रेक ची माहिती दिली असता त्यांनी आम्हाला शिंदी ला जाणारी, खोपी ला जाणारी वाट कशी आहे. महिमंडण गडाला जायला कसे सोपे पडेल या बद्दल मार्गदर्शन केले.
आता मात्र वेगाने चालणारे राहुल आणि कंपनी ठिपक्यासारखे दिसायला लागले होते. ते नजरेच्या आड होण्याआधी आमच्यामधले अंतर कमी करणे गरजेचे होते. मी आणि कौस्तुभ सर कसे बसे करत चढ संपवून वर आलो. आता कातळकडा दिसत होता पण लोकांनी सांगितलेली शिडी कुठे दिसत नव्हती. थोडे फोटो सेशन करून वाळलेल्या गवतातून पायवाट धुंडाळत थोडासे उजवीकडे गेल्यावर आम्हाला शिडी लागली. हि शिडी इतर गडकिल्ल्यांवरच्या शिड्यां पेक्षा वेगळी होती. चकदेव वरील गावकरी खालून आंबिवली किंवा खेड मधून किराणा अथवा इतर सामानाची पूर्वी या मार्गानी/शिडीने ने आण करत . रघुवीर घाटाचे काम झाल्यानंतर खेड पेक्षा शिंदी मधला मार्ग या गावकऱ्यांसाठी सुकर झाला आहे. या शिडीने वर येताच वाऱ्याची झुळूक आली आणि उन्हात होणाऱ्या डोळ्यांची आग थोडी कमी झाली. समोरचा परिसर स्वच्छ दिसू लागला. माहितपतगड सुमारगड आणि रसाळगड हे त्रिकुट अगदी स्पष्ट दिसत होते. थोड्या पायऱ्या चालून गेल्यावर कातळात कोरलेली प्रसन्न, सुंदर अशी गणपतीची मूर्ती आमचं स्वागत करीत होती. तिला वंदन करून मी आणि कौस्तुभ सर वर आलो. दिलीप सरानी झाडाची सावली बघून ताणून दिली होती तर प्रशांत, सुशील आणि राहुल पुढे गेले होते. आम्ही आता सगळे येईपर्यंत थांबायचं निर्णय घेतला. जवळ जवळ तासभर आमची मस्त झोप झाली. मग विशाल, मृणालिनी मॅडम, प्रथमेश आणि प्रसाद सर आले. एक तास झालेल्या झोपे नंतर पुन्हा त्या उन्हात चालायचे जीवावर आले होते पण गत्यंतर नव्हते.
प्रशांत आणि मंडळींनी वाटेत केलेल्या खुणा बघत बघत लवकरात लवकर गड सर करायचा एवढंच डोक्यात होते. दुपारच्या शांततेत अशा निर्जन गडावर कोण आले असेल असा विचार काही सरपटणाऱ्या मित्रांनी केला आणि दगडकपारीतून आमची भेट घेण्यासाठी एक साप बाहेर आला. जसा दुपारी झोपमोड केल्यावर पुणेकरांना राग येतो तसाच कदाचित त्याला पण आला असावा. माझ्या पायातून सळसळ करत समोरच्या झाडीत तो निघून गेला. एक क्षण चपापलो. गडांवरील खुणा टिपण्यात गुंगलेले डोळे खाडकन उघडले. तिथे फार काळ ना घुटमळता आम्ही पुढे सरकलो आणि थेट गडमाथा गाठला. वर पोहोचताच दिसला तो पलीकडील बाजूचा खोल दरीचा आणि त्या पलीकडे वसलेल्या वासोटा, जुना वासोटा, नागेश्वर गुहेचा आणि कास पठाराचा नजारा. मागे वळून पहिले तर चकदेव चे पठार आणि त्या वरून लॉग आऊट करून निघालेल्या सूर्याची रंगांची उधळण. गडाच्या दक्षिण टोकावरून रघुवीर घाटाचे विहंगम दृश्य दिसले. तर उत्तरेस भैरवनाथाचे छोटे मंदिर आणि ७-८ टाक्यांचा समूह. त्यातील फक्त एकाच टाक्यात पाणी आढळले आणि टाक्याच्या भिंतीवर काही शिल्पे कोरलेली दिसली. किल्ला म्हणावा असे फारसे अवशेष गडावर आढळत नाहीत. फोटोसेशन झाल्यावर चकदेव च्या पठारावर विसावणाऱ्या सूर्यदेवाचे मावळतीचे रंग बघत बघत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खाली येऊन बघतो तर काय मसालेभात तयार (veg बिर्याणी असा काही प्रकार नसतो असं काहींचे मत म्हणून इथून पुढे त्याला मसालेभात संबोधण्यात येईल).
दुसऱ्या दिवशी जास्त चालायला नाहीये. पर्वत वर जाऊन जोम मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन पलीकडे कांदोशी ला उतरायचे कि झाला ट्रेक. अशा गोड गैरसमजूतीत दुसरा दिवस उजाडला. आज झोप पूर्ण झाली होती त्यामुळे सगळे जण फ्रेश होते. पहाटेच्या अंधारात सगळे उठले. तंबू आवरण्यात आले. रात्री कोण जास्त घोरत होते याचा शोध घ्यायचा वायफळ प्रयत्न झाला. चहा क्रिमरोल, टोस्ट, मॅग्गी, रात्रीचा मसालेभात (ज्यात काजू घालून त्याची शाही बिर्याणि करायचा प्रयत्न केलेला) असा दणकून नाश्ता झाला. ड्राइवर काकांनी आम्हाला तात्काळ वळवण गावात आणून सोडले. आज तरी सगळे जण बरोबर ट्रेक करू. उगाच मागे किती राहिले पुढे किती गेले याचा हिशोब ठेवण्यात एनर्जी वाया घालवायला नको असा विचार करून आणि सुरुवातीचे एक दोन फोटो काढून आम्ही पर्वत या तीर्थक्षेत्राचा ट्रेक सुरु केला. वाजले होते सकाळचे ८. १५. थोडी चढाई थोडीशी सखल सपाटी आणि मानेवर कपाळावर साचू लागलेल्या घामावर सकाळच्या शीतल वाऱ्याची झुळूक. सगळे कसे आल्हाददायक वाटत होते. चकदेव, महिमंडणगड गर्द झाडी पांघरून अजूनही चिरनिद्रिस्त होते. आज मात्र मी आणि तन्मय आमच्या सुपर फास्ट एक्सप्रेस म्हणजेच राहुल, सुशील आणि प्रशांत च्या कंपूत होतो त्यामुळे पटापट आम्ही एका झऱ्यापाशी पोहोचलो. पाणी भरून घेतले आणि पर्वत वरती जाण्यासाठी असलेल्या जिन्यांपर्यंत पोहोचलो. वरती आल्यावर दिसले स्वयंभू श्री जोम मल्लिकार्जुनचे मंदिर. चकदेवच्या चौकेश्वराच्या मंदिरासारखेच हे देखील मंदिर. मंदिराचे प्रवेशद्वार आणि बाजूची तटबंदी मोठी आकर्षक आहे . आत आल्यावर मोठा नंदी लक्ष वेधून घेतो. शिवलिंगावर बसवायला भगवान शंकरांचे मुखवटे इथे दिसतात. नवस पूर्ण झाल्यावर ते देवाला वाहिले जातात. चकदेव ला मुखवट्यांऐवजी पितळ किंवा तत्सम धातूचे नाग वाहिलेलं पहिले होते. खेड मधील एक ग्रुप मंदिरात मुक्कामी आला होता मंदिराच्या मागे त्यांची राहायची चांगली सोय होती.
येथील पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशी ७ पांडवकालीन मंदिरं या जावळी किंवा कोकण भागात आहेत. ती खालीलप्रमाणे
२.धारदेव - धारेश्वर
३. चकदेव - चौकेश्वर
४. तलदेव - तलेश्वर
५. गालदेव - गालेश्वर
७. घोणसपूर - मल्लिकार्जुन
पण नंतर मिळालेल्या माहिती नुसार हि पांडवकालीन नसून जावळीच्या मोऱ्यांनी हि मंदिरे काही शतकांपूर्वी बांधली आहेत असे कळते. मंदिराच्या आवारातून सह्याद्रीचे विलोभनीय दृश्य दिसले आणि ट्रेकचा सगळा थकवा दूर झाला. समोर झाडणी , कोळंबाचा दांड ,घोणसापुर मार्गे मधुमकरंद गडाला जाणारा ट्रेकचा रस्ता दिसतो अजून निरखून पाहिल्यास महाबळेश्वर आणि कोळेश्वर चे पठार आणि दूरवर डोंगर दर्यात लपलेल्या प्रतापगडाचे टोक दिसते. तर मंदिराच्या दुसऱ्या बाजूस चकदेव, महिमंडणगड आणि दूरवर वासोटा, तापोळा असा परिसर दिसतो. याला पर्वत का म्हणत असावे याची काही माहिती मिळाली नाही पण माणसाचे नाव माणूस इतका सोपा अर्थ लावून आम्ही इथल्या निसर्गचित्रात रममाण होईन गेलो. काकडी, संत्री, सफरचंद, गाजरे खाऊन जरा बॅगा हलक्या केल्या आणि खाली कांदोशीच्या वाटेला लावून देईल अशा वाटाड्याचा जरा शोध घेतला पण कोणीच मिळेना शेवटी मंदिरातील पुजार्यांना कसे तरी तयार केले.
त्यांनी अर्ध्या रस्त्यात पाण्याच्या कुंडांपर्यंत येऊन आम्हाला खाली उतरायची निसरडी वाट आम्हाला दाखवली. ती वाट खाली रानात जाणार होती तिथून उजवीकडे खाली उरून उचाट गावात जायचा सल्ला त्यांनी आम्हाला दिला. तिथून सात्विन पाडा आणि मग डांबरी रस्त्याने कांदट जावळी. जिथे आम्ही दुपारच्या जेवणासाठी थांबणार होतो. तिथून पुढे जाताना नाळीच्या वाटेने जाणारा जगबुडी नदीला समांतर असा रस्ता पकडून कांदोशी गाठायचे आणि ट्रेक संपवायचा. अशी सगळी रूपरेषा आखून ती समजावून घेतली आणि आम्ही त्या घसाऱ्याच्या वाटेने उठत बसत, कधी मध्ये घसरत वरती सांगितल्याप्रमाणे रानात आलो. घड्याळ बघितले आणि पुन्हा एकदा विचार विनिमय करून उचाट, सात्विन पाड्याच्या दिशेने न जाता सरळ एका शेजारच्या पठारावरून खाली उतरणारी सोंड पकडून कांदट ला जायचा निर्णय आम्ही सार्वानुमतें घेतला. हा रस्ता मळलेला नाहीये, उगाच ढोरवाटेने गेलात तर जंगलात अडकून पडाल. त्या बाजूला गवे आणि जंगली श्वापदे असतात अशी थोडीशी भीती वरती पुजार्यांनी आम्हाला घातली होती. पण वेळ वाचवायचा असेल तर थोडी रिस्क घ्यावीच लागणार होती. (रिस्क है तो इष्क है ) हा ट्रेक व्यायवसायिक इव्हेंट नसल्यामुळे ट्रेकच्या वेळापत्रकात आणि प्रवासात कधीही बदल घडू शकत होता आणि आमची सगळ्यांची अनवट वाटा पायाखाली घालायची तयारी होती. थोड्याच वेळात दिलीप सरांना खात्री पटली कि आपण बरोबर मार्गाने चाललोय.
पण वाटेत कुठेच सावली नव्हती. जवळपास एक वाजला होता. द्राक्षे खाऊन जेवणाची वेळ थोडी पुढे ढकलली. आणि हळूहळू करत आम्ही पर्वत पूर्ण पणे उतरून खाली कांदट गावात आलो. गवताच्या गंजी रचून ठेवलेल्या दिसल्या पण गावात कोणी माणूस दिसेना. उन्हातून चालत कसे तरी आम्ही दिड वाजता निरीपजी देवीच्या मंदिरात पोहोचलो. हि देवी म्हणजे जावळीच्या मोऱ्यांची कुलदेवी. चहुबाजूनी गर्द झाडीत वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि शांत जागा आहे. मंदिरातील कोरीव अशी सुंदर नंदी ची मूर्ती खासच आहे. आजूबाजूला बऱ्याच समाध्या बांधलेल्या आढळतात पण त्याची फारशी माहिती मिळत नाही. निरव शांतता, एकमेकांत अडकलेल्या झाडांच्या मुळ्या आणि प्रकाशाला अडवून दाटीवाटीने वाटेत उभ्या असलेल्या झाडांच्या फांद्या. जावळी च्या जंगलाचे जे वर्णन ऐकले वाचले होते त्याची खरीखुरी अनुभूती आज घेत होतो. दुपारच्या टळटळीत उन्हात एवढी दाट सावली कि आमच्या स्वतःच्या सावल्या सुध्या कुठेच पडताना दिसल्या नाहीत. त्या नैसर्गिक फ्रिज मध्ये , तिथल्या गारव्यात स्थिरावल्यानंतर दिलीप सरांनी बॅग मधून इतक्यावेळ वागवलेले कलिंगड काढले. काल कोकम आज कलिंगड.
पुढे लवकर आल्यामुळे आम्ही त्याची वाटणी आम्हाला हवी तशी केली आणि थोडेसे औदार्य म्हणून मागून येणाऱ्यांसाठी ठेवले. कालचा मसालेभात जो आज शाही बिर्याणी झाला होता तो सुदैवाने सुस्थित होता. त्यानंतर प्रत्येकाच्या बॅग मधून सोनपापडी, गुळपट्टी आणि काही वेळाने वऱ्हाडी ठेचा अशी सरप्राइसेस निघत गेली आणि आम्ही ताव मारत गेलो. तेवढयात तिथे महाबळेश्वरमधील सुप्रसिद्ध अशा पुस्तकांच्या गावातून, भिलार मधून चोरले म्हणून एक सद्गृहस्थ तिथे दर्शनासाठी आले. स्वतःहून आमची ओळख करून घेतली आणि त्यांच्या गावी यायचे आमंत्रण आम्हाला देऊन गेले. जेवण आटोपताच आम्ही धाव घेतली ती मंदिरामागे असलेल्या चंद्रराव मोऱ्यांच्या जुन्या वाड्याचे अवशेष पाहायला. तिथे लिहिलेल्या स्मृतिस्तंभानुसार याच मोऱ्यांच्या वंशजांनी पुढे राजाराम महाराजांची अजिंक्यतारा किल्ल्यातून औरंगजेबाच्या वेढ्यातून सुटका केली होती.
बरोबर पावणेतीन झाले होते आम्ही उतरायला सुरुवात केली आणि आता सरु झाले होते खरे थ्रिल, ज्याची आम्हाला पुसटशी देखील कल्पना नव्हती. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी आपण कांदोशी ला पोहोचू. उतरायचेच तर आहे. अगदीच वाटले तर पळत उतरू. थोड्याच वेळात आम्हाला रस्त्यात कोणीतरी मार्किंग केलेले दिसले. म्हटले..अरे वाह ! आता तर अगदीच सोपा पेपर. मार्किंग /दगडावर केलेले बाण बघत बघत आम्ही एका नदीपाशी आलो. सगळ्यांना वाटले अरे इथेच जेवायला थांबायला हवे होते. पाण्यात निवळ्या होत्या त्यामुळे अगदी स्वच्छ आणि नितळ पाणी. खरंतर तिथे पाण्यात डुंबायला सगळ्यांना आवडले असते पण पुढचे वेळेचे गणित बिघडले असते म्हणून नुसते हातपाय तोंड धुवून ताजेतवाने होईन आम्ही त्या नदीतले दगड गोटे तुडवत पुढे निघालो एवढ्यात फोटो काढायच्या नादात राहुलचा फोन जवळपास २० फुटांवरून खाली साठलेल्या पाण्यात पडला. दिलीप सर आणि राहुल नि जाऊन तो फोन वर काढला. सुदैवाने फोने चालू होता. पहिले रेस्क्यू ऑपेरेशन यशस्वी झाले होते.
म्हणून मग मी परत मागे जाऊन जवळ जवळ २० मीटर चढून तो रोप आणला. पण तो पर्यंत सुशील लांब कुठे तरी पसार झाला होता. मागच्या लोकांना आवाज दिला तर एक नाही का दोन. याचा अर्थ ते बरेच मागे होते आणि सुशील आणि मंडळी माझ्या खूप पुढे गेली होती. कदाचित त्यांच्या कडचे खडू संपत आले होते त्यामुळे जागोजागी खुणा सुद्धा केलेल्या दिसत नव्हत्या. फेटे सुद्धा दिसत नव्हते. आता खरंच पंचाईत झाली होती. एक पाच मिनिटे तसाच थांबलो पण कोणाचा आवाज येईना. इतक्यात पानांचा आवाज झाला. प्रसाद सर हळू हळू खाली येताना दिसले. त्यांच्या कडचे पाणी संपत आले होते. त्यांना थोडे इलेकट्रोल चे पाणी दिल्यावर तरतरी आली. हळूहळू आम्ही दोघे उतरून खाली जगबुडी नदीच्या पात्रा जवळ आलो. नदीच्या कडे कडेने चालताना सभोवतालचा संधिप्रकाश हळूहळू अंधारात परावर्तित व्हायला लागला होता. नदीच्या पलीकडे डोंगरावर गाववाल्यानी आग लावली होती, उद्देश हाच कि प्राण्यांची घाण साफ होईल आणि येणारे गवत चांगले येईल. अंधारात झाडावरून माकडे आवाज करून एकमेकांना आमच्या येण्याची वार्ता देत होती. मोठे मोठे पक्षी बहुदा हॉर्नबिल त्यामुळे सावध होऊन इकडे तिकडे उडत होते. वेळीअवेळी आमच्या सारखे पाहुणे पाहून ते सुद्धा आश्चयचकित झाले होते. अंधाराच्या आत आम्ही जंगला बाहेर पडू शकलो नाही पण कांदोशी गाव नजरेच्या टप्प्यात आले होते त्यामुळे मनाला बराच मोठा दिलासा मिळाला होता. संध्याकाळचे ७ वाजले होते नदीच्या पलीकडे कांदोशी गावातले रामवरदायिनी देवीचे मंदिर दिसत होते. तिथेच आमची बस आली होती. पहिले ३ जण यशस्वीरीत्या अंधाराच्या आधी ६: ३० वाजता मंदिरात पोहोचले होते. मी आणि प्रसाद सर आता जास्त रस्ता शोधण्या पेक्षा पाणी नसलेल्या नदीच्या पात्रातून मोठे मोठे दगड गोटे तुडवत हेड टॉर्च च्या साह्याने मंदिरापाशी पोहोचलो. प्रसाद सरांना वाटेत कोणत्या तरी प्राण्याचे मोठे हाड पायाखाली लागले पण मंदिर समोर दिसत होते त्यामुळे मनातली भीती कधीच पळून गेली होती आणि आम्ही दोघे सुखरूप ७: १५ वाजता मंदिरात पोहोचलो. सुशील आणि मंडळी आमच्या स्वागताला हजर होते. त्यानंतर उर्वरित मंडळी जवळजवळ एकतासाने पोहोचली.
ड्राइवर काका आमची वाट बघून बघून दमले आणि आम्ही चालून चालून. शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक तणावामुळे जास्त दमणूक झाली होती. जावळी हे प्रकरण तेंव्हा हि अवघड होते आणि आज सुद्धा याची प्रचिती आली. "येता जावळी जाता गोवली" म्हणतात हेच खरं. इतक्या घनदाट जंगलात जिथे अनेक ढोरवाटा फुटलेल्या असतात तेंव्हा आपले भौगोलिक आणि नकाशा वाचनाचे ज्ञान पणास लागते. नुसते धाडस असून इथे भागत नाही तर मनाचा तोल ढळू न देता सारासार विचार करता आला तरच इथे मार्ग दिसतो अन्यथा चकवा लागलाच म्हणून समजायचे.
ठरलेल्या वेळेपेक्षा ट्रेक आणि त्यामुळे परतीचा प्रवास लांबला खरा पण नक्कीच दूरगामी लक्षात राहतील अशा आठवणींचा खजिना सापडला या जावळीच्या जंगलात. लॉक डाऊन मध्ये घरी बसून कंटाळलेल्या मित्रांनी ह्या खजिन्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.
भेटू या पुन्हा एकदा सह्याद्री मध्ये. तोपर्यंत चालू दे जीवाची जावळी !!!
चकदेव ते महिमंडणगड विडिओ
-वैभव
फक्त नावात
खरंच भन्नाट झाला होता ट्रेक !!! आणि छान मांडलस वैभव !! परत करूयात जीवाची जावळी !!😊
ReplyDeleteधन्यवाद प्रथमेश ...नक्की करूया परत
DeleteMast...
ReplyDeleteThank you!
Deleteवाचून दमलो म्हणावं की आज सकाळचं energy drink म्हणावं?
ReplyDeleteपरत एकदा trek करुन झाला.. amazing writing skills, छोट्या-छोट्या गोष्टी छान मांडल्या आहेस.. २-३ वाक्य माझ्या blog मधले copy केले आहेत, त्याची royalty लागेल.. 😀😉
keep trekking, keep exploring, keep writing, keep sharing.. 👍
धन्यवाद सुशील 🙏 तुम्हा सगळ्यांमुळे ट्रेक यशस्वी झाला. आणि यावेळेस जास्त डोक्याला ताण नाही आला कारण तुझा ब्लॉग होताच रेफरन्स साठी.
DeleteMast..khup sundar varnan kela ahes
ReplyDeleteMast..khup sundar varnan kela ahes
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteKhup sunder Mandalay trek aagadi jasa kela tasa aapan ...photo selection ni prasang paristhiti varanan सुरेख ...जीवाची जावळी तूम्हासरवांसोबत मनाला भावली ..भेटू सह्याद्री पर्वत रांगेत पुन्हा ...
ReplyDeleteमृणालिनी .👍🙂
धन्यवाद मृणालिनी मॕम...नक्की भेटू पुढच्या ट्रेक ला
Deleteवाचणाऱ्याला सुध्दा भिती वाटेल असे वर्णन पण धैर्य आहे तर धीरज आहे.👍👌
ReplyDeleteसर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा 💐💐
धन्यवाद 🙏
Deleteखुप छान लिहिले आहेस👌
ReplyDeleteThank you
DeleteHats off to all of you..Great...Very well written..Best wishes for future trek..
ReplyDeleteThank You...
Delete